
“फुले” चित्रपटाचे प्रमोशन केल्यास हाच डाव बुमरॅँग होईल आणि इतिहासाच्या गर्भात लपलेली भुते परत नाचू लागतील, अशी भीती त्यांना आहे.
“फुले” हा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बराच चर्चेत आहे. अनंत महादेवन यांचे दिग्दर्शन आणि प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांच्या प्रमुख भूमिका. फुले दाम्पत्याच्या समाजसुधारणेवर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. विशेषतः स्त्री शिक्षण, जातिभेद निर्मूलन आणि सत्यशोधक समाजाच्या स्थापनेवर आधारित हा हिंदी भाषेतील चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. तत्कालीन ब्राह्मणवादी व्यवस्थेचा विरोध करून फुले दाम्पत्यांनी स्त्री शिक्षणासाठी घेतलेली मेहनत तसेच समाजसुधारणेचा उचललेला विडा ही एक मोठी क्रांतीच होती. त्यात फातिमा शेख आणि लहूजी वस्ताद यांचे योगदानही या चित्रपटात अधोरेखित करण्यात आले आहे.
फुले चित्रपटातील कथानक आणि त्यात दाखवलेल्या सगळ्या गोष्टी प्राप्त परिस्थितीत सत्ताधारी राजकीय व्यवस्थेला झोंबणाऱ्या असल्याने हा चित्रपट करमुक्त कसा करणार. धर्माच्या अफूची गोळी पाजून बहुजन समाजाला आपल्या इशाऱ्यावर नाचवण्याची सवय जडलेल्यांना हे समाज वास्तव सहन होणार नाहीच. छावा चित्रपटाला करमुक्त करून चित्रपटाच्या प्रमोशनव्दारे छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम आणि शौर्याच्या आड बहुजन समाजाच्या मनात नकळतपणे धार्मिक द्वेष आणि मत्सर पसरवण्याचा छुपा डाव काही लपून राहिला नाही. फुले चित्रपटाचे प्रमोशन केल्यास हाच डाव बुमरॅँग होईल. इतिहासाच्या गर्भात लपलेली भुते परत नाचू लागतील, हे त्यांना कसे परवडणार.
आपल्याकडे अनेक तज्ज्ञ इतिहास अभ्यासक आहेत. ते फक्त धार्मिक दुर्बिणीतूनच संशोधन करतात. पोर्तुगीजांनी किती हिंदूंची मंदिरे जमीनदोस्त केली, बाटबाटीत लोकांचा कसा छळ केला तसेच शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनी गोमंतकीयांना या धर्मछळापासून कसा अभय दिला, या गोष्टींवर विविध व्याख्याने, लेख किंवा कार्यक्रम आयोजित होतात. पण या इतिहासाच्या गर्भात इथल्या बहुजन समाजाचे भविष्य कसे गाडण्यात आले, यावर कुणीच बोलत नाही. बहुजन समाजाच्या जमिनी कुणी हडप केल्या, त्यांचा सामाजिक छळ कुणी केला, त्यांच्या सामाजिक हक्कांवर कुणी गदा आणली, ते आजतागायत वंचित कसे काय, ह्यात कुणालाच रस नाही.
पोर्तुगीज आणि पोर्तुगीज भाषेला राष्ट्रविरोधाचा मुलामा चढवून बहुजन समाजाला त्यापासून अलिप्त ठेवले आणि ह्याच पोर्तुगीज भाषेच्या बळावर आपल्या वडिलोपार्जित सवलती आणि हक्क प्राप्त करून घेतले. या पोर्तुगीज भाषेची ओळख बहुजन समाजाला झाली असती तर यांची कारस्थाने टराटरा फाटली असती. बहुजन समाजाला इतिहास, धर्म आणि देव ह्यातच गुंतवून ठेवले. सत्तेच्या खुर्चीवर बसून आपला स्वार्थ साधत राहिले. पुरातन खात्यात या कागदपत्रांवर धूळ साचली आहे. ती धूळ साफ करून बहुजन समाजाच्या बुद्धीवाद्यांनी या इतिहासाच्या गर्भातील वास्तव आणि सत्य शोधून काढले पाहिजे. केवळ आभासी धर्माभिमान आणि राष्ट्रवाद जोपासून बहुजन समाजाला वास्तव आणि सत्यापासून दूर ठेवण्याचा हा डाव वेळीच ओळखण्याची गरज आहे.
ज्योतीबा फुले १८६८ साली रायगडावर गेले आणि त्यांनी महाराजांच्या समाधीचा शोध लावला. १८८० साली त्यांनी पुण्यात आणि रायगडावर शिवजयंती उत्सव साजरा केला. परंतु लोकमान्य टिळक यांनी १८९५-९६ मध्ये सार्वजनिक स्वरूपात शिवजयंती साजरी केली, असाही दावा केला जातो. इथेच पूर्वकालापासून हा सामाजिक संघर्ष सुरू आहे, हेच दिसते.
फुले चित्रपटाचे प्रमोशन सरकार, सत्ताधारी पक्ष किंवा कुठलाही राजकीय पक्ष करू शकणार नाही. ही जबाबदारी समाज सुधारक किंवा सामाजिक संस्थांना उचलावी लागेल. फुले दाम्पत्याचे हे कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला तर निश्चितच हा विचार समाजात रुजवता येणे शक्य आहे. हे आव्हान सामाजिक संस्था स्वीकारणार काय?