कुठे आहे काँग्रेस ?

शेवटी काँग्रेस सुधारली नाही तर जनतेला आपली निष्ठा बदलून अन्य पक्षांकडे वळावे लागेल; अन्यथा भाजप सत्तेवर पूर्ण कब्जा करण्याचा धोका संभवतो.

गोव्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाची सध्याची परिस्थिती पाहता, हा पक्ष खरोखरच निवडणूक लढविण्याच्या मानसिकतेत आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होतो. सध्या सर्वाधिक गरज असलेल्या क्षणी काँग्रेसचे अस्तित्वच दुर्मिळ होऊ लागले आहे. सध्या विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हे कुठेच दिसत नाहीत. युरी आलेमाव यांचे वडील तथा माजी मंत्री ज्योकीम आलेमाव यांना वैद्यकीय तपासणीसाठी गोव्याबाहेर न्यावे लागते, म्हणून ते कदाचित व्यस्त असावेत; पण मग अमित पाटकर कुठे आहेत?
अमित पाटकर यांच्या खुर्चीला सुरूंग लावण्यासाठी अनेकजण टपलेले होते, परंतु पाटकर यांनी यशस्वीरित्या त्यांचा डाव मोडून काढला. मात्र, आपली खुर्ची वाचवण्यासाठीच त्यांना ताकद पणाला लावावी लागली तर पक्षाला सत्तेची खुर्ची मिळवून देण्यासाठी वेळ ते कसा काढतील, हा प्रश्न आहे.
गोवा मुक्तीनंतर १९६३ मध्ये पहिली विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत शंभर टक्के यशाची खात्री बाळगून असलेल्या काँग्रेसला घोर निराशा झाली. त्यांना एकही जागा मिळाली नाही, अनेक उमेदवारांची अनामत जप्त झाली. या निकालाचा धसका इतका बसला की १९६७ च्या निवडणुकीत काँग्रेसने सहभागच घेतला नाही. काँग्रेसला सत्तेवर येण्यासाठी १९८० पर्यंत वाट पाहावी लागली. नंतर फोडाफोडीचे राजकारण करून काँग्रेसने सर्वाधिक काळ सत्ता टिकवली. आज ह्याच फोडाफोडीची परतफेड करून भाजप सत्तेवर आहे.
भाजपने दोन वेळा विरोधी पक्ष नेत्यांसह दोन तृतीयांश आमदारांना आपल्या बाजूला वळवून काँग्रेसचे विक्रम मोडीत काढले आहेत. आज काँग्रेस पक्षाची स्थिती अत्यंत दयनीय आहे. संघटनात्मक पातळीवर अंतर्गत धुसफुस आणि हेवेदावे यांनी पक्षाचे नैतिक धैर्य कोलमडले आहे. जुने कार्यकर्ते व हितचिंतक पक्षापासून दूर जात आहेत. सर्वांना एकत्र बांधून पुन्हा पक्ष उभारणीला चालना देणारे नेतृत्वच उरलेले नाही. अशा अवस्थेत काँग्रेस भाजपला कशी टक्कर देणार, हा खरा प्रश्न आहे.
एक केरळ राज्य वगळता उर्वरित राज्यांत काँग्रेसला घरघर लागली आहे. पक्षाला अस्तित्व टिकवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. सध्याच्या गोव्यात सुमारे २५ टक्के मतदार काँग्रेसकडे आहेत, म्हणून अजूनही त्यांचे नाणे वाजते आहे. मात्र ही टक्केवारी अन्य पक्षांकडे विलीन होऊ लागली आहे. संघटनात्मक व्यवस्थापनात सुधारणा न झाल्यास भाजपला याचा फायदा होईल. काँग्रेसला मिळणाऱ्या मताधिक्यामुळे इतर पक्षांच्या उमेदवारांना विजयी मताधिक्य मिळणे कठीण होईल आणि त्यात भाजपचे उमेदवार बाजी मारतील.
काँग्रेसची ताकद कमी होणे भाजपसाठी धोक्याचे आहे, कारण हा मतदार अन्य विरोधी पक्षांकडे वळू शकतो. भाजपला सत्तेपासून दूर लोटायचे असेल तर काँग्रेसला राजकीय रणांगणावर सक्रिय व्हावे लागेल. निष्क्रिय राहून निवडणुकीला सामोरे जाणे म्हणजे काँग्रेसकडून भाजपला विजय मिळवून देण्यासाठी पुरक स्थिती निर्माण करण्यासारखेच होईल.
या गलीतगात्र अवस्थेतील काँग्रेस भाजपसाठी पुरक तर इतर विरोधकांसाठी धोक्याचे ठरू शकते. काँग्रेसने खरोखरच चिंतन करण्याची गरज आहे. काँग्रेस श्रेष्ठींनी पक्षाकडे गंभीरतेने पाहायला हवे. स्थानिक नेत्यांवर त्यांचा विश्वास नसला तरी पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना चुचकारावे लागते, अशी अवस्था झाली आहे. शेवटी काँग्रेस सुधारली नाही तर जनतेला आपली निष्ठा बदलून अन्य पक्षांकडे वळावे लागेल; अन्यथा भाजप सत्तेवर पूर्ण कब्जा करण्याचा धोका संभवतो.

  • Related Posts

    सरकारचा यू-टर्न आणि धोक्याची घंटा

    अन्यथा सरकारवर प्रभाव टाकून कोणताही नियम बदलून घेता येतो, असा संदेश उद्योगविश्वात गेला तर ती केवळ प्रशासनासाठी नव्हे, तर गोव्याच्या पर्यावरण, शेती आणि भवितव्यासाठीही धोक्याची घंटा ठरेल. धारगळ येथील डेल्टीन…

    नशेवर उभी अर्थव्यवस्था ?

    पर्यटनाचा अर्थ केवळ कॅसिनो, दारू आणि रात्रीची मौजमजा एवढाच मर्यादित असू शकत नाही. गोव्याची खरी ओळख त्याची संस्कृती, निसर्ग, वारसा, समुद्रकिनारे आणि स्थानिक जीवनशैली आहे. “नशामुक्त गोवा” ही घोषणा ऐकायला…

    You Missed

    RTI documents reveal Land Grabbing Commission held three persons responsible in Dhargal land case

    RTI documents reveal Land Grabbing Commission held three persons responsible in Dhargal land case

    Former GPCC President Amit Patkar, Goa Forward Oppose Proposed FCRA Amendments; Seek Protection for Goa’s Charitable Institutions

    Former GPCC President Amit Patkar, Goa Forward Oppose Proposed FCRA Amendments; Seek Protection for Goa’s Charitable Institutions

    Centre Notifies Goa ST Political Reservation Act; Process Begins for Reservation of Four Assembly Constituencies

    Centre Notifies Goa ST Political Reservation Act; Process Begins for Reservation of Four Assembly Constituencies

    शिक्षकांचा मानसिक ताण… शेवटी ऐकणार तरी कोण?

    शिक्षकांचा मानसिक ताण… शेवटी ऐकणार तरी कोण?

    तेजपाल दोषी, मंदारचे मारेकरी मुक्त !

    तेजपाल दोषी, मंदारचे मारेकरी मुक्त !

    06/08/2026 e-paper

    06/08/2026 e-paper