वासंतीचे हौतात्म्य न्याय मागते

न्याय मिळवून देण्याऐवजी वेळकाढूपणा करण्यात आला. हीच सरकारी उदासीनता तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरली, असा लोकांचा ठाम विश्वास आहे.

कारापूरमधील आदिवासी महिला वासंती रामा सालेलकर हिचा संशयास्पद मृत्यू हा केवळ एका व्यक्तीचा अंत नाही, तर संपूर्ण आदिवासी आणि बहुजन समाजाच्या हक्कांवर झालेला आघात आहे. आपल्या वडिलोपार्जित जमिनीच्या अधिकारासाठी तिने अनेक वर्षे एकाकी झुंज दिली. भाटकार आणि बिल्डरांच्या दबावाला न जुमानता तिने न्यायासाठी लढा दिला. मात्र तिच्या मृत्यूने अनेक प्रश्न उभे केले आहेत. हा खरोखरच विजेचा अपघात होता की नियोजित घातपात?
वासंतीचे प्रकरण कुळ कायद्याअंतर्गत मामलेदार कार्यालयात अनेक वर्षे प्रलंबित होते. सरकारी यंत्रणेकडून तिच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाले. सामाजिक संघटनांनी तिचा विषय आदिवासी आयोगापर्यंत पोहोचवला, तरीही काही निष्पन्न झाले नाही. न्याय मिळवून देण्याऐवजी वेळकाढूपणा करण्यात आला. हीच सरकारी उदासीनता तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरली, असा लोकांचा ठाम विश्वास आहे.
वासंतीवर यापूर्वी अनेक हल्ले झाले होते – चाकूने व लोखंडी रॉडने मारहाण, विहिरीत विष टाकण्याचा प्रयत्न, शौचालयात माती टाकून त्रास देणे, भावाचा संशयास्पद मृत्यू. या सर्व घटनांमुळे तिच्या संघर्षाची तीव्रता आणि धैर्य स्पष्ट होते. तरीही तिने हार मानली नाही. सामाजिक संघटनांच्या मदतीने तिने निवेदने सादर केली, पण प्रत्यक्ष मदतीला कोणीही पुढे आले नाही. शेजाऱ्यांनी केवळ सहानुभूती दाखवली, पण उघडपणे साथ दिली नाही. एका गरीब महिलेकडून तब्बल ५२ हजार चौ. मीटर जमिनीसाठी सुरू असलेला लढा हा भाटकार आणि बिल्डरांना अजिबात रुचणारा नव्हता. हाच कारापूर गाव सध्या लोढा कंपनीच्या मेगा प्रकल्पामुळे चर्चेत आला आहे. ह्याच गावातील सातार्डेकर कुटुंबाचाही जमीन मालकीचा विषय सुरू आहे. परंतु जमीन मालकीचा हक्क सांगणारी कागदपत्रे आणि पुरावे असूनही सत्ता आणि पैशांच्या दबावापोटी त्यांच्या दाव्यांकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही, ही खरोखरच आपल्या लोकशाही व्यवस्थेची थट्टाच ठरली आहे.
राज्यात बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. त्यांच्या संघर्षाची माहिती दिली जाते. पण वासंतीसारख्या महिलांच्या लढ्याला प्रत्यक्ष पाठबळ देण्याची तयारी कुणी दाखवत नाही. बिरसा मुंडा यांनी शिकवले की जमीन, जंगल आणि पाणी हेच जीवनाचे आधार आहेत. वासंतीचा संघर्ष हाच संदेश पुन्हा अधोरेखित करतो.
गाकुवेधचे नेते रामकृष्ण जल्मी आणि ॲड. अजय प्रभूगांवकर यांनी वासंतीच्या मृत्यूमागे घातपात असण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यांनी एसआयटी किंवा सीबीआय तपासाची मागणी केली आहे. हा तपास निष्पक्षपणे झाला नाही तर आदिवासी समाजाचा विश्वास पूर्णपणे ढासळेल.
वासंती सालेलकर ही आदिवासी महिला आपल्या जमिनीच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढली. तिचा मृत्यू हा अपघात नसून आदिवासी समाजाच्या संघर्षाचे प्रतीक आहे. या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने झाला पाहिजे आणि तिच्या बहिणींना तरी जमिनीचा हक्क मिळाला पाहिजे. अन्यथा वासंतीचा आत्मा शांत बसणार नाही. हा अग्रलेख केवळ वासंतीच्या मृत्यूबाबत नाही, तर आदिवासी समाजाच्या न्यायासाठीच्या लढ्याचा आवाज आहे. सरकारने आणि समाजाने या आवाजाला प्रतिसाद दिला नाही, तर इतिहास त्यांना कधीच माफ करणार नाही.

  • Related Posts

    तरुणाईचा हुंकार हरवतोय का?

    आज गरज आहे ती भीती झटकण्याची, स्वार्थ बाजूला ठेवण्याची, प्रश्न विचारण्याची आणि लोकशाही मार्गाने संघटित होण्याची. तरुणाई ही कोणत्याही समाजाची ऊर्जा असते. समाजाचे वर्तमान आणि भविष्य यांच्यामधील सर्वांत मजबूत पूल…

    चटका लावणारी एक्झिट

    डॉ. केतन भाटीकर यांच्या अकाली आणि दुर्दैवी निधनाने फोंडा तालुक्यासह संपूर्ण गोवा हळहळला आहे. एका तरुण, ऊर्जावान, समाजाभिमुख आणि राजकीय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करू पाहणाऱ्या नेतृत्वाचा असा अचानक अंत…

    You Missed

    वाडे-कुर्डी सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात जीएसएससी परीक्षांसाठी मोफत कोचिंग

    वाडे-कुर्डी सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात जीएसएससी परीक्षांसाठी मोफत कोचिंग

    सुर्लातील खाण भरपाईचे राजकारण ?

    सुर्लातील खाण भरपाईचे राजकारण ?

    तरुणाईचा हुंकार हरवतोय का?

    तरुणाईचा हुंकार हरवतोय का?

    मायेची सावली हरपली…

    मायेची सावली हरपली…

    गोव्याला जबाबदार विरोधकांची गरज

    गोव्याला जबाबदार विरोधकांची गरज

    Goa’s Future Rests on the Shoulders of Youth

    Goa’s Future Rests on the Shoulders of Youth