
मनोज परब यांचे दमदार पुनरागमन
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी)
अग्निशमन बंब किंवा रुग्णवाहिकांसारखे आरजीपी पक्षाचे क्रांतिकारी लोकांच्या मदतीसाठी धावत राहिले. राजकीय पक्षाला राजकारणात टिकून राहण्यासाठी शाश्वतीची गरज असते हे विसरूनच गेलो. गत काळातील सगळ्या चुका आणि त्रुटी दुरुस्त करून आता गोव्याच्या रक्षणासाठीच्या क्रांतीची नव्या जोमाने मशाल पेटणार असा निर्धार पक्ष प्रमुख मनोज परब यांनी केला.
संयुक्त विरोधकांत आरजीपी नाही
गोव्याच्या जमिनी तसेच गोव्याची अस्मिता वाचवण्यासाठी पोगो विधेयक तथा किमान जमीन मालकी मर्यादा प्रस्ताव आदी अनेक विषय पक्षाचे आमदार विरेश बोरकर यांनी मांडले. या विषयांना विरोधातील इतर पक्षांकडून अजिबात सहकार्य मिळाले नाही. किमान विरोधी पक्षांनी तरी पुढाकार घेऊन त्यासंबंधीचे प्रस्ताव मांडण्याची गरज होती. आरजीपीच्या कुठल्याच प्रस्तावाला विरोधक साथ देत नसतील तर मग संयुक्त विरोधकांचा भाग बनून काय उपयोग, असा सवाल मनोज परब यांनी केला. आगामी काळात आरजीपीचे आमदार विरेश बोरकर हे संयुक्त विरोधकांचे भाग नसणार तर ते स्वबळावर विरोधी आमदाराची भूमिका वठवणार असा निर्णय पक्षाच्या कोअर समितीने घेतल्याची माहितीही यावेळी परब यांनी दिली.
सिंहावलोकन आणि परिवर्तन
गेली सात वर्षे स्वतःचे करिअर, व्यक्तिगत जीवन, कौटुंबिक जीवन पणाला लावून पक्षाचे क्रांतिकारी दिवसरात्र लोकांसाठी झुंजले. पण विधानसभा आणि लोकसभेत मतदारांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. हे नेमके काय घडले. नेमके काय चुकले आणि त्यात सुधारणा कशा घडवून आणायच्या याचा विचार करण्यासाठीच तात्पुरती विश्रांती घेतल्याचे कारण मनोज परब यांनी दिले. यावेळी पत्रकारांकडून अनेकवेळा फोन आले परंतु त्यांना प्रतिसाद दिला नाही. या कृतीबाबत माफी मागून नव्या विचारांनी, नव्या रणनितीने आणि नव्या ध्येयाने आता पक्षाची वाटचाल सुरू होणार आहे. या विश्रांती काळात अनेकांकडे संवाद साधला, चर्चा केली, सूचना समजून घेतल्या आणि त्यानुसार टप्प्या टप्प्याने पक्षाच्या धोरणांत आणि भूमिकेत बदल केले जाणार असल्याचे सुतोवाच मनोज परब यांनी दिले. मोठे युद्ध जिंकण्यासाठी रणनितीची फेरआखणी गरजेची आहे. यासाठी काही काळ डोके शांत ठेवून शांतचित्ताने विचार करण्याची गरज असते. आपल्या अज्ञातवासाचे हेच कारण होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मर्यादित मतदारसंघात ताकद पणाला लावणार
मागील विधानसभेत पक्षाने ३८ मतदारसंघ लढवले होते. यापुढे मतदारसंघातील क्रांतीकारकांची शक्ती, तेथील साधने आणि एकंदरीत पक्षाची ताकद पाहूनच उमेदवार उतरवले जाणार असल्याचेही मनोज परब म्हणाले. आरजीपी पक्ष फक्त ७ महिने अलिप्त आहे. या सात महिन्यात विरोधकांनी काय केले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारचा सामना करण्याची कुवत विरोधकांत नाही. पडद्यामागे सेटिंग करण्याकडेच त्यांचा कल आहे आणि त्यामुळे पडद्यामागे सेटिंग न करता सत्ताधारी भाजपला शिंगावर घेण्याची पात्रता फक्त आरजीपी पक्षातच आहे, असेही मनोज परब यांनी स्पष्ट केले.
क्रांतीत सहभागी व्हा
गोव्याच्या जमिनी, गोव्याची अस्मिता आणि वेगळेपण राखण्यासाठी प्रत्येक नीज गोंयकाराने या क्रांतीत उतरण्याची गरज आहे. ज्यांना ते शक्य नाही त्यांनी किमान काम करणाऱ्या क्रांतीकारकांना सहाय्य करण्याची गरज आहे. जोपर्यंत गोंयकार स्वतः या क्रांतीसाठी आपले योगदान देणार नाहीत तोपर्यंत गोव्याचे रक्षण अशक्य आहे आणि त्यामुळे ही क्रांती यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या कुवतीनुसार या क्रांतीत उतरण्याचे आवाहन मनोज परब यांनी केले.
पत्रकार तुटून पडले
गेले सात महिने राजकारणापासून अलिप्त राहिलेले मनोज परब यांच्या पत्रकार परिषदेत पत्रकार त्यांच्यावर तुटून पडले. त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. पत्रकार परिषदेत आमदार विरेश बोरकर यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्यावर एकाधिकारशाही करत असल्याचा ठपकाही काही पत्रकारांनी ठेवला. एरवी सरकारातील मंत्री, आमदारांच्या पत्रकार परिषदांत मुग गिळून बसणाऱ्या पत्रकारांनाही आजच्या पत्रकार परिषदेत बराच कंठ फुटलेला पाहायला मिळाला. या एकंदरीत परिस्थितीला मनोज परब यांनी शांत पद्धतीने तोंड दिले.