पणजी, २२ मे:
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना “जादूगार” संबोधत गोव्यात २२ हजार सरकारी नोकऱ्या निर्माण करण्याचे विधान केल्यानंतर गोवा प्रदेश काँग्रेस समितीने भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या मीडिया आणि कम्युनिकेशन विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी हे विधान भाजप सरकारचे अपयश, हतबलता आणि प्रशासकीय दिवाळखोरी उघड करणारे असल्याचे म्हटले आहे.
पणजीकर म्हणाले की, सरकारकडे दाखवण्यास ठोस कामगिरी नसते, बेरोजगार युवकांना देण्यासाठी उत्तर नसते आणि जनतेसमोर मांडण्यासाठी विश्वासार्ह अहवाल नसतो, तेव्हा सत्ताधारी जादू, भ्रम आणि राजकीय कल्पनारंजन विकू लागतात. गोव्याला जादूचे प्रयोग नव्हे, तर सक्षम प्रशासन, पारदर्शक भरती प्रक्रिया आणि रोजगाराची खरी संधी हवी आहे, असे त्यांनी सांगितले.
गोव्यातील हजारो सुशिक्षित युवक बेरोजगारी, कंत्राटी नोकऱ्या, स्थलांतर आणि नैराश्याला सामोरे जात असताना काही मोजक्याच लोकांना राजकीय आश्रय आणि लाभ मिळत असल्याचा आरोप पणजीकर यांनी केला. “गोव्याच्या जनतेने सरकार निवडले आहे ते प्रशासन चालवण्यासाठी; जादूचे प्रयोग दाखवण्यासाठी नाही. गोवा हा सर्कस नाही आणि गोव्याचे युवक चमत्कारांची वाट पाहणारे प्रेक्षक नाहीत,” असा टोला त्यांनी लगावला.
जर खरोखरच राज्यात २२ हजार सरकारी पदे रिक्त असतील, तर ती पदे अनेक वर्षे रिक्त का ठेवली गेली, भरती प्रक्रिया वारंवार विलंबित का केली जाते, पात्र गोमंतकीय युवकांना रोजगारासाठी सतत संघर्ष का करावा लागतो आणि निवडणुका जवळ आल्या कीच मोठमोठ्या घोषणा का केल्या जातात, असे सवाल पणजीकर यांनी सरकारसमोर ठेवले.
भाजप सरकारने युवकांच्या भविष्याशी क्रूरपणे खेळ केल्याचा आरोप करत पणजीकर म्हणाले की, प्रत्येक निवडणुकीत भाजप बेरोजगार युवकांना स्वप्ने दाखवते; मात्र निवडणुका संपल्यानंतर ती स्वप्ने अदृश्य होतात. त्याऐवजी भ्रष्टाचार, महागाई, पक्षपात आणि बेरोजगारी वाढत राहते.
विश्वजित राणे यांनी उल्लेख केलेली “जादू” नेमकी कोणती, असा सवालही पणजीकर यांनी उपस्थित केला. पेट्रोल-डिझेल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती, कायमस्वरूपी नोकऱ्यांच्या जागी कंत्राटी व आउटसोर्सिंग पद्धती, जनतेच्या पैशांचा प्रसिद्धी आणि दिखाऊ प्रकल्पांवर होणारा वापर आणि सतत घोषणा करूनही प्रत्यक्षात काहीच न घडणे — हीच का भाजपची जादू, असा उपरोधिक प्रश्न त्यांनी विचारला.
“भाजप सरकार इव्हेंट मॅनेजमेंट, पीआर मोहीम आणि राजकीय मार्केटिंगमध्ये तज्ज्ञ झाले आहे; मात्र प्रशासन, रोजगार निर्मिती आणि युवकांचे भविष्य सुरक्षित करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे,” असा आरोप पणजीकर यांनी केला.
सरकारने तात्काळ विभागनिहाय रिक्त पदांची यादी, भरतीसाठी निश्चित कालमर्यादा, आरक्षण आणि भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती तसेच पारदर्शक व न्याय्य भरतीसाठी उत्तरदायित्वाची यंत्रणा सार्वजनिक करावी, अशी मागणी त्यांनी केली.
गोव्याच्या युवकांना जादूगार, भ्रम निर्माण करणारे नेते किंवा फक्त मथळे निर्माण करणारे सरकार नको आहे. त्यांना रोजगार, पारदर्शकता, संधी आणि प्रामाणिकपणे काम करणारे सरकार हवे आहे, असे स्पष्ट करत अमरनाथ पणजीकर यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.





