फोंडा : आधुनिक तंत्रज्ञानामुळे आज घरबसल्या जगाशी संपर्क साधणे शक्य झाले आहे. या तंत्रज्ञानाचा सकारात्मक संकल्पना आणि योग्य दृष्टिकोनातून वापर केल्यास कठीण वाटणारे ध्येयही सहज साध्य करता येते. त्याचबरोबर इतिहासाची जाण आणि ज्ञान असल्यास भूतकाळातील चुकांची पुनरावृत्ती टाळता येते, असे प्रतिपादन गोमंतकीय साहित्यिक तथा गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. समर्थ बोरकर यांनी केले.
गोवा मराठी अकादमीच्या फोंडा तालुका प्रभाग समितीतर्फे ढवळी येथील सत्यनारायण सभागृहात आयोजित विद्यार्थी गौरव सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत मराठी विषयात ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यार्थी जीवनातील बहुमोल वेळ वाचन आणि शिक्षणासाठी गुंतवणूक म्हणून वापरावा, असा सल्ला डॉ. बोरकर यांनी दिला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न ठेवता ज्ञानवृद्धी, कौशल्य विकास आणि ध्येयपूर्तीसाठी करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत होते. व्यासपीठावर फोंडा तालुका प्रभाग समितीचे अध्यक्ष निलेश नाईक, उपाध्यक्ष उमेश गावणेकर, उदय डांगी आणि सचिव प्रा. वरदा गाडेकर यांची उपस्थिती होती.
या सोहळ्यात फोंडा आणि धारबांदोडा तालुक्यातील एकूण २३५ गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच शिक्षक दिनाचे औचित्य साधून या विद्यार्थ्यांना यशासाठी मार्गदर्शन करणाऱ्या ५२ शिक्षक व अध्यापकांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
प्राचार्य अनिल सामंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बदलत्या आणि सुधारित शिक्षणपद्धतीला सामोरे जाताना व्यापक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले. व्यापक विचारसरणीमुळे कल्पनाशक्तीला अधिक वाव मिळतो, असे त्यांनी सांगत यशस्वी आयोजनाबद्दल फोंडा प्रभाग समितीचे कौतुक केले.
प्रभाग अध्यक्ष निलेश नाईक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. असावरी भिडे यांनी स्वागतगीत आणि ईशस्तवन सादर केले. पाहुण्यांचा परिचय व स्वागत प्रा. सलोनी नाईक, प्रियांका जोशी, दीक्षा कुंकळेकर, श्रद्धा शिरोडकर, अन्वा नाईक आणि सुरेश गावकर यांनी केले.
दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांची नावे असावरी भिडे यांनी, बारावीतील विद्यार्थ्यांची नावे उमेश गावणेकर यांनी, तर शिक्षकांची नावे शीत स्वामी आणि अध्यापकांची नावे प्रा. वरदा गाडेकर यांनी वाचली. विद्यार्थ्यांच्या वतीने आयुषी नाईक, पार्थ साने आणि सांधवी सावंत यांनी मनोगत व्यक्त केले, तर शिक्षकांच्या वतीने प्रा. प्रेमानंद म. नाईक यांनी विचार मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजेंद्र कवळेकर यांनी केले, तर उदय डांगी यांनी आभार मानले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते फोंडा प्रभाग समितीच्या सदस्यांचाही सन्मान करण्यात आला.





