
सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांची कायदेशीर नोटीस
गांवकारी,दि.२९(प्रतिनिधी)
गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधीकरण(जीसीझेडएमए) चे तत्कालीन सदस्य सचिव दशरथ रेडकर तथा गोवा हॉटेल्स अँड रिएलिटी प्रा.लिमिटेडचे प्रतिनिधी सतीश भट यांच्याविरोधात ताबडतोब गुन्हा नोंद करण्याची मागणी करणारी कायदेशीर नोटीस सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांनी जारी केली आहे.
गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधीकरणाचे सदस्य सचिव सचीन देसाई यांना ही कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीशीत बांबोळी येथील हॉटेल ग्रँड हयातला सरंक्षण भिंतीसाठी जारी केलेला ना हरकत दाखला ताबडतोब मागे घेण्यात यावा, किनारी क्षेत्र नियमनचे उल्लंघन करून बेकायदेशीररित्या उभारलेली सरंक्षण भिंत ताबडतोब हटविण्यात यावी तसेच हॉटेलला बांबोळी किनाऱ्यावर सरंक्षण भिंत उभारण्यासाठी खोटा दाखला जारी करून तसेच या खोट्या दाखल्याचा वापर करून हे बेकायदेशीर बांधकाम उभारल्याचा ठपका ठेवून तत्कालीन प्राधीकरणाचे सदस्य सचिव दशरथ रेडकर आणि हॉटेल कंपनीचे प्रतिनिधी सतीश भट यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
काम बंद नोटीस मागे का घेतली ?
विविध सामाजिक, राजकीय स्तरावरून बांबोळीतील हॉटेल ग्रँड हयातकडून सुरू असलेल्या बेकायदा सरंक्षण भिंतीचा विषय उपस्थित झाल्यानंतर जीसीझेडएमएकडून हॉटेल कंपनीला काम बंदचे आदेश देणारी नोटीस जारी केली होती. या नोटीशीला कंपनीकडून उत्तर देऊन काम बंद नोटीस मागे घेण्याची विनंती करण्यात आली. या उत्तरात कंपनीकडून सर्व आवश्यक नगर नियोजन, जीसीझेडएमए, कुडका पंचायत आदींचे परवाने असल्याचा दावा करून हे काम अधिकृत असल्याचे सांगण्यात आले. जीसीझेडएमने २३ सप्टेंबर २०२१ रोजी ना हरकत दाखल दिला होता आणि तो पाच वर्षांसाठी ग्राह्य असल्याने काम बंद नोटीस बेकायदा आहे,असाही युक्तीवाद या प्रत्यूत्तरात करण्यात आला. या युक्तीवादाच्या आधारावर प्राधीकरणाकडून जारी केलेली काम बंद नोटीस मागे घेण्यात आली.
ना हरकत दाखल्यालाच हरकत ?
जीसीझेडएमने काम बंद नोटीस मागे घेण्याच्या कृतीला विरोध करून मुळातच प्राधीकरणाकडून २३ सप्टेंबर २०२१ रोजी जारी केलेल्या ना हरकत दाखल्यालाच स्वप्नेश शेर्लेकर यांनी हरकत घेतली आहे, दशरथ रेडकर यांनी हा दाखला कुठल्या आधारावर जारी केला, असा सवाल करत प्राधीकरणाच्या २७१ व्या बैठकीत सरंक्षण भिंत उभारणीला मंजूरी दिल्याचे म्हटले आहे. पण मुळात या बैठकीसमोरच्या इतिवृत्तात हॉटेलचा अर्ज किंवा चर्चा झाल्याची कुठेच नोंद नसल्याची धक्कादायक माहिती शेर्लेकर यांनी उघड केली आहे. या बैठकीसमोर हा विषय उपस्थितही झाला नाही किंवा मंजूरही झाला नाही. ह्याचा अर्थ खोट्या माहितीच्या आधारावर बनावट दाखला तयार करून देण्यात आल्याचा आरोप शेर्लेकर यांनी केला. हॉटेलचे प्रतिनिधी सतीश भट यांनी बांबोळी किनाऱ्यावर सरंक्षण भिंत उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात सामान तथा साहित्य टाकल्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा नोंद होण्याची गरज आहे, असेही शेर्लेकर यांनी म्हटले आहे.
या कायदेशीर नोटीशीवर कारवाई झाली नाही तर मग कायद्याचा मार्ग स्वीकारून पुढील कृती केली जाईल,असेही शेर्लेकर यांनी नोटीशीत नमुद केले आहे.