गोव्याच्या रक्षणार्थ गोंयकारांचा जनउठाव
गांवकारी, दि. ६ (प्रतिनिधी)
निवृत्त न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांनी गोवा वाचवण्यासाठी गोंयकारांना एकत्र येण्याची दिलेली हाक जनउठावात रूपांतरीत होण्याची शक्यता आहे. आज दुपारी गोंयकारांचा प्रचंड जनसागर राजधानीत लोटणार आहे. दुपारी ३.३० वाजता इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात खास बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीत गोवा वाचवण्यासाठी जनतेचा हुकुमनामा घोषित केला जाणार आहे.
राज्य सरकारचे विविध निर्णय आणि धोरणे ही राज्याच्या हिताआड जात आहेत. विशेषतः मर्यादित जमीन संसाधनांचा पूर्णपणे दुरुपयोग सुरू आहे. परप्रांतीय बिल्डर लॉबी आणि पर्यटनाच्या नावाखाली उद्योग लॉबी जमिनी विकत घेऊन त्यांचे रूपांतरण करण्याचा सपाटा सुरू आहे. शेती, बागायती, नद्या, डोंगर, पठारे, तलाव आणि जैवविविधता नष्ट होत आहे. बेरोजगारीमुळे त्रस्त युवा पिढी जलद पैशांच्या मागे धावून ड्रग्स, कॅसिनो आणि रिअल इस्टेट एजंटगिरीला बळी पडत आहे. या गोष्टींना वेळीच आळा घातला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि आपला गोवा परप्रांतीयांच्या हाती पडेल, अशी भीती फेर्दिन रिबेलो यांनी व्यक्त केली आहे.
या अनुषंगाने त्यांनी जनतेचा हुकुमनामा तयार करून संपूर्ण गोंयकारांनी एकमुखी मागणी करून सरकारला या हुकुमनाम्याची कार्यवाही करण्यास भाग पाडायला हवे, असे म्हटले आहे. याच अनुषंगाने या लोकचळवळीची पुढील दिशा ठरविण्यासाठी आजची बैठक बोलावण्यात आली आहे.
हरमलच्या लढ्याने दिली प्रेरणा
हरमलवासीयांनी सुमारे ३.५ लाख चौ.मी. जमिनीच्या रूपांतरणाविरोधात आयोजित केलेली मशाल मिरवणूक आणि भव्य सभा, तसेच त्यानंतर सरकारने रद्द केलेले भूरूपांतर हीच या लोकलढ्याची प्रेरणा ठरली. या लढ्याच्या अनुषंगानेच फेर्दिन रिबेलो यांनी ही मशाल आता संपूर्ण गोवाभर पोहोचली पाहिजे आणि भावी पिढीसाठी गोव्याचा सांभाळ करण्यासाठी गोंयकारांनी बाहेर पडले पाहिजे, अशी हाक सोशल मीडियावरून दिली होती. या हाकेला सर्व थरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि त्यातूनच या लढ्याला दिशा मिळवून पुढील कृती आराखडा तयार करण्यासाठीच या बैठकीचे आयोजन केले आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रतिसाद
फेर्दिन रिबेलो यांच्या हाकेला प्रतिसाद देत विविध क्षेत्रातील ज्येष्ठ मंडळी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे ठरवले. याचा भाग म्हणूनच या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत गोव्यासमोरील विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून जनतेचा जाहीरनामा/हुकुमनामा तयार केला जाईल. या हुकुमनाम्यानुसारच सरकारने पुढे जावे, अन्यथा सरकारला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात येणार आहे.
अलोट गर्दीची अपेक्षा
या सभेला राज्यभरातून अलोट गर्दी उसळण्याची शक्यता आहे. पोलिसांनी अंदाज घेऊन सुरक्षेसाठी कडक उपाययोजना आखल्या आहेत. सभागृहातील आसनव्यवस्था मर्यादित असल्याने गर्दी वाढल्यास येथील आझाद मैदानावर स्क्रीनची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या सभेकडे सरकारचे विशेष लक्ष लागले आहे. ही सभा सरकारविरोधी जनउठावाला कारणीभूत ठरू नये, यासाठी सरकारची सावध पावले सुरू आहेत. सर्वांनीच या सभेचा धसका घेतला असून ही घडामोड राज्यातील राजकीय व सामाजिक असंतोषाला वाट मोकळी करून देणारी ठरली तर सरकार अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.






