गोबेल्स नीतीचा उपयोग करून खोट्या किंवा अवास्तव गोष्टी लोकांच्या गळी उतरवण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतो.
राज्यातील भाजप सरकार संपूर्णतः पक्षाच्या चक्रव्युहात अडकले आहे. प्रत्येक कार्यक्रम, मेळावे, सभा आणि बैठका पक्षाच्या झेंड्याखालीच होत असल्याने पक्षविरहित जनतेचा सरकारशी संपर्कच तुटला आहे. सरकारच्या यशाच्या घोषणा केवळ पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर केल्या जात असल्याने सर्वसामान्य जनतेला विश्वासात घेण्यासाठी कोणतेही ठोस कार्यक्रम दिसत नाहीत. त्यामुळे राज्यात “सरकार आहे तरी कुठे?” असा प्रश्न विचारला जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्षपदी दामू नाईक यांच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात भाजप कार्यकर्ता मेळावे आयोजित करण्यात आले. मात्र, हे पक्षाचे मेळावे असल्याने फक्त पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेच सहभागी होऊ शकले. उर्वरित जनतेला सरकारसोबत संवाद साधण्याची संधीच मिळाली नाही.
आता भाजप सरकारच्या केंद्रातील ११ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त कार्यकर्त्यांच्या सभांचे आयोजन सुरू आहे. यासाठी केंद्रातूनच विविध कार्यक्रमांची यादी पाठवली जाते आणि त्यानुसार हे कार्यक्रम आयोजित करून अहवाल सादर करावा लागतो. याच कारणामुळे राज्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सततच्या कार्यक्रमांमधून सुटका करून घेणे कठीण बनले आहे. मुख्यमंत्री दर आठवड्याला जनता दरबार भरवतात, मात्र तो साखळीतील त्यांच्या घरी किंवा रविंद्र भवनमध्येच होतो. त्यामुळे सरकार म्हणून सर्वसामान्य जनतेला भेटण्याची संधीच मिळत नाही. प्रत्यक्षात अख्या मंत्रिमंडळाने राज्यातील ४० मतदारसंघात भेट देऊन जनतेशी संवाद साधण्याची गरज आहे. सरकार जनतेच्या गरजा लक्षात घेत नाही, असा आरोप होत आहे. लोकांना शौचालयांची गरज असतानाही राज्य उघड्यावर शौचमुक्त असल्याचा दावा केला जात आहे. पाण्यासाठी लोकांना अजूनही वणवण भटकावे लागत असतानाही राज्य हर घर जल योजना राबवणारे पहिले राज्य असल्याचे सांगितले जाते. रस्त्यांची दुरवस्था असतानाही गेल्या ५० वर्षांत जे झाले नाही, ते भाजपने १० वर्षांत साध्य केल्याचा दावा केला जात आहे. पदवीधारकांना कौशल्य विकासाचे धडे घेणे गरजेचे आहे तरच नोकऱ्या मिळतील असे सांगितले जात असतानाही आता ‘हर घर पदवीधर’ अशी नवी घोषणा केली जात आहे. यामधील विसंगती पाहता सरकारच गोंधळात सापडले आहे आणि जनतेच्या मनात संभ्रम निर्माण केला जात आहे. गोबेल्स नीतीचा उपयोग करून खोट्या किंवा अवास्तव गोष्टी लोकांच्या गळी उतरवण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतो. या परिस्थितीत जनतेने सावध राहूनच पुढील राजकीय घटनांचा सामना करावा लागेल. भाजप स्वतः गोंधळात सापडला आहे आणि जनतेलाही गोंधळात टाकत आहे, हे स्पष्ट दिसते. या गोंधळामुळे राज्याचे नुकसान होत असून ही परिस्थिती सुधारण्याची गरज निर्माण झाली आहे.





