अध्यक्ष मनोज परब यांचा सोशल मीडियावर हल्लाबोल
गांवकारी, दि. १२ (प्रतिनिधी)
रिव्होल्यूशनरी गोवन्स पार्टी (आरजीपी)तील अंतर्गत वादाने आता सार्वजनिक रूप धारण केले आहे. पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी आज आपल्या फेसबुकवरून पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांवर सडकून टीका करणाऱ्या पोस्टांचा सपाटा चालवला. या परिस्थितीवरून पक्ष संघटनेत उभी फुट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
पक्षाध्यक्ष मनोज परब आणि आमदार विरेश बोरकर यांच्यात मतभेद झाल्याची वार्ता काही दिवसांपूर्वी पसरली होती. या वार्तेला अनुसरून परब आणि विरेश गटातील काही कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर टोलेबाजी सुरू होती. आमदार विरेश बोरकर यांनी तीन दिवसांपूर्वी पक्षात काहीच वाद नसल्याचे सांगितले होते तसेच “मनोज परब हे आमचे नेते आहेत” असेही स्पष्टीकरण दिले होते. यानंतर आज अचानक या अंतर्गत वादाने स्फोटक रूप धारण केल्याचे दिसून आले.
सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावी वापर करून या पक्षाने राज्यात आपला विस्तार केला होता. मात्र आज त्याच सोशल मीडियावरून एकमेकांवर चिखलफेक करून पक्षाचे लौकिक धुळीस मिळवण्याचा प्रकार पाहायला मिळत असल्याच्या प्रतिक्रिया आरजीपीच्या हितचिंतकांनी व्यक्त केल्या आहेत.
पक्ष संघटनेत उभी फुट
सध्याच्या सोशल मीडियावरील विविध पोस्टांचा आधार घेतला असता पक्ष संघटनेत उभी फुट पडल्याचे दिसून येते. एकीकडे मनोज परब यांच्या समर्थनार्थ गट तर दुसरीकडे विरेश बोरकर यांच्यासोबत असलेल्यांचा गट यांच्यातील हे “पोस्टयुद्ध” सुरू झाले आहे.
मनोज परब यांच्या बाजूने पक्षाचे सचिव विश्वेश नाईक आणि खजिनदार अजय खोलकर आहेत. विरेश बोरकर यांचा थेट या सोशल मीडियावरील युद्धात सहभाग नसला तरी त्यांच्या निकटवर्तीय लुसियो रोनकोन यांच्यावर परब यांचा विशेष राग असल्याचे दिसून आले आहे. आदित्य देसाई, प्रशांत पागी, तियोतीन कॉस्ता, एश्लोन रॉड्रिगीस आदींनाही परब यांनी लक्ष्य केले आहे.
निधी व्यवस्थापन आणि अंतर्गत धार्मिक समतोल या विषयावरून हे मतभेद झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते. “मनोज परब आक्रमक वागतात, त्यांच्याकडून पैशांचा अपव्यय झाला आहे” अशा स्वरूपाचे आरोप सुरू असतानाच, “या आरोपांची उत्तरे आपण देण्यास तयार आहोत” असे आव्हान परब यांनी टीकाकारांना दिले आहे.
हितचिंतकांची घोर निराशा
आरजीपी पक्षाच्या बाजूने सहानुभूती असलेले तसेच पक्षाचे हितचिंतक यांना पक्षाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पहिल्याच निवडणुकीत पक्षाने बजावलेली कामगिरी प्रभावी ठरल्याने भविष्यात हा पक्ष खऱ्या अर्थाने गोंयकारांचे प्रतिनिधित्व करणारा प्रादेशिक पक्ष म्हणून उभा राहील, अशी आशा अनेकांनी व्यक्त केली होती.
मात्र, निवडणुकीला एक वर्षांचाही कार्यकाळ शिल्लक नसताना आरजीपी पक्षातील अंतर्गत वादाने घेतलेले गंभीर स्वरूप हितचिंतकांची घोर निराशा करणारे ठरले आहे.





