पण जेव्हा प्रेम, करूणा, दया आणि एकसंघतेचे महत्त्व लक्षात आले, तेव्हाच माणसाला खऱ्या आयुष्याची ओळख झाली. आपण मात्र पुन्हा एकदा त्याच जंगलराजत्या दिशेने वाटचाल करत नाही ना, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.
येशू ख्रिस्ताचा जन्म हा केवळ धार्मिक घटना नाही. तो मानवतेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. बेथलेहेमच्या एका साध्या गोठ्यात झालेला त्यांचा जन्म जगाला साधेपणा, करुणा आणि प्रेमाचा संदेश देणारा ठरला. राजेशाही वैभव किंवा संपत्ती यांचा त्याच्याशी संबंध नव्हता; उलट साधेपणातूनच देवत्व प्रकट होते, हे त्यांनी दाखवून दिले. त्या काळात समाजात अन्याय, विषमता आणि असहिष्णुता वाढली होती. रोमन साम्राज्याच्या अधिपत्याखाली सामान्य जनतेचे जीवन कठीण झाले होते. अशा परिस्थितीत येशूचा जन्म झाला आणि त्यांनी प्रेम, क्षमा व शांततेचा मार्ग दाखवला.
आजच्या काळात जगभरात असहिष्णुता, धार्मिक कट्टरतावाद आणि दहशतवादाचे सावट पसरलेले दिसते. धर्माच्या नावाखाली हिंसा केली जाते, समाजात द्वेष पसरवला जातो आणि मानवी मूल्यांचा अवमान केला जातो. अशा वेळी येशू ख्रिस्ताचा जन्म आपल्याला आठवण करून देतो की खरी शक्ती प्रेमात आहे, खरी संपत्ती करुणेत आहे आणि खरा धर्म मानवतेत आहे. येशूने दिलेला संदेश केवळ त्याकाळापुरता मर्यादित नसून आजच्या जगासाठीही तितकाच महत्त्वाचा आहे.
अर्थात, लगेच युक्तिवाद केला जातो – हा मानवतावाद मुस्लीमांना का शिकवत नाही? हे धडे केवळ हिंदूंनाच लागू होतात काय? प्रत्येक दहशतवादी घटनांमागे ठरावीक धर्माचेच लोक का आढळतात? सेवा, करूणा, दयेच्या नावाखाली हिंदूंना बाटवण्याचे काम का करावे? या लोकांच्या धर्माचा आदर करून त्यांची सेवा करता येत नाही काय? असे प्रश्न विचारले जातात. या युक्तिवादाला कितीही प्रतीयुक्तिवाद केले तरी समाधान होणार नाही. पण मुळात एका ठरावीक धर्माच्या विरोधात इतकी असूया योग्य आहे का, याचाही विचार होणे गरजेचे आहे.
दहशतवाद हा मानवतेविरोधी अपराध आहे. तो भय, हिंसा आणि द्वेष यांवर आधारलेला आहे. येशूने मात्र शत्रूवरही प्रेम करण्याचा आणि क्षमा करण्याचा उपदेश दिला. हा विचार आजच्या संघर्षमय जगात शांततेचा मार्ग दाखवतो. धार्मिक कट्टरतावाद समाजाला विभागतो, तर येशूने समानतेचा विचार मांडला. गरीब–श्रीमंत, उच्च–नीच यांच्यातील भेदभाव नाकारून सर्वांना समानतेने वागवण्याचा आग्रह त्यांनी केला. धार्मिक कटूता समाजात वैर निर्माण करते, तर येशूने प्रेम आणि करुणेचा धडा दिला.
आज आपण पाहतो की धर्माच्या नावाखाली राजकारण केले जाते, समाजात फूट पाडली जाते आणि हिंसेला खतपाणी घातले जाते. अशा वेळी येशू ख्रिस्ताचा जन्म हा मानवतेचा उत्सव आहे, जो आपल्याला सांगतो की धर्माचा खरा अर्थ प्रेम, करुणा आणि शांततेत आहे. ख्रिसमस साजरा करताना आपण केवळ उत्सवाच्या बाह्य स्वरूपात रमू नये, तर येशूने दिलेला संदेश आपल्या जीवनात उतरवावा.
जगाला आज सर्वाधिक गरज आहे ती सहिष्णुतेची, परस्पर आदराची आणि शांततेची. येशू ख्रिस्ताचा जन्म आपल्याला हेच शिकवतो की हिंसा आणि द्वेषाने कोणतेही प्रश्न सुटत नाहीत. प्रेम, क्षमा आणि करुणा यांतच मानवतेचे खरे समाधान आहे. माकडाच्या रूपातून माणसात आलेल्या मनुष्याला माणूस म्हणून जगण्याची अक्कल यायला बराच काळ लागला. कारण प्रारंभीपासूनच युद्ध आणि हिंसेची लागलेली चटक. पण जेव्हा प्रेम, करूणा, दया आणि एकसंघतेचे महत्त्व लक्षात आले, तेव्हाच माणसाला खऱ्या आयुष्याची ओळख झाली. आपण मात्र पुन्हा एकदा त्याच जंगलराजत्या दिशेने वाटचाल करत नाही ना, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.






