अन्याय दूर करण्याची इंटकची मागणी
गांवकारी,दि. ४ (प्रतिनिधी)
राज्यातील ७७ शिक्षकांना पदोन्नती देताना गेली दहा-बारा वर्षे विद्यादान करणाऱ्या ७७ व्याख्याता शिक्षकांना कोणतीही पूर्वसूचना न देता सेवेतून कमी करून सरकारने त्यांच्या भवितव्यावर कुऱ्हाड घातली, असा घणाघाती आरोप गोवा इंटकचे अध्यक्ष ॲड. अजय प्रभू गावकर यांनी केला.
मानधन तत्त्वावर वर्षानुवर्षे सेवा बजावणाऱ्या या शिक्षकांनी अध्यापनासोबत विद्यालयातील विविध जबाबदाऱ्याही सांभाळल्या. सेवा निष्कलंक असताना अचानक बेरोजगार करण्याचा निर्णय अन्यायकारक असून, “दहा-बारा वर्षे सेवा केल्यानंतर या शिक्षकांनी आता कुठे जायचे?” असा सवाल गावकर यांनी केला.
माध्यमिक शिक्षकांना उच्च माध्यमिक स्तरावर अध्यापनाचा पुरेसा अनुभव नसताना त्यांच्यावर जबाबदारी सोपविणे कितपत योग्य, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शैक्षणिक वर्षाच्या मध्यावर शिक्षक बदलल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
पेडणे, वाळपई विद्यार्थ्यांचा वर्गांवर बहिष्कार
गेली अनेक वर्षे व्याख्याता तत्वावर विद्यादान करणाऱ्या शिक्षकांना अचानक काढून टाकल्याच्या निषेधार्थ पेडणे आणि वाळपई सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वर्गांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. शैक्षणिक वर्षांच्या मधोमध शिक्षकांना बदलण्याची ही कृती अयोग्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या शिक्षकांना सरकारने न्याय द्यायला हवा,अशी मागणीही त्यांनी केली आहे.





