दिल्लीतील आंदोलनाचे गोव्यातही पडसाद
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी)
दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे पडसाद आता देशभर उमटू लागले आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोर्चा नेल्याने त्यांना ताब्यात घेतल्याच्या घटनेनंतर गोवा प्रदेश काँग्रेसने दोनापावला लोकभवनवर मोर्चा काढला. त्याचप्रमाणे, काँग्रेसने पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोर्चा नेल्याच्या निषेधार्थ प्रदेश भाजपने काँग्रेस भवनवर मोर्चा काढला.
नीट पेपरलीक प्रकरण
या प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन सुरू आहे. आंदोलक विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा काढल्यावर त्यांच्यावर बेछूट लाठीचार्ज करण्यात आला. या लाठीचार्जात शेकडो विद्यार्थी जखमी झाले असून देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
काँग्रेसचा मोर्चा
या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावर मोर्चा नेला. यावेळी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव यांना ताब्यात घेण्यात आले. या घटनेचे पडसाद गोव्यातही उमटले. प्रदेश काँग्रेसने दोनापावला सर्कलजवळ जोरदार निदर्शने केली. अखेर राज्यपालांनी भेट देण्याचे मान्य केल्यानंतर मोर्चा मागे घेण्यात आला.
राज्यपालांची भेट
राहुल गांधी यांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, केंद्र सरकारची जबाबदारी निश्चित व्हावी आणि शिक्षण व्यवस्थेत तातडीने सुधारणा व्हावी, या मागण्यांसाठी गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांची भेट घेतली. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय शिष्टमंडळात कार्याध्यक्ष एम. के. शेख, अॅड. कार्लोस फेरेरा, सुनील कवठणकर आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. अर्चित नाईक यांचा समावेश होता.
भाजपचा मोर्चा
पंतप्रधानांच्या निवासस्थानावर काँग्रेसने मोर्चा नेल्याच्या निषेधार्थ प्रदेश भाजपने आज काँग्रेस भवनवर मोर्चा काढला. यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात पक्षाचे मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. मात्र, या मोर्चात सहभागी झालेल्या काही लोकांना मोर्चा काढण्याचे कारणच माहित नव्हते. त्यांनी वाढती महागाई आणि इतर विषयांबाबत नाराजी व्यक्त केल्याने भाजपचीच नाचक्की झाल्याचे चित्र दिसून आले.





