कार्यकर्त्यांना रिचार्ज करण्याची चोडणकरांची धडपड
गांवकारी, दि. ८ (प्रतिनिधी)
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी गिरीष चोडणकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी उघडपणे आपला मोर्चा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी तर विश्वजित राणे यांच्या सत्तरी तालुक्याकडे वळवला आहे. सत्तरीतील दीर्घकाळ चालत आलेली राजेशाही संपवण्याचा तसेच साखळीत मुख्यमंत्र्यांचा पराभव करण्याचा संकल्प त्यांनी स्पष्टपणे व्यक्त केला आहे.
वाळपई, पर्येत काँग्रेसचा आवाज
म्हादई जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मंगलदास नाईक यांच्या नेतृत्वाखाली वाळपई आणि पर्ये गट काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. संघटनात्मक बळकटीकरण, जनसंपर्क वाढविणे आणि आगामी राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पक्षाची तयारी यावर सविस्तर चर्चा झाली. या मेळाव्यात पक्षाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना जनतेच्या प्रश्नांशी सातत्याने जोडलेले राहण्याचे, त्यांच्या समस्या समजून घेण्याचे आणि त्यावर उपाय शोधण्याचे आवाहन केले.
सत्तरीतील ६० वर्षांची राजेशाही संपवून लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी सज्ज राहा, असे आवाहन गिरीष चोडणकर यांनी केले. जनतेच्या हितांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. या वेळी कार्याध्यक्ष तथा आमदार कार्लूस फेरेरा, प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा प्रतिक्षा खलप, सरचिटणीस प्रदीप नाईक तसेच उत्तर गोवा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शशांक नार्वेकर उपस्थित होते.
साखळी काबीज करण्याचा निर्धार
गत विधानसभा निवडणुकीत पोस्टल मतांच्या आधारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विजय मिळवला होता. मात्र यावेळी काँग्रेस कसूर ठेवणार नाही. साखळी मतदारसंघ काबीज करूनच स्वस्थ बसणार, असा निर्धार गिरीष चोडणकर यांनी व्यक्त केला.
साखळी गट काँग्रेस समितीच्या बैठकीत प्रभारी माणिकराव ठाकरे, सचिव तथा सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, प्रदेशाध्यक्ष गिरीष चोडणकर, प्रदेश महिला अध्यक्ष प्रतिक्षा खलप, नगरसेवक प्रवीण ब्लेगन, सरचिटणीस प्रदीप नाईक, संयोजक सूर्यकांत गावडे, माजी आमदार प्रताप गावस, महिला काँग्रेस गट अध्यक्षा प्रसादिनी, माजी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी, कार्यकारिणी सदस्य सुनीता वेरेकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांवर घणाघात
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर टीका करताना गिरीष चोडणकर यांनी त्यांची तुलना लखम सावंत यांच्याशी केली. ज्या लखम सावंताने स्वतःच्या स्वार्थासाठी साखळी-डिचोली प्रांत पोर्तुगीजांच्या हवाली केला, त्याचप्रमाणे प्रमोद सावंत गोव्याची जमीन, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि भवितव्य बाहेरील बिल्डर्स व स्वार्थी घटकांच्या हवाली करत आहेत, असा घणाघात त्यांनी केला.
गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी कथित ‘नोकरीसाठी पैसे’ घोटाळ्याचा तीव्र निषेध करताना साखळीतील एका राजकीयदृष्ट्या प्रभावशाली महिलेच्या माध्यमातून हे रॅकेट चालवले जात असल्याचा आरोप केला.
सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांनी आपल्या भाषणात काँग्रेस कार्यकर्त्यांना तळागाळाशी अधिक दृढ संपर्क प्रस्थापित करण्याचे आवाहन केले. युवक, शेतकरी, महिला आणि समाजातील दुर्बल घटकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडून जनतेचा खरा आवाज बनण्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. जनतेच्या प्रश्नांशी सातत्याने जोडलेली, लोकाभिमुख आणि सक्षम संघटना उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.





