बाजारपेठ, रस्ते जलमय; जनजीवन विस्कळीत
गांवकारी, दि. ६ (प्रतिनिधी)
राज्यात गेल्या चोवीस तासांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे म्हापसा शहरात कहर झाला आहे. खोर्ली परिसरात डोंगरावरून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी वाहून आल्यामुळे रस्ते पूर्णतः पाण्याखाली गेले आहेत. श्री बोडगेश्वर मंदिराजवळील रस्ता आणि म्हापशातील बाजारपेठ जलमय झाल्यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.
अलिकडच्या काळात म्हापसा शहराला पावसाचा मोठा फटका बसू लागला आहे. आजची घटना ही मागील काळात खोर्लीत निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीची आठवण करून देणारी ठरली. गेल्या चोवीस तासांत म्हापशात ४.७६ इंच पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे खोर्ली पठारावरून खाली वाहणाऱ्या पाण्यामुळे बाजारपेठ आणि इतर भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
नगरपालिकेच्या अपयशाचा पोलखोल
म्हापसा नगरपालिका पावसाच्या पाण्याचे नियोजन आणि निचऱ्याची सुविधा निर्माण करण्यात सपशेल अपयशी ठरली आहे. शहरातील महत्त्वाच्या विषयांकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याची टीका म्हापशाचे नागरिक अॅड. महेश राणे यांनी केली. देशातील विविध राज्यांतील नैसर्गिक आपत्तींच्या घटनांमुळे म्हापसेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
डोंगर पठारावर बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणांमुळे पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नाही. त्यामुळेच अशा पूरसदृश परिस्थिती उद्भवत आहे. अलिकडच्या काळात पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सखोल अभ्यास करून वेळीच उपाययोजना आखली नाही, तर भविष्यात मोठे संकट ओढवू शकते, असा इशारा राणे यांनी दिला.





