दाम करी काम येड्या…

राजकारणात पैशांसमोर सगळेच नगण्य अशी अवस्था आहे. कुणी प्रत्यक्ष देवाकडे आपण बोलतो,असे म्हणत आहे तर देवासमोर शपथ घेऊनही निर्लज्यपणे या शपथेच्याविरोधात जातो, त्यालाही काहीच वाटत नाही.

“दाम करी काम येड्या” या १९७१ सालच्या चित्रपटासाठी जगदीश खेबूडकर यांनी लिहीलेले गीत आज सकाळी शनिवारी श्री मारूतीचे दर्शन घेण्यासाठी गेलो असता कानावर पडले. नकळतपणे हे शब्द आजच्या घडीला किती तंतोतंत लागू पडतात याची जाणीव झाली. प्रभू श्री रामाची महती सांगून सत्तेवर आलेल्या भाजपच्या राज्यातही वासुदेवाची वाणी किती खरी ठरते हे या गाण्याच्या शब्दांतून आता खरे वाटायला लागले आहे. वासुदेवाची ऐका वानी “जगात न्हाई राम रे, दाम करी काम येड्या दाम करी काम” ही या गीताची सुरूवात. “मुह मे राम, बगल मे छुरी” अशी एक हिंदी कहावत आहे. देवाचे नाव घेऊन अपवित्र गोष्टी करायच्या ही तर आता अनेकांना सवयच जडली आहे. आपले नेते,पुढारी मोठ मोठ्या मंदिरात जाऊन धार्मिक विधी करतानाचे तसेच मंदिरांना पैसा, दागिन्यांचे दान करतानाचे फोटो आपल्याला त्यांच्या सोशल मीडियावर हटकून दिसतात. पण नेते, पुढारी म्हणून त्यांची कृती पाहिल्यानंतर हे धाडस ते करूच कसे शकतात,असा प्रश्न पडतो. सामान्य माणूस बिचारा देवाला घाबरतो. कुठलेही वाईट काम किंवा खोटे काम करायची वेळ येते तेव्हा तो स्वतःला दचकतो. पण बिनधास्तपणे पाप करणाऱ्या या नेत्यांना देवाच्या पायांकडे लोटांगण घालताना खरेच काहीच वाटत नसावे काय,असा सवाल नेहमीच पडतो. आज गोव्यातील राजकीय परिस्थिती पाहील्यानंतर जगदीश खेबूडकरांच्या या ५० वर्षांपूर्वीच्या गीताचे शब्द तेवढेच जिवंत वाटतात. आपले सगळे राजकारण हे केवळ पैशांभोवतीच फिरते की काय,अशी परिस्थीती निर्माण झाली आहे. पैसा असेल तर कुठलीही गोष्ट असाध्य नाही असाच जणू संदेश सर्वंत्र पसरला आहे. माणूस कळत नकळत या पैशांच्या मागे फरफटत चालला आहे. तो दिवसेंदिवस आंधळा बनत चालला आहे आणि पैशांमुळे माणूसकीही हरवत चालली आहे,अशी निराशाजनक परिस्थिती उदभवली आहे. आपण गरीब असताना किती सुखी, समाधानी होतो परंतु या पैशांच्या मागे लागून किती स्वार्थी आणि आपमतलबी झाले हेच कळले नाही. पैशांनी देवालाही विकत घेता येते, इथपर्यंत माणसाने झेप घेतली आहे. माणसामाणसांतील स्पर्धा ही केवळ पैसा आणि प्रतिष्ठेसाठी लागली आहे. राजकारणात पैशांसमोर सगळेच नगण्य अशी अवस्था आहे. कुणी प्रत्यक्ष देवाकडे आपण बोलतो,असे म्हणत आहे तर देवासमोर शपथ घेऊनही निर्लज्यपणे या शपथेच्याविरोधात जातो, त्यालाही काहीच वाटत नाही. भोळाभाबडा सामान्य माणूस देवावर श्रद्धा ठेवून वागतो पण मोठ मोठी माणसे देवालाही आपल्या कवेत घेऊन वावरतात. देवाला मोठ मोठे दान देऊन देवाला आपल्या शब्दात अडकवून ठेवण्याची कृतीही अलिकडच्या काळात सुरू असल्याचे दिसून येते. हा देव म्हणे या व्यक्तीच्या कलानेच वागतो मग सामान्य माणसांसाठी कुठल्या गाभाऱ्यातला देव राहीला आहे, याचा आता शोध घ्यावा लागणार आहे. हा देव आता आपला खरा अवतार दाखवणार तरी कधी. देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र भूमीत आता देव आपले अस्तित्व दाखवणार आहे की नाही ?

  • Related Posts

    अपशकुनाची शकुनी क्लुप्ती ?

    चिंबल आंदोलनातून सरकार काही धडा घेईल अशी अपेक्षा होती; मात्र सरकार त्यातून काहीच बोध घेत नाही. त्यामुळे हे आंदोलन आगामी विधानसभा निवडणुकीत काही आमदारांना अपशकुन ठरवण्यासाठी वापरले जात नाही ना,…

    संवेदनशीलता विरुद्ध वास्तव

    समाजात अनैतिक मानल्या गेलेल्या गोष्टींना पर्यटनाच्या नावाखाली प्रतिष्ठा मिळत असताना मुलांच्या हितासाठी मोबाईलबंदीचा विचार करणे हा विरोधाभास असला तरी, भविष्यातील पिढी सुरक्षित ठेवण्यासाठी या विषयावर गंभीरपणे विचार करणे ही काळाची…

    You Missed

    14/02/2026 e-paper

    14/02/2026 e-paper

    Enough is Enough: Citizens Push for Agricultural Land Protection Bill

    अपशकुनाची शकुनी क्लुप्ती ?

    अपशकुनाची शकुनी क्लुप्ती ?

    महाकाय कॅसिनो जहाज नकोच!

    महाकाय कॅसिनो जहाज नकोच!

    Capital City Stands Firm Against Casino Invasion

    Capital City Stands Firm Against Casino Invasion

    13/02/2026 e-paper

    13/02/2026 e-paper