राजधानीला ‘मुंबई’ बनवण्याचा घाट का ?

पूरप्रवण क्षेत्रात उंच इमारतींना परवानगी – गोवा बचाव अभियानाचा आरोप

गांवकारी, दि. २३ (प्रतिनिधी)

पणजी शहरात सध्या बाह्य विकास आराखड्यातील झोन बदलून मोठ्या प्रमाणात सरकारी जमिनीतील अधिसूचित पूरप्रवण क्षेत्रात उंच इमारत बांधकामांना परवानगी दिली जात आहे. या बांधकामांमुळे शहराच्या पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहेच, परंतु हरित क्षेत्र म्हणून संरक्षित होण्याची गरज असलेल्या या जमिनींच्या अशा वापरामुळे राजधानीवर दूरगामी परिणाम उद्भवणार असल्याची भीती गोवा बचाव अभियानाने व्यक्त केली आहे.
गोवा बचाव अभियानाच्या निमंत्रक सेबिना मार्टीन्स आणि सचिव रूबीना सहा यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्याचे वनमंत्री म्हणून विश्वजीत राणे एकीकडे शहरात “ग्रीन लंग्स” तयार करण्याची घोषणा करतात, तर नगर विकासमंत्री म्हणून पणजीतील शेवटच्या खुल्या जागांवर मोठ्या प्रमाणात सिमेंटच्या इमारती उभ्या राहण्याबाबत ते शांत राहतात. पणजी शहराचे रूपांतर मुंबईसारख्या वाढीव एफएआर आणि उंच इमारतींत करण्याचा सरकारचा नेमका हेतू काय आहे, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. हे नियोजन त्या भागाच्या पायाभूत सुविधांसाठी अनुकूल नाही, असेही त्यांनी सांगितले.
लोकांच्या जीविताला भविष्यात धोका
गोवा बचाव अभियानाने पणजी बाह्य विकास आराखड्याला आव्हान दिले असून त्याच्या कार्यवाहीला स्थगिती मिळवली आहे. केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने राज्यातील पूरप्रवण क्षेत्र अधिसूचित केल्यामुळे या जमिनींचे संरक्षण झाले होते. मात्र, आता सरकार पूरप्रवण क्षेत्रात विकासकामांना परवानगी देत असल्याने गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन अधिकारिणीच्या अधिसूचनेचा भंग करत आहे, असे सेबिना मार्टीन्स यांनी सांगितले. अशा प्रकारच्या विकासामुळे लोकांच्या जीविताला आणि मालमत्तेला धोका पोहोचणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
सार्वजनिक हिताला प्राधान्य द्यावे
या क्षेत्रांमध्ये पणजी पार्क, शासकीय जलतरण तलावाजवळील पार्किंग आणि मिरामार बीच जवळील फूडलँड या ठिकाणी मोठ्या व्यावसायिक बांधकामांना मंजुरी देण्यात आली आहे. हे शहराच्या जलकाठाच्या अंतिम सार्वजनिक/मनोरंजन क्षेत्रांपैकी एक असून त्यांना हिरव्या फुफ्फुसांसारखे राखले पाहिजे. पर्यावरण संवेदनशील क्षेत्र किंवा पूरप्रवण क्षेत्रांचा विकास करताना दूरदृष्टीने त्याचा विचार होणे आवश्यक आहे.
भविष्यात या निर्णयांचे परिणाम लोकांच्या जीवावर आणि पर्यावरणावर गंभीरपणे होतील, ज्याचा मोठा फटका संपूर्ण राज्याला बसेल. नगर विकासमंत्री विश्वजीत राणे यांनी यावर गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यांनी सार्वजनिक हिताला प्राधान्य देऊन योग्य नियोजनानुसार परवानगी देण्याची मागणी गोवा बचाव अभियानाने केली आहे.

  • Related Posts

    टीसीपीच्या कलम ३९ (ए) चे वस्त्रहरण

    निवृत्त न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांचे खरमरीत पत्र गांवकारी, दि. ६ (प्रतिनिधी) गोवा विधानसभेने मंजूर केलेले नगर नियोजन कायद्याचे कलम ३९ (ए) हे पूर्णपणे बेकायदेशीर असून मनमानी स्वरूपाचे आहे. या कायद्याअंतर्गत…

    स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल

    राजकीय शक्तीचे पाठबळ, स्थानिकांची नाराजी गांवकारी, दि. ५ (प्रतिनिधी) वास्को येथे विरोध झाल्यानंतर फॉर्म्युला-४ स्ट्रीट रेस स्पर्धा आता मोपा विमानतळ परिसरात आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने मोपा भूपीडित…

    You Missed

    तुयेत एम्सचा विचार व्हावा

    तुयेत एम्सचा विचार व्हावा

    टीसीपीच्या कलम ३९ (ए) चे वस्त्रहरण

    टीसीपीच्या कलम ३९ (ए) चे वस्त्रहरण

    06/02/2026 e-paper

    06/02/2026 e-paper

    विरोधकांच्या अस्तित्वाची कसोटी

    विरोधकांच्या अस्तित्वाची कसोटी

    स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल

    स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल

    05/02/2026 e-paper

    05/02/2026 e-paper