काँग्रेसला शहाणपण सूचेल?

काँग्रेसने आपल्या वर्चस्वाच्या जुन्या इतिहासाच्या गंजलेल्या आठवणींना कितीही उजाळा देण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांना पुन्हा एकहाती सत्ता मिळणे शक्य नाही हे त्यांनी जाणले पाहिजे.

भाजपचे २८, मगोपचे दोन आणि तीन अपक्ष मिळून ३३ आमदारांचा पाठींबा असलेल्या भाजप आघाडीला जिल्हा पंचायत निवडणुकीत ३३ जागा प्राप्त झाल्या. १७ ठिकाणी विरोधकांनी यश संपादन केले, ही आकडेवारी भाजपची चिंता वाढवणारी ठरली आहे. काँग्रेसला नेस्तनाबूत करणे हे भाजपचे प्रमुख उद्दिष्ट असले तरी २०२० मध्ये फक्त ४ ठिकाणी विजयी ठरलेली काँग्रेस आता १० आकड्यांवर पोहोचली आहे. अर्थात, यातील ७ जागा या केवळ सासष्टीतील आहेत, ही जमेची बाजू आहे.
सासष्टी हा काँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी सासष्टीचे काँग्रेस आमदार फुटून भाजपामध्ये सामील होऊ शकतात, हे भाजपने सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे भाजपला त्याची चिंता नसेल. भाजपसमोर एकच आव्हान उभे राहणार आहे ते म्हणजे कुठल्याही परिस्थितीत विरोधकांची एकजूट होऊ नये. त्यासाठीची सगळी शक्कल भाजप लढवणार आहे, हे निश्चित.
जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप आघाडीने यश मिळवले असले तरी निकालांतून विरोधकांच्या मतविभागणीचा फायदा सत्ताधारी गटाला झाला, हे सर्वश्रुत आहे. विरोधक एकत्र आल्यास भाजपला अनेक ठिकाणी अडचणी निर्माण होतील. विरोधकांना कायम विभागून ठेवणे आणि त्यांना एकत्र येण्यापासून रोखणे यासाठी भाजपला आपली कूटनीती आखावी लागणार आहे. विरोधकांच्या दुखऱ्या नसा पकडल्या की ते विरोधात राहूनच भाजपसाठी काम करतात, हे वारंवार दिसून आले आहे. अशा दुखऱ्या नसा असणारे अनेकजण विरोधात असल्यामुळे या कूटनीतीचा उपयोग भाजप कशा प्रकारे करतो आणि विरोधकांना विस्कळीत ठेवून २०२७ मध्ये यश मिळवतो, ही त्यांच्यासाठी सर्वांत महत्त्वाची रणनिती ठरणार आहे.
जिल्हा पंचायत निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांनी काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांची सोशल मीडियावरून माफी मागितली. “आघाडी होऊ शकली नाही म्हणून नैराश्य आले आणि त्यातून हे शब्द तोंडातून निघाले” असे त्यांनी प्रांजळपणे मान्य केले. मनोज परब यांचा आक्रमक स्वभाव आणि काही प्रमाणात होणारी हेकेखोरी पाहता त्यांनी जाहीर माफी मागून आपल्या स्वभावाला मुठमाती देण्याचा प्रयत्न केला, असे दिसते. त्यांनी विरोधकांत एक सकारात्मक संदेश पाठवला आहे. “झाले गेले गंगेला मिळाले, किमान आता तरी चुकांतून काहीतरी बोध घेऊन पुढे जाऊ” असेच त्यांच्या कृतीतून दिसते.
आता विरोधक त्यांचा हा पवित्रा कसा घेतात, हे महत्त्वाचे आहे. कदाचित मनोज परब यांच्या थिवी मतदारसंघात काँग्रेसने यश मिळवले आहे. त्यांचा प्रभाव तिथे दिसला नाही म्हणून त्यांनी शरणागती पत्करली, असा अर्थ अनेकांनी लावला आहे. ते काहीही असले तरी शरणागती पत्करणे ही मोठी गोष्ट आहे आणि त्याचा सकारात्मक विचार विरोधकांनी करणे अपेक्षित आहे.
आरजीपीने विविध मतदारसंघात मिळवलेल्या मतांकडे काँग्रेसला दुर्लक्ष करता येणार नाही. गोवा फॉरवर्ड, आप काय करतील हे माहित नाही, परंतु आरजीपीसारख्या प्रादेशिक पक्षाशी काँग्रेसची युती झाली तरी त्याचा फायदा विरोधकांना होऊ शकतो. बिहारात भाजपने नितीश कुमार यांना जवळ केले. महाराष्ट्रात शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेतले. तेच धोरण काँग्रेसला स्वीकारावे लागणार आहे.
काँग्रेसने आपल्या वर्चस्वाच्या जुन्या इतिहासाच्या गंजलेल्या आठवणींना कितीही उजाळा दिला तरी त्यांना पुन्हा एकहाती सत्ता मिळणे शक्य नाही, हे त्यांनी जाणले पाहिजे. काँग्रेसला शहाणपण आले तरच भाजपला सत्तेपासून दूर करणे शक्य आहे.

  • Related Posts

    सांगेतील वादावर पडदा

    कार्यकर्त्यांचे गैरसमज दूर झाल्याचा दामू नाईक यांचा दावा गांवकारी, दि. १० (प्रतिनिधी) समाजकल्याणमंत्री तथा सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी केलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी भाजप मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक…

    Private Bus Operators Seek CM’s Directive to Halt Further KTCL EV Bus Induction

    Panaji, August 2: RTI activist Sudip Narayan Tamankar has written to Chief Minister Dr. Pramod Sawant requesting an official directive restraining the Kadamba Transport Corporation Ltd. (KTCL) from hiring or…

    You Missed

    गोवा काँग्रेसच्या कामकाजाचा तातडीने आढावा घ्या

    गोवा काँग्रेसच्या कामकाजाचा तातडीने आढावा घ्या

    Independence Day Hypocrisy: Mahila Congress Corners Goa Govt Over 3-Day Mandrem ‘Freedom Blast’

    Independence Day Hypocrisy: Mahila Congress Corners Goa Govt Over 3-Day Mandrem ‘Freedom Blast’

    ‘२०२७ मध्ये नोकऱ्या’ हे बेरोजगार युवकांच्या जखमेवर मीठ

    ‘२०२७ मध्ये नोकऱ्या’ हे बेरोजगार युवकांच्या जखमेवर मीठ

    Who Will Be Goa University’s 10th Vice-Chancellor?

    Who Will Be Goa University’s 10th Vice-Chancellor?

    15/08/2026 e-paper

    15/08/2026 e-paper

    कौन बनेगा (गोवा विद्यापीठाचा) कुलगुरू???

    कौन बनेगा (गोवा विद्यापीठाचा) कुलगुरू???