पणजी, दि. १९ जुलै २०२६ : गेल्या दहा वर्षांत देशभरात झालेल्या १५२ प्रश्नपत्रिका फुटींच्या प्रकरणांतील आरोपींना शिक्षा झालेली नसल्याचा दावा करत, भाजप सरकार अशा आरोपींसाठी आश्रयस्थान बनल्याचा गंभीर आरोप गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला. पेपरफुटीच्या घटनांमुळे सुमारे २५ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा करत या मृत्यूंसाठी केंद्र सरकार नैतिकदृष्ट्या जबाबदार असल्याचेही त्यांनी म्हटले.
रविवारी पणजीतील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत चोडणकर यांनी केंद्र सरकारच्या परीक्षा आणि शिक्षण व्यवस्थेवर जोरदार टीका केली. यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या माध्यम व संवाद विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, गोवा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अर्चित नाईक आणि एनएसयूआयचे राज्य सरचिटणीस कुमार अर्जुन गवळी उपस्थित होते.
देशातील पेपरफुटीचा प्रश्न गेल्या दशकभरापासून गंभीर बनला असून त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीवर आणि भवितव्यावर होत असल्याचे चोडणकर म्हणाले. गेल्या दहा वर्षांत सुमारे १५२ पेपरफुटीच्या घटना घडल्याचा दावा करत, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हा मुद्दा सातत्याने उपस्थित करत असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसला या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा हवा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उत्तराखंडमधील डेहराडून येथे राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाचा उल्लेख करताना चोडणकर म्हणाले की, या कार्यक्रमातून देशातील परीक्षा व्यवस्थेतील अनेक त्रुटी आणि दोषपूर्ण प्रक्रिया समोर आल्या आहेत. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे वर्तमान आणि भविष्य धोक्यात आल्याने या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा त्यांनी केला.
पेपरफुटीच्या प्रकरणांसाठी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरत त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असल्याचे चोडणकर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत केंद्र सरकार असंवेदनशील असून ही भाजपची विद्यार्थीविरोधी भूमिका असल्याची टीकाही त्यांनी केली.
गेल्या दशकात झालेल्या १५२ पेपरफुटीच्या प्रकरणांमध्ये एकाही आरोपीला शिक्षा झालेली नसल्याचा दावा करत चोडणकर म्हणाले, “इतक्या मोठ्या प्रमाणावर पेपरफुटी होऊनही आरोपींना शिक्षा होत नसेल, तर भाजप सरकार अशा आरोपींसाठी आश्रयस्थान बनले आहे, असेच म्हणावे लागेल.”
विविध प्रवेश परीक्षांसाठी गेल्या दहा वर्षांत सुमारे साडेसात कोटी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क, अभ्यास आणि तयारीसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक गुंतवणूक करावी लागत असल्याकडे लक्ष वेधले. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पेपरफुटी हा मोठा अन्याय असून हे प्रकार तातडीने थांबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
राहुल गांधी यांच्या ‘सेव्ह एज्युकेशन, सेव्ह युवर फ्युचर’ अभियानात विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही चोडणकर यांनी केले. देशातील परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असणे आवश्यक असताना भाजप सरकारने परीक्षा व्यवस्थेचे खंडणी आणि भ्रष्टाचाराच्या यंत्रणेत रूपांतर केल्याचा आरोप त्यांनी केला. पेपरफुटीच्या घटनांमुळे सुमारे २५ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा करत संबंधित कुटुंबांच्या दुःखाची जाणीव सरकारने ठेवावी, असेही ते म्हणाले.
पेपरफुटीचा फटका केवळ उच्च शिक्षणाच्या प्रवेश परीक्षांनाच नव्हे, तर सरकारी नोकरभरती परीक्षांनाही बसत असल्याचे चोडणकर यांनी सांगितले. “सहा लाख नोकऱ्यांसाठी जवळपास नऊ कोटी उमेदवार परीक्षा देतात. मात्र, प्रश्नपत्रिका विकत घेणाऱ्यांनाच नोकरीची संधी मिळत असेल, तर ही बाब देशातील गुणवत्ताधारित व्यवस्थेलाच धक्का देणारी आहे,” असा आरोप त्यांनी केला.






