पीडितांची न्यायासाठी धावाधाव
गांवकारी, दि. ९ (प्रतिनिधी)
पेडणे तालुक्यातील धारगळ पंचायत क्षेत्रातील तिवाडा येथे तीन घरे पाडण्याचे आदेश उपजिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. यापैकी एका घरावरील कारवाई टळली असली तरी उर्वरित दोन घरांवर कधीही कारवाई होऊ शकते. या विषयावर धारगळ गावात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
गणोजी आणि पाळणी कुटुंबांकडे राखणदार म्हणून इतर हक्कांत नावे असल्याने जमीन मालकांकडून समझोता करण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो निष्फळ ठरल्याने आता घरे पाडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
तिवाडा येथील सर्वे क्रमांक २३९/१, २३९/२, २३९/३, २३९/४ आणि २३९/५ मिळून एकूण २०,९७० चौ. मीटर जमीन आहे. ही जमीन दिलीप नागेश प्रभूदेसाई, शामा दिलीप प्रभूदेसाई, केशव नागेश प्रभूदेसाई आणि निता केशव प्रभूदेसाई यांच्या नावे असून ते धुळेर–म्हापसा तसेच महाराष्ट्रातील खारगर येथे वास्तव करतात. त्यांनी दत्तप्रसाद वेर्णेकर (धुळेर–म्हापसा) आणि महावीर कासी नदार (जुने–गोवे) यांना पॉवर ऑफ अटर्नी दिली आहे. या अंतर्गत सर्वेक्षण, राखणदारांशी चर्चा, समझोता, जमीन साफसफाई, कुंपण घालणे इत्यादी जबाबदाऱ्या त्यांच्याकडे सोपवण्यात आल्या आहेत.
गोवा मुक्तीपूर्व काळापासून गणोजी आणि पाळणी कुटुंबे या जमिनीत वास्तव करत आहेत. अलीकडे त्यांच्या मुलांनी घरे दुरुस्त करून राहण्यायोग्य केली आहेत. मात्र त्यांनी हक्क सोडण्यास नकार दिल्याने जमीन मालकांनी तक्रारी दाखल करून घरे पाडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
एकाला दिलासा, दोन रडारवर
धारगळ पंचायतीकडे बेकायदा बांधकामांची तक्रार आल्यानंतर पंचायतीने पाहणी करून कारणे दाखवा नोटीस तसेच बांधकाम पाडण्याची नोटीस जारी केली होती. ही घरे नदीलगत असल्याने जमीन मालकांनी सीआरझेडकडेही तक्रार केली. त्यानंतर सीआरझेडकडूनही पाडकामाची नोटीस देण्यात आली.
गणोजी कुटुंबाने पंचायत संचालनालयात अपील केले नाही, तर पाळणी कुटुंबाने अपील दाखल केले असून त्याची सुनावणी सुरू आहे. जमीन मालकांनी पंचायत सचिवांकडे कारवाईचा तगादा लावल्यानंतर सचिवांनी मंडळ ठराव व कायदेशीर सल्ला मागवून पुन्हा प्रक्रिया सुरू केली आणि प्रकरणे उपजिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली. उपजिल्हाधिकाऱ्यांनी सर्व कागदपत्रे तपासून बांधकामे पाडण्याचे आदेश जारी केले.
तारामती गणोजी या ज्येष्ठ महिलेच्या वतीने गोवा खंडपीठात धाव घेतली असता त्यांना दिलासा मिळाला. मात्र इतर बांधकामे पाडण्याचे आदेश कायम ठेवले गेले. पाळणी कुटुंबाला पंचायत संचालनालयाकडून दिलासा न मिळाल्याने त्यांच्या घरांवर शुक्रवारी कारवाई होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पंचायत सचिवांना खाजगी जमिनीवरील बांधकामे पाडण्याचा अधिकार नाही, असा मुद्दा एड. आंद्रे परेरा यांनी मांडला आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, धारगळ क्षेत्रातील इतर बेकायदा बांधकामांवर कारवाई न करता केवळ या प्रकरणाचीच घाई का केली जात आहे?
गावात मोठ्या प्रमाणात जमीनदारांनी जमिनी विकण्याचे सत्र सुरू केले आहे. पुरातन काळापासून वास्तव करणाऱ्या कुळांना हुसकावून लावण्याचे हेच सत्र असल्याची टीका एड. परेरा यांनी केली आहे.






