गिरीराजचे आव्हान स्वीकारणार ?

गिरीराज वेर्णेकर यांना शब्दांनी नव्हे तर कृतीने उत्तर द्यावे लागेल. सामाजिक कार्यकर्त्यांनी हातात घेतलेल्या विषयांना जर न्याय मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले तर टीकाकारांना आपोआप उत्तर मिळेल.

गिरीराज पै वेर्णेकर यांनी राज्यातील ९० टक्के सामाजिक कार्यकर्ते (एक्टीवीस्ट) हे खंडणीखोर आहेत, असा आरोप केला आहे. प्रामाणिक सामाजिक कार्यकर्त्यांचा आदर आणि सन्मान सरकार आणि पक्ष नेहमीच करतो, असेही ते म्हणाले. गिरीराज यांच्या या वक्तव्याने सामाजिक कार्यकर्ते खवळले आहेत. पण काही का असेना एरवी कुजबुज होणाऱ्या या विषयाला त्यांनी तोंड फोडले हे मात्र खरे.
सध्याच्या परिस्थितीत भाजपाकडे विरोधकांच्या टीकेला समर्थपणे तोंड देणारा अन्य प्रवक्ता नाही. गिरीराज पै वेर्णेकर हे समर्थपणे ती जबाबदारी पेलत आहेत. माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय सरंक्षणमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या कोअर टीममधला हा एकटाच तरूण नव्या भाजप टीममध्ये स्वतःला एडजस्ट करू शकला. मुळातच हुशार, भाषेवर प्रभुत्व आणि समोरच्याला शिंगावर घेण्याची तयारी यामुळे विविध टीव्ही माध्यमांवर भाजपची खिंड ते समर्थपणे लढवताना दिसतात.
गिरीराज पै वेर्णेकर हे एक पब्लीक पॉलिसी तज्ज्ञ आहेत. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय विकास सहकार्याच्या प्रमुख एजन्सी माशांव चे ते माजी विद्यार्थी. पर्रीकर दिल्लीत असतानाच त्यांना ही संधी मिळाली होती. गोवा भाजपचे ते सध्या प्रवक्ते आहेत तसेच पक्षाच्या धोरण आणि संशोधन विभागाचे ते राज्य संयोजक म्हणूनही काम पाहतात. गिरीराज हे भारतीय उद्योग परिसंघाच्या (सीआयआय) संरक्षण, सुरक्षा आणि एरोस्पेस विभागाचे उपसंचालकही होते. नंतर त्यांनी सीआयआयसाठी सार्वजनिक धोरण सल्लागार म्हणून काम केले. भाजपमध्ये सामील होण्यापूर्वी, त्यांनी भारत फोर्ज लिमिटेड कंपनीच्या धोरण आणि संरक्षण विषयक बाबींवर सेवा बजावली आहे.
गिरीराज पै वेर्णेकर यांनी सामाजिक कार्यकर्त्यांवर आरोप करून उघडपणे त्यांना आपला प्रामाणिकपणा सिद्ध करण्याचे अप्रत्यक्ष आव्हानच दिले आहे. सामाजिक कार्यकर्ते नेमके करतात काय, त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत काय, ते रात्रंदिन गोवाभर फिरतात हे त्यांना कसे काय परवडते, त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा चालतो असे असंख्य लोकही विचारतात. राजकीय कार्यकर्ते तर याचाच प्रचार करून सामाजिक कार्यकर्त्यांबाबत समाजात संशयाचे बी पेरण्याचे काम करतात. आरटीआयच्या माध्यमांतून किंवा सामाजिक कार्यकर्त्यांच्या वेशात अनेकांना धमकावून किंवा तक्रारींचा सपाटा लावून शेवटी पैशांना बळी पडून सेटिंग करणारे महाभाग अनेक आहेत. हे सगळे पाहील्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांवर संशयाचे वलय तयार होणे स्वभाविक आहे. राजकारणात जसे अली बाबा आणि चाळीस चोर असा आरोप करून सर्वांनाच त्यात ओढले जाते, तीच गत आता सामाजिक कार्यकर्त्यांची झाली आहे. या आरोपांवरून सर्वसामान्य जनतेच्या मनांत संताप वगैरे काहीच निर्माण होण्याची शक्यता नाही. पत्रकारांवरही असे आरोप सर्रास होतात. खंडणी किंवा पेड न्यूजचा ठपका पत्रकारांवर येतो. अशावेळी प्रामाणिक पत्रकारांनाही या आरोपांचे धनी बनावे लागते. पण जो प्रामाणिक आहे, त्याला काहीच फिकीर नसते. हे आरोप स्वतःला लावून घेण्यात अर्थ नाही, कारण हे आरोप निनावी आहेत. दुसरी गोष्ट आरोप करणाऱ्यांची तोंडे बंद करणे अशक्य आहे. अशा या आरोपांवरून जर जनता किंवा आपलेच सगेसोयरे आपल्यावर संशय घेऊ लागले तर मग आपल्यात कुठेतरी काही कमी पडत असल्याचे ते संकेत म्हणावे लागतील. आपले कार्य समाजात आपली विश्वासाहर्ता तयार करण्यात कमी पडले आहे, असाच त्याचा अर्थ होतो.
गिरीराज वेर्णेकर यांना शब्दांनी नव्हे तर कृतीने उत्तर द्यावे लागेल. आपण हातात घेतलेल्या कार्याला किंवा विषयांना मूर्त स्वरूप किंवा न्याय मिळवून देऊ शकलो तर टीकाकारांना त्याचे आपोआप उत्तर मिळेल. गिरीराजचे हे आव्हान स्वीकारणाची तयारी सामाजिक कार्यकर्ते करतील काय ?

  • Related Posts

    कामगारांच्या आयुष्याकडे खेळ नको

    सर्वसामान्य कामगारांना न्याय मिळवून देणाऱ्या या निवाड्याची दखल घेण्याचे शहाणपण सरकारला सुचत नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. गोव्याचे राजकारण अलिकडच्या काळात सरकारी नोकरीभोवती फिरत आहे. एका अज्ञात पूजा नाईक हिच्याकडे…

    कारापूरात राजकीय शुकशुकाट

    विश्वजीत राणे हे किती काळ हट्ट धरून कारापूरवासियांच्या तोंडून निघणारे शब्द मुकाट्याने ऐकत राहतील? ही दूषणे, श्राप यांचा त्यांच्यावर काहीच परिणाम होणार नाही का? कारापूर गावात लोढा प्रकल्पाच्या विरोधात सुरू…

    You Missed

    Tuem Panchayat Backs ‘Enough is Enough’ Movement, Raises Alarm Over Villa Projects

    Tuem Panchayat Backs ‘Enough is Enough’ Movement, Raises Alarm Over Villa Projects

    Alleged Illegal Tree Felling at Mollem Raises Serious Environmental Concerns

    Alleged Illegal Tree Felling at Mollem Raises Serious Environmental Concerns

    14/04/2026 e-paper

    14/04/2026 e-paper

    कामगारांच्या आयुष्याकडे खेळ नको

    कामगारांच्या आयुष्याकडे खेळ नको

    ‘पार्सेकर फुड्स’ विरोधात आज महाआंदोलन

    ‘पार्सेकर फुड्स’ विरोधात आज महाआंदोलन

    Fake Loan Call Centre Busted in Goa; 7 Arrested in Midnight Cyber Crime Raid

    Fake Loan Call Centre Busted in Goa; 7 Arrested in Midnight Cyber Crime Raid