सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ; दोषसिद्धीचे प्रमाण घटले
गांवकारी,दि.१ (प्रतिनिधी)
राज्याची ओळख दिवसेंदिवस ‘गुन्हेगारीची राजधानी’ अशी होत चालली आहे. वाढते गुन्हे आणि कमी होत असलेले दोषसिद्धीचे प्रमाण ही राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या अपयशाचे भयावह चित्र दर्शवते, असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विधानसभेत केला. मात्र, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २०२१ ते २०२५ या कालावधीत राज्यात ९६५ प्रकरणांमध्ये गुन्हेगार दोषी आढळून आल्याचे सांगितले.
राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्याने विधानसभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. विशेषतः सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ होत असल्याचा मुद्दा आलेमाव यांनी उपस्थित केला. सायबर गुन्ह्यांची नोंद २०२१ मध्ये ३२ होती, ती वाढून १२० वर पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षांत गुन्ह्यांच्या अनेक गंभीर प्रकारांमध्ये एकही दोषी आढळून आला नसल्याचा दावाही त्यांनी केला.
वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सरकारकडून कोणती पावले उचलली जात आहेत, तसेच कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असा सवाल आलेमाव यांनी मुख्यमंत्र्यांना केला.
यावर मुख्यमंत्री सावंत यांनी २०२१ ते २०२५ या कालावधीतील दोषसिद्धीची आकडेवारी सभागृहात मांडली. त्यानुसार खूनाच्या चार, खुनाचा प्रयत्न तीन, बलात्काराच्या १४, अमली पदार्थांशी संबंधित ४१, जुगाराच्या ८३ आणि सायबर गुन्ह्यांच्या दोन प्रकरणांत दोषसिद्धी झाल्याचे त्यांनी सांगितले.
सायबर गुन्ह्यांबाबत मुख्यमंत्र्यांचा इशारा
राज्यात १४५ सायबर गुन्ह्यांची प्रकरणे शोधून काढण्यात आली असून, त्यापैकी दोन प्रकरणांत दोषसिद्धी झाली आहे. उर्वरित प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत, असे सावंत यांनी स्पष्ट केले.
२००७ ते २०११ या कालावधीतील गुन्हेगारीचे प्रमाण गेल्या १५ वर्षांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या अधिक होते. २०११ नंतर गोव्यातील एकूण गुन्हेगारीचा आलेख घसरला असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील वाढत्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून होणाऱ्या सायबर फसवणुकीत वाढ झाली असून, काही मिनिटांतच सायबर भामटे नागरिकांच्या बँक खात्याची माहिती मिळवून पैसे काढू शकतात, असे सावंत यांनी सांगितले.
कुरिअर किंवा पार्सल ट्रॅक करण्याच्या नावाखाली नागरिकांना बनावट लिंक पाठवल्या जातात. या लिंकवर क्लिक केल्यानंतर सायबर भामट्यांना मोबाईलशी जोडलेल्या बँक खात्यांची माहिती मिळू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.





