
आपच्या पराभवाचा साखळीत विजयोत्सव
पणजी,दि.९(प्रतिनिधी)
दिल्ली विधानसभेवर भाजपचे कमळ फडकल्याचे स्पष्ट संकेत निवडणूक निकालांतून मिळाल्यानंतर गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघात हा अनोखा विजयोत्सव साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक हे देखील या विजयोत्सवात सहभागी झाले.
केंद्रात भाजपसाठी खरी डोकेदुखी ठरलेल्या आम आदमी पार्टीला भाजपने अखेर दिल्ली विधानसभेतून उखडून टाकण्यात यश मिळवले आहे. दिल्ली विधानसभेच्या निकालांचे कल भाजपच्या बाजूने आल्याने आणि भाजपला दिल्लीत स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे निश्चित झाल्याने देशभरात भाजपने जल्लोष केला. भाजपवर प्रखर टीका करण्यात यश मिळवून आम आदमी पार्टीने भाजपचा प्रमुख विरोधक अशी आपली प्रतिमा तयार केली होती. काँग्रेसला खिळखिळी करण्यात आपने यश मिळवले होते. परंतु दिल्लीतील वेगवेगळ्या निर्णयांवरून हा पक्ष अडचणीत आला होता. खुद्द मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदीया यांना तुरूंगाची हवी खावी लागली होती. या दोन्ही प्रमुख नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांनी मात्र विजय मिळवला. शेवटचे निकाल हाती लागले त्यात भाजपने ४५ पर्यंत मजल मारली होती तर आपचा झाडू २२ पर्यंतच अडकलेला पाहायला मिळत होता.
काँग्रेसच्या खात्यात शुन्य
विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाचा सपशेल पराभव या निवडणूकीत झाला. दिल्लीतील निवडणूकीत पक्षाला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. खुद्द दिल्लीत गांधी कुटुंबियांचा काहीच लाभ होत नसेल तर काँग्रेसचे भवितव्यही धोक्यात असल्याचे संकेत या निकालांतून दिसत असल्याच्या प्रतिक्रिया राजकीय जाणकारांनी व्यक्त केल्या आहेत.
२७ वर्षानंतर भाजप सत्तेत
देशाच्या राजधानीवर भाजप गेली २७ वर्षे सत्तेपासून दूर आहे. ती सत्ता आता भाजपला पुन्हा प्राप्त होणार आहे. दिल्लीत काँग्रेसच्या सत्तेनंतर आपने बाजी मारली होती. लोकसभा निवडणूकीत भाजपने यश मिळवले असले तरी दिल्ली विधानसभेत मात्र भाजपला अपेक्षीत यश मिळू शकले नव्हते. आता देशावर राज्य करणाऱ्या भाजपकडे दिल्लीच्या सत्तेची सुत्रे हाती आल्यामुळे भाजपला दिलासा मिळाला आहे.
केजरीवालांच्या भूमिकेकडे लक्ष
विधानसभेत पराभव पत्करावा लागलेले अरविंद केजरीवाल हे नेमकी काय भूमीका घेतात, याकडे अनेकांचे लक्ष लागून राहीलेले आहे. त्यांच्या भूमीकेवरच या पक्षाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. भाजपने सत्तेचा वापर करून केजरीवालांना सरकार चालवण्यात अनेक अडचणी आणल्या. त्यांची रवानगी तुरूंगात केली. आता विरोधी पक्ष म्हणून आप कशा पद्धतीने भाजपला जेरीस आणू शकतो, यावर विचारमंथन केले जाणार आहे. पक्षाचे आमदार फुटून भाजपात जाऊ नयेत, यासाठी काळजी घेतली जात असल्याचीही माहिती प्राप्त झाली आहे.