एक भारत, श्रेष्ठ भारत !

देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांना भावनिक आधार मिळाला, तर प्रत्येक घरातून देशासाठी समर्पणाची भावना वाढीस लागेल.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे सडेतोड प्रत्युत्तर भारताने दिल्यामुळे पाकिस्तानची अवस्था केविलवाणी झाली आहे. प्रारंभी नऊ अतिरेक्यांच्या तळांवर हवाई हल्ला करून ते उध्वस्त केले गेले, ज्यामुळे शेकडो दहशतवादी ठार झाल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानी सैनिकांनी सीमेवर बेछूट गोळीबार केला, ज्यात सीमेलगतच्या गावांतील अनेक भारतीय नागरिक आणि एक भारतीय जवान शहीद झाल्याची माहिती मिळत आहे.
ऑपरेशन सिंदूर ही केवळ २५ मिनिटांची कारवाई असली तरी भारताच्या आक्रमक पवित्र्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढत आहे. पाकिस्तानकडूनही प्रतिउत्तराच्या धमक्या दिल्या जात असल्यामुळे हा संघर्ष युद्धात रूपांतरित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भारताने पाकिस्तानला नामोहरम करण्याच्या उद्देशाने हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. कालपर्यंत कराची, लाहोरसह पाकिस्तानच्या अनेक प्रमुख शहरांवर भारताने मिसाइल्सचा मारा करून त्याला जबर धक्का दिला आहे. पेहलगाम दहशतवादी हल्ल्याचे परिणाम पाकिस्तानने का भोगावे, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. मात्र, सीमेलगतच्या घुसखोरीत आणि दहशतवादी कारवायांत पाकिस्तानचा हात असल्याचे अनेक पुरावे भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर केले आहेत.
ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या टप्प्यातील हवाई हल्ल्यांतून दहशतवादी तळ उध्वस्त झाल्याचे संपूर्ण जगाने पाहिले आहे. त्यामुळे दहशतवादाच्या स्वरूपात वावरणाऱ्या पाकिस्तानला या हल्ल्यांतून हात वर करता येणार नाही.
दहशतवादाविरोधातील ही कारवाई प्रारंभी मर्यादित समजली जात होती. मात्र, भारताच्या कठोर भूमिकेमुळे याचे रूपांतर प्रत्यक्ष युद्धात होण्याची शक्यता आहे. भारताशी समोरासमोर युद्ध करण्याची पाकिस्तानची ताकद नाही, तर भारताच्या सध्याच्या आक्रमक पवित्र्याला तात्काळ प्रत्युत्तर देण्याची क्षमता पाकिस्तानात नाही. मात्र, पाकिस्तान छुप्या किंवा आत्मघातकी हल्ल्यांमध्ये पटाईत आहे. अशा आत्मघातकी हल्ल्यांना रोखायचे असेल, तर अंतर्गत सुरक्षायंत्रणा चोख असणे आवश्यक आहे.
दर एका भारतीयाने सतर्क राहून आपल्या अवतीभोवतीच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्याची गरज आहे. सीमेलगत आपले जवान जसे डोळ्यात तेल घालून पहारा करतात, तसेच देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक नागरिकाने सतर्क राहिले पाहिजे. केवळ जनतेने सतर्क राहून उपयोग नाही; संशयास्पद हालचाली आढळल्यास नागरिकांनी त्वरित सरकारी यंत्रणांना माहिती दिली पाहिजे. तसे झाल्यास संभाव्य धोका टाळण्यासाठी यंत्रणाही तत्परतेने कार्यरत राहू शकते.
युद्धाच्या या काळात संपूर्ण भारत एकसंघ आहे. भारतीय जनता सरकार आणि संरक्षण यंत्रणांच्या मागे ठामपणे उभी आहे. आपल्या अवतीभोवती कोणत्याही जवानाचे कुटुंब राहत असेल, तर त्यांना धीर देण्याची जबाबदारी आपली आहे. या प्रसंगी जवानांच्या कुटुंबाच्या मागे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांना भावनिक आधार मिळाला, तर प्रत्येक घरातून देशासाठी समर्पणाची भावना वाढीस लागेल.
या कठीण प्रसंगात संयम बाळगणे आणि जबाबदारीने वागणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.

  • Related Posts

    १६१ दिवसांच्या लढ्याला विसावा

    पण कारापूरने गोव्याला एक संदेश दिला आहे, सत्ता मोठी असू शकते, पैसा मोठा असू शकतो; मात्र आपल्या मातीसाठी उभा राहिलेला सामान्य माणूस त्याहून मोठा असतो. १६१ दिवसांनंतर कारापूर-सर्वण येथील हाऊस…

    संयमाची परीक्षा घेऊ नका !

    आता राजकीय पक्षांनी निर्णय घ्यायचा आहे. गोव्याच्या बाजूने उभे राहायचे की गोव्याच्या लुटीच्या बाजूने ? गोवा आज निर्णायक वळणावर उभा आहे. एका बाजूला विकासाच्या नावाखाली जमिनींचे व्यवहार, मोठमोठे प्रकल्प, काँक्रीटची…

    You Missed

    Yash Fadte Goes Down Fighting in PSA Aramis Club Open Quarterfinals

    Yash Fadte Goes Down Fighting in PSA Aramis Club Open Quarterfinals

    प्रभव नायकांकडून मल्टिलेव्हल पार्किंग प्रकल्पाचा‘अपयशाचा ११वा वर्धापनदिन’ पाळला

    प्रभव नायकांकडून मल्टिलेव्हल पार्किंग प्रकल्पाचा‘अपयशाचा ११वा वर्धापनदिन’ पाळला

    1526–2026: 500 Years of the Foral

    1526–2026: 500 Years of the Foral

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…: गोमंतकीय भूमीपुत्राचे गणरायाला भावनिक साकडे

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…: गोमंतकीय भूमीपुत्राचे गणरायाला भावनिक साकडे

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…

    Kejriwal’s Goa Visit Sparks Political Buzz; Major Announcement Today at 3 PM

    Kejriwal’s Goa Visit Sparks Political Buzz; Major Announcement Today at 3 PM