हातात नारळ की नारळावर हात !

जनतेला आज केवळ निवडणुकीपुरती युती नको आहे; तिला विश्वासार्ह, प्रामाणिक आणि दीर्घकाळ टिकणारा पर्याय हवा आहे.

गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधी मतांचे एकत्रीकरण हा सर्वाधिक चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या अनेक वर्षांत सत्तेवर असलेल्या भाजपला प्रभावी पर्याय उभा राहावा, अशी अपेक्षा मोठ्या प्रमाणावर व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आम आदमी पक्षामध्ये युतीची चर्चा सुरू झाली, विविध समित्यांची घोषणाही झाली. मात्र या घडामोडी जितक्या आशादायक वाटतात, तितक्याच त्या नेत्यांच्या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे संशयास्पदही ठरतात. म्हणूनच आज प्रश्न पडतो, विरोधकांच्या हातात खरोखरच एकजुटीचा नारळ आहे की नारळावर केवळ हात ठेवून लोकांना दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे?

काँग्रेसने केंद्रीय प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अधिकृत समिती जाहीर केली. गोवा फॉरवर्डने राजकीय व्यवहार समितीची पुनर्स्थापना केली. आम आदमी पक्षानेही स्थानिक स्तरावर चर्चा करण्यासाठी समिती नेमली. परंतु समित्या स्थापन करणे आणि मनापासून युती करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. युतीचे खरे यश हे कागदावरील समित्यांमध्ये नसून संबंधित पक्षांच्या नेतृत्वाच्या मानसिकतेत असते.

याच ठिकाणी विरोधकांची खरी कसोटी लागते. एकीकडे युतीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे सार्वजनिक व्यासपीठावरून एकमेकांवर टीका करण्याचे प्रकार सुरूच आहेत. विजय सरदेसाई यांनी काँग्रेसबाबत केलेली टिप्पणी असो किंवा युतीसाठी “गोमंतकीय जनता हाच आमचा हायकमांड” असे केलेले विधान असो, अशा वक्तव्यांमुळे विश्वासाचे वातावरण तयार होण्याऐवजी संशय अधिक गडद होतो. युतीची चर्चा सुरू असताना भागीदार पक्षाला टोमणे मारण्यामागे नेमका कोणता राजकीय संदेश आहे, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.

विधानसभा अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी बोलावलेल्या बैठकीवरून निर्माण झालेला वादही त्याचेच उदाहरण आहे. निमंत्रणाबाबत झालेला विसंवाद हा केवळ तांत्रिक प्रश्न नव्हता; तो विरोधी पक्षांच्या नेतृत्वामधील संवादाच्या अभावाचे प्रतीक होता. विश्वास, समन्वय आणि परस्पर सन्मान यांच्याशिवाय कोणतीही आघाडी टिकत नाही. निवडणुकीपूर्वीच अशी परिस्थिती असेल, तर निवडणुकीनंतर ती अधिक गुंतागुंतीची होणार नाही याची खात्री कोण देणार?

गोव्यातील जनतेची मानसिकता आणि विरोधकांची मानसिकता यात आज स्पष्ट तफावत दिसते. जनता सत्तांतराची चर्चा करते, तर अनेक विरोधी नेते सत्तेतील वाटा, जागावाटप आणि राजकीय वजन यांची गणिते मांडताना दिसतात. भाजपला पराभूत करण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा जर विरोधकांनी एकमेकांवर कुरघोडी करण्यातच खर्च केली, तर त्याचा सर्वाधिक फायदा सत्ताधाऱ्यांनाच होणार, हे उघड आहे.

जनतेला आज केवळ निवडणुकीपुरती युती नको आहे; तिला विश्वासार्ह, प्रामाणिक आणि दीर्घकाळ टिकणारा पर्याय हवा आहे. विरोधकांनी जर अहंकार, संशय आणि परस्पर अविश्वास बाजूला ठेवला नाही, तर “भाजप हटवा” ही घोषणा केवळ घोषणाच राहील. अन्यथा इतिहास पुन्हा एकदा सांगेल, विरोधकांच्या हातात नारळ नव्हता, ते फक्त नारळावर हात ठेवून उभे होते.

  • Related Posts

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    मात्र खरी कसोटी आता समाजाचीच आहे. राजकीय आरक्षण हे समाजाला सत्तेच्या वाटचालीत सहभागी करून घेणारे वरदान ठरावे की वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षा, गटबाजी आणि मतभेदांमुळे शाप ठरावे, हे समाजधुरिणांनी ठरवायचे आहे.…

    रोजगार: आभास आणि वास्तव

    विधानसभेत सरकारने दिलेल्या माहितीनुसार मागील पाच वर्षांत मंडळाअंतर्गत प्रत्यक्ष उभारलेल्या उद्योगांमध्ये केवळ १,५११ गोमंतकीयांना रोजगार मिळाल्याची माहिती समोर आली आहे. राज्य पर्यावरण परिणाम मूल्यांकन प्राधिकरणाने वेर्णा औद्योगिक वसाहतीतील एका औषधनिर्मिती…

    You Missed

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    14/08/2026 e-paper

    14/08/2026 e-paper

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027

    Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027

    Panchayat Fails to Act in 30 Days; Deputy Director to Take Over Powers Against Verla-Canca Structure

    Panchayat Fails to Act in 30 Days; Deputy Director to Take Over Powers Against Verla-Canca Structure