मनोज परब व इतरांविरोधात गुन्हे दाखल

पिर्ण येथील घटनेवरून कोलवाळ पोलिसांची कारवाई

गांवकारी, दि. ३० (प्रतिनिधी)

पिर्ण येथे रस्ता रूंदीकरणाच्या विषयावरून मंत्री नीळकंठ हळर्णकर यांची जीएसटी उत्सव फेरीदरम्यान अडवणूक करून त्यांच्या विरोधात लोकांना चिथावल्याचा आरोप कोलवाळ पोलिसांनी आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब आणि इतरांवर ठेवला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत प्रतिक्रिया देताना मनोज परब यांनी सांगितले की, “पोलिसांची ही कृती आम्हाला रोखू शकणार नाही. लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही लढत राहणार आहोत.”
ही घटना पिर्ण-बार्देश येथे घडली. रस्ता रूंदीकरणामुळे रस्त्यालगत असलेल्या लोकांच्या घरांना व दुकानांना पाडण्यासंबंधी नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. या विषयावर ग्राम विकास समिती आणि पंचायत ग्रामसभेत चर्चा झाली होती. त्यावेळी आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी स्पष्टीकरण द्यावे, असा ठराव करण्यात आला होता. मात्र, हळर्णकर हे लोकांना सामोरे जाणे टाळत असल्याचा समज ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे.
जीएसटी उत्सवाच्या निमित्ताने आमदार हळर्णकर पिर्ण गावात येणार असल्याचे कळल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना नोटिसांबाबत प्रश्न विचारण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती मनोज परब यांनी दिली. आमदारांना पोलिस संरक्षण घेऊन कार्यक्रमस्थळी यावे लागले, यावरूनच ते लोकांना घाबरत असल्याचे सिद्ध होते, असे परब म्हणाले.
कोलवाळ पोलिस स्थानकावर गर्दी
कोलवाळ पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक दत्तराज राणे यांनी मनोज परब यांच्यासह इतरांना समन्स जारी करून मंगळवारी हजर राहण्याचे आदेश दिले. या समन्सनुसार मनोज परब आणि इतरांवर भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, २०२३ अंतर्गत विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या या गुन्ह्यांत अटक करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले असून, त्यांच्यावर काही अटी लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये यापुढे सहभागी न होणे आणि तपासात सहकार्य करणे यांचा समावेश आहे.
ही तक्रार स्वानंद प्रभू यांच्या माहितीवरून दाखल करण्यात आली असून, आरोपींमध्ये तुकाराम उर्फ मनोज परब, सुबोध कांदोळकर, सिप्रियानो परेरा, अंकुश पार्सेकर, सिताराम सातार्डेकर, संजय देसाई, रोहन कळंगुटकर आणि इतर अज्ञात व्यक्तींचा समावेश आहे.

“लोकांच्या प्रश्नांना उत्तरे न देता गप्प राहणे आणि लोकांनी प्रश्न विचारल्यास त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून त्यांची छळवणूक करणे हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. पोलिसांचा बळ वापरून सरकार आपले तोंड बंद करू शकत नाही. हा लढा सुरूच राहणार आहे आणि अन्यायाविरोधात झुंजत राहणार आहे. पोलिसी कारवाईचा धाक दाखवून आता हा आक्रोश शांत होणार नाही.”
— मनोज परब

  • Related Posts

    आसगांव पंचायतीचा खात्याला दणका

    सरपंच, पंचायत मंडळाचे ग्रामस्थांकडून कौतुकगांवकारी, दि. २३ (प्रतिनिधी) बार्देश तालुक्यातील आसगांव पंचायतीने कथित रायगो होम्स प्रकल्पासाठी सरंक्षक भिंतीच्या बांधकाम परवान्याच्या विषयावरून अखेर पंचायत खात्यालाच जोरदार दणका दिला आहे. पंचायतीने नाकारलेला…

    युनिटी मॉल रद्द होणे कठीण

    सरकारचा युटर्न; चिंबलवासीय आक्रमक गांवकारी, दि. २१ (प्रतिनिधी) चिंबल येथील नियोजित युनिटी मॉल हा केंद्र सरकारचा बहुप्रतिष्ठित प्रकल्प आहे आणि तो रद्द करणे कठीण असल्याची कबुली मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत…

    You Missed

    23/01/2026 e-paper

    23/01/2026 e-paper

    आसगांव पंचायतीचा खात्याला दणका

    आसगांव पंचायतीचा खात्याला दणका

    पंचायत खात्यावर कारवाई कधी?

    पंचायत खात्यावर कारवाई कधी?

    22/01/2026 e-paper

    22/01/2026 e-paper

    भाजपच्या सामन्यास युवा काँग्रेस सज्ज

    भाजपच्या सामन्यास युवा काँग्रेस सज्ज

    आरोग्याचे राजकारण

    आरोग्याचे राजकारण