त्वरीत रद्द न केल्यास चिपको आंदोलन
गांवकारी, दि. २० (प्रतिनिधी)
पेडणे तालुक्यातील भटवाडी-हरमल येथे परप्रांतीयांनी विकत घेतलेल्या सुमारे ३ लाख ५ हजार चौ. मीटर जमिनीच्या भूरूपांतरावरून स्थानिक लोक आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन हे भूरूपांतर तात्काळ रद्द करण्याची मागणी त्यांनी केली; अन्यथा चिपको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
हरमल येथे सर्वे क्रमांक २७५/० आणि २४२/० याठिकाणी किशोर कुमार काया आणि कैलाश राजेंद्र सिंगला यांनी विकत घेतलेल्या सुमारे ३ लाख ५ हजार चौ. मीटर जमिनीच्या झोन बदलासाठी नगर नियोजन खात्याने ३९(ए) अंतर्गत अधिसूचना जारी केली आहे. एका वर्षापूर्वीच येथे सुरू झालेल्या हालचालींनी स्थानिकांमध्ये संशय निर्माण झाला होता. अलिकडेच या संपूर्ण जमिनीला तारेचे कुंपण घालून पारंपरिक पायवाटा अडवण्याचा प्रकार घडला. या प्रकाराला स्थानिकांनी विरोध दर्शवल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भटवाडी गावचे जीवनाचे स्त्रोत
भटवाडी गावच्या माथ्यावरील हा पठार म्हणजे नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत, शेती, बागायतींची जमीन तसेच वृक्षवेलींनी व्यापलेली जागा आहे. या ठिकाणी स्मशानभूमी आणि क्रीडामैदान देखील आहे. ही संपूर्ण जागा आता सेटलमेंट झोनमध्ये बदलून घेण्याचा घाट परप्रांतीयांनी घातला आहे. स्थानिक पंचायत किंवा ग्रामस्थांना याबाबत काहीच कल्पना नव्हती; केवळ अधिसूचना जारी झाल्यानंतरच हा डाव लक्षात आला, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
चिपको आंदोलनाची तयारी
भटवाडी-हरमलवासीयांनी आमदार जीत आरोलकर यांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. हे भूरूपांतर हरमल गावच्या अस्तित्वावरच घाव ठरणार आहे. या भूरूपांतरामुळे लाखो झाडांची कत्तल होईल आणि त्यामुळे हरमलवासीय चिपको आंदोलन करून या झाडांचे रक्षण करण्यासाठी सज्ज असल्याची कल्पना त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. मुख्यमंत्र्यांनी आपण ह्यात लक्ष घालून काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन हरमलवासीयांना दिल्याची माहिती आत्माजी नाईक यांनी दिली.





