२ कोटींचा घोटाळा,२० हजाराचा बेल

जिथे बेरोजगारांची आणि विशेष करून तरूणाईच्या गुणवत्तेची आणि कौशल्याची फजिती होते ते राज्य किंवा तो देश प्रगती करू शकत नाही हे लक्षात घेण्याची गरज आहे

सरकारी नोकऱ्यांच्या विक्री प्रकरणात आज मुख्य संशयीत पुजा नाईक हीला प्रथमवर्ग न्यायालयाकडून २० हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर आणि अन्य अटींवर सशर्त जामीन अखेर मंजूर झाला. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात किमान २ कोटी रूपयांची माया तिने सरकारी नोकरी देण्याच्या निमित्ताने जमवल्याचा अंदाज आहे आणि तिला केवळ २० हजार रूपयांच्या हमीवर जामीन मिळतो, ही गोष्ट काय म्हणावी. अर्थात न्यायालयांना प्राप्त कायद्यांनुसारच आपला न्यायनिवाडा करावा लागतो. पण आपले कायदे आणि नियमच कमकुवत असतील आणि ते अशा तऱ्हेने वापरले जात असतील तर मग पुजा नाईक हीच्यासारख्यांना वचक बसणार तरी कसा. एका वर्षापूर्वी अशाच दोन ठकसेनांना पोलिसांनी अटक केली होती. त्या दोघांना आठवडाभर कोठडीही झाली होती. पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. ३१ जणांनी तक्रारी नोंदवल्या होत्या, त्यापैकी कितीजणांची वसूली झाली हे माहित नाही. माणसाने शरम जर सोडली तर त्याला कशाचीही भीती राहत नाही. सर्वसामन्य माणूस केवळ लाजलज्जा किंवा शरम या गोष्टीतच गुरफटून राहतो. पुजा नाईक हीच्यासारखी माणसे मात्र ही शरमबरम सगळे काही सोडून बिनधास्तपणे लोकांना टोपी घालतात आणि मस्तपैकी एषारामात आपले आयुष्य जगतात. कुणीतरी तक्रार केलीच तर जास्तीज जास्त काय होणार. तीन चार दिवस तुरूंगात राहून आता ती बिनधास्त घरी जाणार. पोलिस तपास आणि कारवाईचा ससेमीरा मागे असणारच पण एवढे धाडस केलेल्या माणसांना त्याचे दडपड राहण्याची शक्यता तशी कमीच म्हणावी लागेल.
पुजा नाईक हीला घाबरण्याचे कारण नाही कारण पैसे घेऊन नोकरी देण्याच्या या भानगडीत ती एकटीच नाही. ही एक मोठी साखळीच आहे. एखाद्याला नोकरी देण्याचे ठरले की मग त्याला लेखी परीक्षेत पास करायचे, मुलाखतीवेळी तो अंतिम यादीत येईल याची खातरजमा करायची आणि मग त्याला नियुक्तीपत्र द्यायचे. ही सगळी प्रक्रिया एकटी पुजा नाईक करू शकत नाही. अगदी संबंधीत खात्याचे अधिकारी आणि मंत्री किंवा अगदीच विश्वासातील आमदार सहभागी असल्याशिवाय हे होणे शक्य नाही. आता मुख्यमंत्री खरोखरच इतक्या खोल जाऊन त्याचा शोध घेऊ शकतील का, हा वेगळाच प्रश्न आहे.
पुजा नाईक प्रकरणातून काल एका कार्यक्रमांत बोलताना मुख्यमंत्र्यांनी नोकरी विक्री प्रकरणात मंत्र्यांना क्लीनचीट देण्याचा प्रयत्न केला. मंत्र्यांच्या नकळत पुजा नाईक सारखी लोकं लोकांना फसवून पैसे घेतात,असे त्यांना सांगायचे होते. पण पुजा नाईक हीने दहा जणांना नोकरी दिली, ती कशी काय हे मात्र ते सांगत नाहीत. ज्याला नोकरी मिळाली तोच तर पुजा नाईकची जाहीरात करेल आणि हीच्याकडे शंभर टक्के काम होते,असे म्हणून लोकांना विश्वास तयार करेल. सरकारी नोकऱ्यांच्या नावे जाहीरात प्रसिद्ध करणे आणि हजारो बेरोजगारांनी या पदांसाठी अर्ज सादर करून या प्रक्रियेला सामोरे जाणे ही एक निव्वळ थट्टा असते. जिथे बेरोजगारांची आणि विषेश करून तरूणाईच्या गुणवत्तेची आणि कौशल्याची फजिती होते ते राज्य किंवा तो देश प्रगती करू शकत नाही हे लक्षात घेण्याची गरज आहे.

  • Related Posts

    विरोधकांच्या अस्तित्वाची कसोटी

    अपक्ष उमेदवारांचा कितीही भरणा असला तरी पक्षाच्या अधिकृत चिन्हावर विरोधकांचा फक्त एक उमेदवार भाजपच्या विरोधात उभा राहिला, तर भाजपचा आत्मविश्वास कोलमडून पडेल आणि जनतेचा विश्वास ओसंडून वाहील. निवृत्त न्यायमुर्ती फेर्दिन…

    भाजप हो सावधान !

    सर्वोच्च पदाचा कुणीतरी आपल्या राजकीय स्वार्थासाठी किंवा छुप्या डावपेचांसाठी वापर करत असेल, तर हे महत्त्वाचे पद भूषविणाऱ्या व्यक्तीच्या पात्रतेवरच संशय घेण्यासारखी परिस्थिती म्हणावी लागेल. आपल्या लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला राजकीय स्वातंत्र्य…

    You Missed

    विरोधकांच्या अस्तित्वाची कसोटी

    विरोधकांच्या अस्तित्वाची कसोटी

    स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल

    स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल

    05/02/2026 e-paper

    05/02/2026 e-paper

    १९१९ ; भिवपाची गरज ना !

    १९१९ ; भिवपाची गरज ना !

    भाजप हो सावधान !

    भाजप हो सावधान !

    04/02/2026 e-paper

    04/02/2026 e-paper