कुणीही यावे टोपी घालून जावे

भ्रष्टाचार न करणाऱ्यांना आत्ताचा समाज मुर्खाच्या यादीत टाकतो आणि अप्रमाणिकपणे पैसे जमवून ते मिरवणाऱ्याला आपला आदर्श मानतो. ही मानसिकता नेमकी आपल्याला कुठे नेऊ पाहत आहे?

राज्यात विविध फसवणूकीची प्रकरणे पाहील्यानंतर लहानपणी कुणीही यावे आणि टीचकी मारून जावे, या खेळाची आठवण येते. एरवी आम्ही गोंयकार हुशार असे म्हणून मिरवतो पण या हुशार गोंयकारांना जो तो सहजपणे टोपी घालतो हे पाहील्यानंतर आमच्या हुशारपणावरच संशय घेण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कदाचित या फसवणूकीला आमच्या हुशारीवर बोट ठेवण्यापेक्षा समोरील माणसावर अतिविश्वास ठेवण्याचा गुणही जबाबदार ठरतो की काय, हे देखील आम्हाला पाहावे लागणार आहे. पूर्वीच्या काळी हे चालत होते कारण त्यावेळी प्रामाणिकपणा शिल्लक होता. आता तो गायब झाला आहे, असे म्हणता येणार नाही पण नक्कीच लयाला गेला आहे हे मात्र नक्की. गोंयकार मोठ्या संख्येने परदेशात असल्याकारणाने त्यांच्याकडून आपल्या कुटुंबाला आणि विशेष करून आपल्या पालकांना पैसे पाठविण्याची पद्धत अजूनही सुरू आहे. महाराष्ट्रातला मराठी माणूस जरा मुंबईतल्या मनी ऑर्डरकडे टक लावून बसतो तसाच गोंयकार विदेशातून कधी पैसे खात्यात जमा होतात, याची वाट पाहत असतो. आता तंत्रज्ञानाच्या जोडीमुळे या गोष्टी सोप्या बनल्या आहेत. मग हे पैसे राखून ठेवायचे. कुणीतरी जादा व्याज देतो,असे सांगितले की त्याला बळी पडायचे. गोंयकारांच्या या आर्थिक गुपीताची माहिती असलेल्यांनी मग अशा लोकांना आपल्या मोहपाशात अडकवण्यास सुरूवात केली. सुरूवातीला वाढीव व्याज देऊन त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि उरलेली रक्कमही जमा करून घ्यायची आणि पसार व्हायचे,असे प्रकार कायम घडत राहीलेले आहेत. ही जागा नंतर सहकारी पतसंस्थांनी घेतली. आपलेच गोंयकार आपल्याच लोकांना या पतसंस्थेत ठेवी ठेवण्यासाठी आर्जव करायचे आणि मग त्यातून दिलेली कर्जे बुडल्यानंतर या ठेवींवर गंडांतर यायचे. अशा पतसंस्था, सहकारी संस्थांकडूनही कोट्यवधी रूपयांचा गंडा गोंयकारांना घातला आहे. गोंयकारांकडे मोठ्या प्रमाणात पैसा आहे फक्त तो कसा बाहेर काढायचा यासासी शक्कल लागते,असा समजच असले उद्योग करणाऱ्या लोकांनी करून ठेवला आहे. सध्याची प्रकरणे पाहील्यानंतर तो समज चुकीचा आहे,असे अजिबात म्हणता येणार नाही. नोकरीसाठी बिनधास्त लाखो रूपयांची लाच देणे, जादा व्याजासाठी खाजगी गुंतवणूक कंपन्यांत पैसे गुंतवायचे, मोबाईलवरील संदेश किंवा अन्य गोष्टींत फसून पैसे पाठवायचे, सायबर आमिषांना बळी पडायचे आदी अनेक प्रकार घडत आहेत. या सर्व आर्थिक गुन्हेगारी प्रकरणात मोठी शिक्षा होत नाही आणि सहजपणे सुटता येते,असेही कदाचित अनेकांना वाटत असेल म्हणून झटपट पैसे कमविण्याचा हा नवा धंदा सुरू झाला आहे. सुशेगाद आणि वोर्राद गोंयकार ही आपली ओळख. अलिकडे या वोर्रादपणात आपला गोंयकार इतका फसला आहे की पैशांसाठी कुठल्याही थराला जाण्याची तयारी त्याची बनत चालली आहे. इतका स्वार्थी आणि लालची गोंयकार कधीच नव्हता. ही मानसिकता राजकीय दूषीत संस्कारांमुळे घडली आहे आणि त्याचे परिणाम सामाजिक परिस्थितीवरही पडले आहेत. भ्रष्टाचार न करणाऱ्यांना आत्ताचा समाज मुर्खाच्या यादीत टाकतो आणि अप्रमाणिकपणे पैसे जमवून ते मिरवणाऱ्याला आपला आदर्श मानतो. ही मानसिकता नेमकी आपल्याला कुठे नेऊ पाहत आहे?

  • Related Posts

    दामू नाईक व्हा पुढे…

    भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हटल्यावर या पदाची प्रतिष्ठा, मानसन्मान आणि निर्णय प्रक्रियेतील या पदाचे वजन कायम राहणे ही खरी गरज आहे. गोवा भाजप प्रदेशाध्यक्षपदी दामोदर उर्फ सर्वांचे जवळचे दामू नाईक यांच्या निवडीची…

    “कॅप्टन वेन्झी खूष हुआ”

    कॅप्टन वेन्झींचे प्रमाणपत्र विरोधकांच्या आत्मविश्वासाला तडा देणारे ठरणार आहेच, परंतु विधानसभा अधिवेशनातही हे प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वास उंचावणारे ठरेल हे निश्चित. आम आदमी पार्टीचे बाणावलीचे आमदार कॅप्टन वेन्झी व्हिएगश यांनी कोलवा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    18/01/2025 e-paper

    18/01/2025 e-paper

    सूर्याचे लग्न !

    सूर्याचे लग्न !

    दामू नाईक व्हा पुढे…

    दामू नाईक व्हा पुढे…

    ‘स्वामित्व’ योजनेत गोवा सरकार नापास

    ‘स्वामित्व’ योजनेत गोवा सरकार नापास

    नवनिर्वाचित भाजपाध्यक्ष दामू कार्यकर्तृत्व महती त्याची काय वानू..!!

    नवनिर्वाचित भाजपाध्यक्ष दामू कार्यकर्तृत्व महती त्याची काय वानू..!!

    ‘गांव जाला जाण्टो’ आता मुंबईत

    ‘गांव जाला जाण्टो’ आता मुंबईत
    error: Content is protected !!