चलो हरमल…

कुठलेही काम असले तरी रविवार, ५ एप्रिल रोजी संध्याकाळी ४ वाजता हरमल सभेला उपस्थित राहून गोव्याच्या रक्षणार्थ उभ्या राहिलेल्या या चळवळीचे प्रत्यक्षदर्शी बनावे हीच अपेक्षा आहे.

इनफ इज इनफ” या लोकचळवळीच्या जनजागृतीचा पुढचा टप्पा म्हणजे तालुकास्तरीय जाहीर सभांचे आयोजन. पणजी, मडगाव आणि म्हापसा येथील पहिल्या तीन सभांनंतर आता फोंडा आणि काणकोण तालुक्यात सभा झाल्या आहेत. यानंतर रविवार, ५ एप्रिल रोजी संध्याकाळी ४ वाजता हरमल येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सभागृहात पेडणे तालुक्याची जाहीर सभा होणार आहे. विशेष म्हणजे हा दिवस ईस्टर सनडे असून ख्रिस्ती धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण आहे. येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा उत्सव साजरा करण्याचा हा दिवस असला तरी या लोकचळवळीचे प्रणेते निवृत्त न्यायमुर्ती फेर्दिन रिबेलो यांनी सभेला उपस्थित राहण्याची मान्यता दिल्यामुळे हा रविवार निवडण्यात आला आहे.
राजकारण्यांच्या सभा, मेळावे किंवा महोत्सवांत उसळणारी गर्दी येथे दिसणार नाही, कारण या सभांतील उपस्थिती ही स्वेच्छेने लावलेली असते. गोव्याच्या किंवा आपल्या गावाच्या भवितव्याबद्दल चिंताग्रस्त वा व्यथित असलेले नागरिकच अशा सभांना हजेरी लावतात. मागील सभांची उपस्थिती पाहता निराश होण्याचे कारण नाही, उलट या चळवळीला उर्जा देणारा संदेशच पुढे आला आहे. खुर्च्या रिकाम्या राहिल्या किंवा कुणीच आला नाही असे अजिबात घडले नाही, आणि हाच भाग या चळवळीला बळकटी देणारा ठरला आहे.
हरमलवासीयांनी यापूर्वी ३९(ए) च्या प्रकरणाविरोधात आंदोलन छेडले. संपूर्ण गाव एकत्र करून भव्य मशाल मिरवणूक काढली आणि आपली ताकद दाखवली. त्यानंतर सरकारने ही केस रद्द केली. ह्याच हरमलवासीयांनी गोंयकारांना इनफ इज इनफचा संदेश दिला आणि ही लोकचळवळ उभी राहिली. परशुराम भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावातच तालुकास्तरीय सभा आयोजित करण्याचा निर्णय पेडणेकरांनी घेतला. सोशल मीडिया, पत्रके, व्हिडिओ आणि वृत्तपत्रांद्वारे सभेची माहिती दिली आहे. आता किती लोक सभेला हजेरी लावतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
याच रविवारी आमदार चषक स्पर्धेचा अंतिम सामना आहे. लाखो रुपयांच्या बक्षिसांची खैरात करणाऱ्या या स्पर्धेला तरुणाईची रिघ लागेल, पण ह्याच तरुणाईच्या सुरक्षित भवितव्यासाठी ही लोकचळवळ सुरू आहे याचे भान जर तरुणांनी ठेवले तर त्याचा फायदा निश्चितपणे या चळवळीला होईल. पेडणे तालुक्यातील तरुणांनी या चळवळीत सक्रीय होणे गरजेचे आहे. त्यांच्या नकळत त्यांचे भवितव्य उध्वस्त करण्याचा खेळ सुरू आहे. तरुणाई आत्ताच जागी झाली नाही तर ही परिस्थिती रोखता येणार नाही.
अलाहाबाद हे देशातील सर्वांत मोठे उच्च न्यायालय आहे. या न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून सेवा बजावलेले गोंयकार आणि क्रांतिकारी कुंकळ्ळी गावचे भूमीपुत्र निवृत्त न्यायमुर्ती फेर्दिन रिबेलो हे हरमल सभेला मार्गदर्शन करणार आहेत. उच्च पदावर पोहोचलेली व्यक्ती सामान्य लोकांबरोबर सामाजिक व पर्यावरणीय हितासाठी लढत आहे, ही दुर्मीळ उदाहरणे आहेत. अशा थोर व्यक्तीचा आदर करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. समाजानेच अशा लोकांची कदर केली नाही तर संकटकाळात बुद्धिमान लोकं धावून कशी येणार? राजकारणीच हुशार आणि सर्वस्व आहेत हा गैरसमज दूर करण्याची गरज आहे.
जमीन ही आपल्या अस्तित्वाची ओळख आहे. जमीन हातातून निसटली तर आपण वाहून जाणार आहोत. या जमिनीवर घाला घालण्याचे काम सुरू आहे. हे रोखणे आपले कर्तव्य आहे. हे संकट नेमके काय आहे आणि त्याला कसे सामोरे जायचे याबाबत न्यायमुर्ती फेर्दिन रिबेलो मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे प्रत्येक स्वाभिमानी पेडणेकरांनी ही संधी दवडू नये. कुठलेही काम असले तरी रविवार, ५ एप्रिल रोजी संध्याकाळी ४ वाजता हरमल सभेला उपस्थित राहून गोव्याच्या रक्षणार्थ उभ्या राहिलेल्या या चळवळीचे प्रत्यक्षदर्शी बनावे हीच अपेक्षा आहे.

  • Related Posts

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    मात्र खरी कसोटी आता समाजाचीच आहे. राजकीय आरक्षण हे समाजाला सत्तेच्या वाटचालीत सहभागी करून घेणारे वरदान ठरावे की वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षा, गटबाजी आणि मतभेदांमुळे शाप ठरावे, हे समाजधुरिणांनी ठरवायचे आहे.…

    रोजगार: आभास आणि वास्तव

    विधानसभेत सरकारने दिलेल्या माहितीनुसार मागील पाच वर्षांत मंडळाअंतर्गत प्रत्यक्ष उभारलेल्या उद्योगांमध्ये केवळ १,५११ गोमंतकीयांना रोजगार मिळाल्याची माहिती समोर आली आहे. राज्य पर्यावरण परिणाम मूल्यांकन प्राधिकरणाने वेर्णा औद्योगिक वसाहतीतील एका औषधनिर्मिती…

    You Missed

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    14/08/2026 e-paper

    14/08/2026 e-paper

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027

    Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027

    Panchayat Fails to Act in 30 Days; Deputy Director to Take Over Powers Against Verla-Canca Structure

    Panchayat Fails to Act in 30 Days; Deputy Director to Take Over Powers Against Verla-Canca Structure