
विद्यार्थिनीच्या चारित्र्यहननावरून तीव्र प्रतिक्रिया
पणजी, दि. १८ (प्रतिनिधी)
राज्यातील एका प्रमुख दैनिकाने उघडकीस आणलेले कथित गोवा विद्यापीठ पेपरफुटीचे प्रकरण हे केवळ सूडनाट्यातूनच घडल्याचा थेट दावा कुलगुरू प्रो. डॉ. हरीलाल मेनन यांनी केल्याने या प्रकरणाला आता गंभीर वळण प्राप्त झाले आहे. या दैनिकाने एका विद्यार्थिनीचा उल्लेख सहाय्यक प्राध्यापकाची प्रेयसी असा केल्याने विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
दैनिकाचा पोलखोल आणि…
या प्रकरणाचा पोलखोल केलेल्या दैनिकात हे प्रकरण प्रसिद्ध होताच लगेच आरटीआय आणि सामाजिक कार्यकर्त्यांची आगशी पोलिस स्थानकावरील तक्रार, एनएसयुआय आणि अभाविप विद्यार्थी संघटनांकडून विद्यापीठात घातला गेलेला गोंधळ, गोवा फॉरवर्ड पक्षाने घेतलेली पत्रकार परिषद या सगळ्या गोष्टींकडे एक नियोजनबद्ध प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या दैनिकाने दिलेल्या वृत्तात या प्रकरणाची माहिती गोवा विद्यापीठातीलच एका प्राध्यापकाने दिल्याचा दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे पेपरफुटीमुळे जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थिनीचा उल्लेख प्रेयसी हा कशावरून करण्यात आला. हा सहाय्यक प्राध्यापक आणि विद्यार्थिनीच्या चारित्र्यहननाचा प्रकार ठरत नाही का, असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाची चौकशी न होताच किंवा ठोस पुरावे न सापडताच या विद्यार्थिनीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे अधिकार कुणी दिले, असा सवाल समाजातील विविध घटकांकडून केला जात आहे.
अंतर्गत गटबाजीचा विद्यापीठाला वारसा
गोवा विद्यापीठाला अंतर्गत गटबाजीचा जुना इतिहास आहे. आपल्या प्रतिस्पर्धी किंवा वैयक्तिक शत्रुत्वाचा उपयोग करून विद्यापीठाला बदनाम करण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. या पेपरफुटीत सहभागी सहाय्यक प्राध्यापकाला हे कृत्य करताना पकडल्याचे सदर वृत्तात म्हटले आहे. हा प्रकार कुलगुरूंच्या नजरेला आणून दिल्याचाही दावा या वृत्तात करण्यात आला आहे. आता पाच महिन्यानंतर अचानक या प्रकरणाला तोंड फुटण्याचे कारण काय? गोवा विद्यापीठात प्राध्यापकांची संघटना कार्यरत आहे, मग या संघटनेतर्फे हा विषय का पुढे नेण्यात आला नाही, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
विभाग प्रमुख पदासाठी रस्सीखेच
गोवा विद्यापीठाने कायमस्वरूपी विभाग प्रमुख पद रद्द करून ते फिरत्या पद्धतीवर प्रकल्प अधिकारी असे पद निर्माण केले आहे. हे पद दर तीन वर्षांनी दुसऱ्याकडे दिले जाते. सहाजिकच या पदावर कुणाचाही अधिकार राहत नसल्यामुळे यातून वेगवेगळ्या विभागात गटबाजी निर्माण झाली आहे, अशी माहिती विद्यापीठातील सूत्रांकडून मिळते.
विद्यार्थी संघटनांचे राजकारण
या प्रकरणात एका विद्यार्थिनीचे चारित्र्यहनन झाले असताना तिची बाजू समजून न घेता थेट एनएसयुआय आणि अभाविप विद्यार्थी संघटना सहाय्यक प्राध्यापकावर कारवाईसाठी रणांगणात उतरण्याची घाई नेमकी कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या विद्यार्थिनीचा उल्लेख प्रेयसी म्हणून करण्यात आला. सदर सहाय्यक प्राध्यापक विवाहित असून तरीही विद्यार्थिनीला त्याची प्रेयसी म्हणून संबोधित करणे कितपत योग्य, असा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या एका महत्त्वाच्या महिला नेत्याने केवळ वृत्तपत्रातील बातमीच्या आधारे सहाय्यक प्राध्यापक आणि विद्यार्थिनीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. कुठल्याही पुराव्याविना केवळ वृत्ताची दखल घेऊन पोलिस तक्रार दाखल करणाऱ्यांना थेट एखाद्याचे चारित्र्यहनन करण्याचा अधिकार मिळतो काय, असाही प्रश्न आता विचारला जात आहे. विद्यार्थ्यांचे विषय हाताळण्याचे सोडून विद्यार्थी संघटना राजकारण्यांच्या हातातील बाहुले बनत असल्याची टीकाही आता सुरू झाली आहे.