
आपला धार्मिक एकोपा हीच आपली ताकद आहे आणि या ताकदीच्या बळावरच आपण अशा दहशतवादाला सडेतोड प्रत्यूत्तर द्यायचे आहे हे विसरून चालणार नाही.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये घडलेल्या या घटनेत २० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. केंद्र सरकारने या घटनेची तीव्रता आणि गंभीरता लक्षात घेऊन प्रत्यूत्तर योजनेची आखणी केली आहे. आज दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
जम्मू आणि काश्मीर अलिकडच्या काळात शांत होते. पर्यटकांना कित्येक वर्षांनंतर तिथे मुक्त श्वास घेण्याची मोकळीक मिळाली होती. देशाचा हा मुकुट पुन्हा एकदा पर्यटकांचे आकर्षण ठरला असतानाच पुन्हा दहशतवाद्यांनी आपले डोके वर काढणे ही देशासाठी चिंतेची बाब ठरावी.
प्राप्त माहितीनुसार लष्कर-ए-तोयबाची शाखा द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पाकिस्तानने पहिल्याच फटक्यात या हल्ल्यात आपला हात नसल्याचे सांगून टाकले आहे.
देशात एकीकडे धार्मिक पातळीवर वातावरण अत्यंत संवेदनशील बनले असताना या दहशतवादी हल्ल्यामुळे आणि विशेषतः दहशतवाद्यांनी पर्यटकांचा धर्म कोणता हे विचारून हिंदूंची निवड करून त्यांना ठार मारल्याची माहिती सर्वत्र प्रसारमाध्यमांतून पसरल्यामुळे वातावरण बरेच स्फोटक बनले आहे.
हे दहशतवादी आपल्या देशाचे नाहीत, परंतु ते एकाच धर्माचे आहेत आणि त्यांनी लक्ष्य एका विशिष्ट धर्माला केल्यामुळे दहशतवाद्यांचा धर्म असलेल्या आपल्या देशवासीयांची तुलना ह्याच दहशतवाद्यांच्या धर्माशी करून त्यांच्या प्रती राग किंवा द्वेष पसरवण्याचाही प्रयत्न सुरू आहे.
कालच्या या घटनेनंतर सोशल मीडियावर धार्मिक विष पसरवण्याचा बाजार सुरू आहे. हिंदुत्ववादाला फुंकर घालून या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्यूत्तराच्या मागणीला जोर येऊ लागला आहे.
प्रतिशोध घेण्याची वृत्ती निश्चितच निर्माण होईल, ह्यात काहीच चूक नाही, परंतु त्याची धग निरपराध आपल्याच देशातील विशिष्ट धर्माच्या लोकांना बसू नये, याची काळजी घेणेही आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
प्रत्येकजण आपल्या मर्जीप्रमाणे या घटनेचा अर्थ लावून एकूणच एका विशिष्ट धर्माला लक्ष्य बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. देशाच्या धार्मिक सलोख्याला आणि एकतेला झळ बसणार नाही, याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
जो कुणी या घटनेबाबत संयमाची भाषा करतो त्याला षंढ म्हणून हिणवले जात आहे. समतेची किंवा संयमाची भाषा करणाऱ्यांची सेक्युलरिस्ट म्हणून टवाळखोरी केली जात आहे.
१४ फेब्रुवारी २०१९ रोजीचा पुलवामा दहशतवादी हल्ला आठवल्यानंतर अजूनही अंगावर काटा येतो. पुलवामानंतरचा हा दुसरा सर्वांत मोठा हल्ला ठरला आहे.
आपल्या भारत देशाने दहशतवादाचे अनेक घाव सहन केले आहेत. तरीही आमची लोकशाही टिकून आहे.
अलिकडच्या काळात दहशतवाद आणि एका विशिष्ट धर्माचा संबंध अधोरेखित करण्याचे नियोजित प्रयत्न सुरू झाल्यानंतर दहशतवादापेक्षा हा धार्मिक द्वेष अग्नितांडवासारखा आपल्या देशात पसरू लागला आहे.
धार्मिक एकोपा हा आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. तो एकोपा बिघडला तर त्याचे गंभीर परिणाम देशाच्या एकात्मिकतेवर होतील आणि त्यातून देशाची शांतता आणि सुरक्षितता धोक्यात येण्याची भीती आहे.
आपल्यापैकी प्रत्येकाने याचा विचार करण्याची गरज आहे.
मुळात अगदी आतमध्ये घुसून पर्यटकांना लक्ष्य करून त्यांना धर्म विचारून ठार मारून पुन्हा सहीसलामत हे दहशतवादी पसार झाले कसे, हा महत्त्वाचा प्रश्न आहेच.
आपल्या इंटेलिजन्स तसेच सुरक्षा यंत्रणांच्या गाफीलपणाचा पोलखोलच ह्यातून झाला आहे.
या सगळ्या प्रश्नांवर गंभीरपणे चर्चा होण्याची गरज आहे.
आपला धार्मिक एकोपा हीच आपली ताकद आहे आणि या ताकदीच्या बळावरच आपण अशा दहशतवादाला सडेतोड प्रत्यूत्तर द्यायचे आहे हे विसरून चालणार नाही.