आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांचा हल्लाबोल
गांवकारी, दि. २३ (प्रतिनिधी)
राज्यातील वेगवेगळ्या सीमांवर वाहतूक खात्यातर्फे उभारण्यात आलेल्या आरटीओ चेकपोस्टवर पोस्टिंग मिळवण्यासाठी दर सहा महिन्यांनी लाखो रुपयांच्या बोली लावल्या जातात. सर्वाधिक बोली लावणाऱ्या अधिकाऱ्यांना तिथे सहा महिन्यांसाठी पोस्टिंग मिळते. या व्यवहारातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचा सनसनाटी खुलासा आरटीआय कार्यकर्ते तसेच अखिल गोवा खाजगी बस मालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी केला.
वाहतूक खात्यातील चेकपोस्टवरील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करताना ताम्हणकर यांनी लेखाजोखा सादर केला. उत्तर गोव्यात पत्रादेवी, दोडामार्ग, केरी-सत्तरी तर दक्षिण गोव्यात पोळे, कुळे चेकपोस्टवरील अधिकाऱ्यांची यादीच त्यांनी वाचून दाखवली. विशेष म्हणजे, चेकपोस्टवर काम करणारे अधिकारी अनेक वर्षांपासून तिथेच कायम आहेत. त्यांची बदली झाली तरी ती दुसऱ्या चेकपोस्टवरच केली जाते. बोली लावणाऱ्या अधिकाऱ्यांनाच चेकपोस्टची नेमणूक मिळत असल्याने सर्व अधिकारी बोली लावू शकत नाहीत, असेही ताम्हणकर म्हणाले. सहा महिन्यांसाठी किमान २ ते २.५ कोटी रुपये या बोलीतून जमा होतात, अशी माहिती त्यांनी दिली.
दिवसाला लाख ते दीड लाख कलेक्शन
पत्रादेवी, मोले, कुळे आदी महत्त्वाच्या चेकपोस्टवर प्रत्येक ड्यूटीसाठी एक ते दीड लाख रुपये जमा केले जातात. हे पैसे आरटीओ खात्याच्या अधिकाऱ्यांमध्ये वाटले जातात. या कलेक्शनच्या माध्यमातून बोली लावणारे अधिकारी आपली गुंतवणूक वसूल करतात आणि त्यावर अतिरिक्त मिळकतही जमा करतात. चेकपोस्टवर सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी केली तर हे सर्व उघड होईल, असेही त्यांनी सांगितले.
दक्षता खातेही रडारवर
आरटीओ चेकपोस्टवर उघडपणे भ्रष्टाचार चालतो हे माहित असूनही दक्षता खाते किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कधीच छापा टाकत नाही. याचे कारण शोधले तर या खात्यांनाही त्यांचा वाटा दिला जातो, असा अर्थ निघतो. हा भ्रष्टाचार बंद होऊ शकत नाही. सरकारला धमक असेल आणि सरकार स्वतःला भ्रष्टाचारमुक्त म्हणवत असेल तर चेकपोस्टवरील भ्रष्टाचार बंद करून दाखवावा, असे आव्हान ताम्हणकर यांनी दिले.
तर चेकपोस्टवर भीक मागणार
अखिल गोवा खाजगी बस मालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी संघटनेचे विविध विषय अजूनही सरकारकडे प्रलंबित असल्याची नाराजी व्यक्त केली. यापूर्वी चेकपोस्टवर जाऊन भीक मागण्याचे आंदोलन संघटनेतर्फे करण्यात आले होते. तिथे केवळ दोन तासांतच २५ ते ३० हजार रुपयांची भीक मिळाली होती. खाजगी बस मालक हे सर्वसामान्य लोक आहेत. त्यांना भीक मागण्यात काहीच कमीपणा वाटणार नाही. सरकारनेच भीकेला लावले तर चेकपोस्टवर जाऊन भीक मागू, असा सज्जड इशारा ताम्हणकर यांनी दिला.






