निवृत्त आयपीएस बॉस्को जॉर्जची हाक
गांवकारी, दि. २७ (प्रतिनिधी)
राज्यात सगळ्याच बाबतीत अवनती सुरू आहे आणि सहजिकच पोलिस खातेही या परिस्थितीचे बळी ठरले आहे. ही अवनती वेळीच थांबवण्याची गरज आहे, असे प्रांजळ मत निवृत्त आयपीएस अधिकारी बॉस्को जॉर्ज यांनी व्यक्त केले. प्रुडंट मीडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे धाडसी विधान केले.
अलिकडेच एकाच फटक्यात १९ पोलिस अधिकाऱ्यांना अधिक्षकपदी मिळालेल्या बढतीबाबत बॉस्को जॉर्ज यांनी सोशल मीडियावरून केलेली टीप्पणी बरीच व्हायरल झाली आहे. ही बढती म्हणजे केवळ तमाशाच ठरल्याचा टोलाही त्यांनी हाणला होता. पोलिस खात्यात होणारी सामूहिक भरती आणि त्यात आपल्या मर्जीतील लोकांना सामावून घेण्यासाठी होणारी तडजोड ही धोक्याची घंटा आहे. पोलिस पेशा हा राष्ट्रसेवेचा भाग आहे. ही राष्ट्रभावना नसेल किंवा केवळ एक नोकरी म्हणून या पेशाकडे पाहिले जात असेल, तर पोलिस खात्याचा ऱ्हास होण्यास अजिबात वेळ लागणार नाही. पोलिस भरतीतील वशिलेबाजी हे देखील एक मोठे आव्हान असल्याचे मत बॉस्को जॉर्ज यांनी व्यक्त केले.
पोलिसांच्या बढत्या या खात्यातील असंतोषाला कारणीभूत ठरल्या आहेत. आपल्या मर्जीतील लोकांना मोठी पदे मिळवून देण्यासाठी नियमात बदल करून अथवा अन्य कुठल्या तरी मार्गाने त्यांना बढती देऊन इतरांवर अन्याय करण्याची कृती ही पोलिस खात्याचे मनोधैर्य खच्चीकरण करणारी ठरली आहे. आयआरबीतील पोलिसांवर बढतीबाबत झालेला अन्याय आणि त्यातून या पोलिस कर्मचाऱ्यांत पसरलेली निराशा ही देखील भविष्यातील अनेक संकटांचे कारण ठरू शकते.
पोलिस खात्यातील कित्येक प्रकरणे न्यायालयात असून, सरकारकडून होत असलेला अन्याय न्यायालयामार्फत दूर करण्याचा सुरू असलेला आटापिटा हेच या खात्याची दुर्दशा दर्शवणारे ठरले आहे, असेही बॉस्को जॉर्ज म्हणाले.






