ज्यूड कार्व्हालो साहेब काय हे ?

वास्तविक, रोज महामार्गाचे निरीक्षण करून कुठे धोका निर्माण झाला आहे, हे ताबडतोब सुधारण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांची आहे. परंतु जेव्हा कंत्राटदारांकडून हप्ते गोळा करण्याचे काम अधिकाऱ्यांकडे दिले जाते, तेव्हा ते आपले मूळ कर्तव्यच विसरतात.

राष्ट्रीय महामार्ग – ६६ च्या विभाग – ७ चे कार्यकारी अभियंते ज्यूड कार्व्हालो पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. यापूर्वी पर्वरी येथील महामार्गानजीक श्री खाप्रेश्वर देवाची मूर्ती हटवताना त्यांच्या वागणुकीबाबत आगळीक झाली होती. आता गणेश चतुर्थीच्या काळात पर्वरी–ओ कोकेरो ते मॉल दी गोवा दरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी अचानक बंद ठेवण्याचा आदेश देणे हे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बेजबाबदारपणाचा कळसच म्हणावा लागेल.
पर्वरी उड्डाणपुलामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि सध्याच्या धोकादायक सर्व्हिस रोडवरून रोज जीव मुठीत धरून, खड्ड्यांतून मार्ग काढणाऱ्या जनतेकडे सरकार आणि विशेषतः सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्षच होत आहे. जनताही आता रोजचे हे धक्के सहन करत सरावलेली आहे. कारण याबाबतीत सगळेचजण भीतीपोटी मुग गिळून गप्प आहेत. जनतेचे हे मौनच सरकारला आणि प्रशासनाला अधिक मुजोर आणि बेजबाबदार वागणुकीला प्रोत्साहन देत असल्याचे वेगवेगळ्या निर्णयांवरून स्पष्टपणे दिसून येते.
चतुर्थीच्या काळात या महामार्गावरून वाहतुकीची रहदारी वाढणार आहे. लोक आपापल्या गावी सणासाठी परतणार आहेत. अशा वेळी वाहतूक बदलण्याची योजना ज्यूड कार्व्हालो यांच्या मनात आलीच कशी? चतुर्थीच्या सणाचे महत्त्व आणि त्या निमित्ताने होणारी वाहतुकीची कोंडी ही साधी गोष्ट जर या जबाबदार अधिकाऱ्यांच्या लक्षात आली नसेल, तर त्यांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे.
पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांना हस्तक्षेप करून अखेर ही योजना स्थगित करावी लागली. चतुर्थीपर्यंत वाहतुकीत कोणताही बदल न करण्याचे ठरले. सार्वजनिक बांधकाम खाते हाताळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आश्चर्यकारक विधान करत सांगितले की, चतुर्थीनंतर योग्य नियोजन करूनच वाहतूकीत बदल केला जाईल. याचा अर्थ असा की वाहतूक वळविण्याचा निर्णय त्यांच्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी कोणतेही नियोजन न करता घेतला होता काय? रहदारीवर प्रचंड परिणाम करणारा निर्णय विचार न करता घेतला गेला होता काय? म्हणजे हे अधिकारी भानावर नसतात की त्यांना काहीच पडलेले नसते, याचे उत्तर शोधणे आवश्यक आहे.
“दोन दिवसांत सगळे खड्डे बुजवले जातील,” असे विधान करणे म्हणजे सामान्य जनतेची थट्टाच. ही विधाने प्रचंड मानसिक वेदना देतात. असंवेदनशीलपणे अशी विधाने केली जातात खरी, परंतु त्यातून संवेदनशील माणसाला वेदना होतात, हे सरकारला कसे समजत नाही?
राष्ट्रीय महामार्ग-६६ चे कार्यकारी अभियंते म्हणून काम करणारे ज्यूड कार्व्हालो यांनी पत्रादेवी ते बांबोळीपर्यंतच्या संपूर्ण पट्ट्याचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. या महामार्गाचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने होत नाही. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साठते आणि भरधाव वाहनांमुळे ते पाणी समोरील वाहनाच्या दर्शनी काचेवर उडते, ज्यामुळे भयानक अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. या अधिकाऱ्यांना याचे काहीच पडलेले नाही.
वास्तविक, रोज महामार्गाचे निरीक्षण करून कुठे धोका निर्माण झाला आहे, हे ताबडतोब सुधारण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांची आहे. परंतु जेव्हा कंत्राटदारांकडून हप्ते गोळा करण्याचे काम अधिकाऱ्यांकडे दिले जाते, तेव्हा ते आपले मूळ कर्तव्यच विसरतात.

  • Related Posts

    भाजप महिला जागी हो !

    भाजपमधील महिला संघटनात्मक पातळीवर सक्रिय असूनही समाजातील महिलांवरील अन्याय, अत्याचार तसेच महिलांशी संबंधित विषयांवर गप्प का राहतात, हा खरा चर्चेचा विषय आहे. महिला हीच खरी भाजपची ताकद आहे. भाजपाच्या यशात…

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…

    पोलिस खाते असे वागू लागले तर ती धोक्याची सूचना आहे. पोलिसांवरचा लोकांचा विश्वास गेला तर प्रत्येकजण न्यायासाठी स्वतःचा मार्ग पत्करू लागेल. प्रत्येकाने स्वतःच न्यायनिवाडा सुरू केला तर राज्यात अराजकता माजण्यास…

    You Missed

    Curchorem Scandal: Mahila Congress Steps In to Support Victims, Flags Institutional Vacuums

    Curchorem Scandal: Mahila Congress Steps In to Support Victims, Flags Institutional Vacuums

    24/03/2026 e-paper

    24/03/2026 e-paper

    ३९ (ए) चे भूत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात

    ३९ (ए) चे भूत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात

    भाजप महिला जागी हो !

    भाजप महिला जागी हो !

    23/03/2026 e-paper

    23/03/2026 e-paper

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…