गोवा मुक्ती दिन सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे उद्गार
गांवकारी, दि. १९ (प्रतिनिधी)
भारत स्वातंत्र्य होऊन १४ वर्षांनी गोवा मुक्त झाला, तरीही आपला गोवा इतर राज्यांच्या तुलनेत एक पाऊल पुढे चालत आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले. गोवा मुक्तीनंतर स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी आधुनिक गोव्याचा पाया रचला आणि स्व. मनोहर पर्रीकर यांनी आधुनिक गोव्याचा कळस उभारला, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
गोवा मुक्ती दिनाचा शासकीय सोहळा गोवा विद्यापीठ मैदानावर आयोजित करण्यात आला. यावेळी राज्याच्या जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी गोवा मुक्तीसाठी ज्ञात-अज्ञातांनी दिलेले बलिदान आणि योगदान याचे स्मरण केले. गोव्याच्या इतिहासात कुंकळ्ळीचा उठाव, पिंटोचे बंड आणि दीपाजी राणे यांचे बंड सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहेत. त्यानंतर त्रिस्तांव ब्रागांझ कुन्हा यांनी चेतवलेली ज्योत आणि डॉ. राम मनोहर लोहीया यांनी गोंयकारांचा जागवलेला आत्मसन्मान—या सर्वांचा परिपाक म्हणूनच गोव्याला मुक्ती प्राप्त होऊ शकली, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.
विकसित गोव्याचे स्वप्न
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताची संकल्पना २०४७ पर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले आहे. आपल्याला २०३७ पर्यंत विकसित गोव्याचे स्वप्न साकारायचे आहे आणि त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे, असेही डॉ. सावंत म्हणाले. गोव्याची श्रीमंत संस्कृती, पर्यावरण, वारसा आणि एकूणच गोव्याचे गोंयकारपण आपल्याला सांभाळायचे आहे आणि त्यासाठी लोकांनी जबाबदारीने वागण्याची गरज आहे. राज्यात शैक्षणिक तसेच इतर पायाभूत साधनसुविधांची सोय मोठ्या प्रमाणावर झाली आहे, असेही ते म्हणाले.
गोव्याची एकात्मता सांभाळूया
राज्याचे दरडोई उत्पन्न इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. तसेच कृषी, फलोत्पादन, फुलोत्पादन, मासेमारी, दुग्ध उत्पादन, मनुष्यबळ प्रशिक्षण, उद्योग, आरोग्य सुविधा, पर्यटन यात गोवा पुढे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. गुलामी तसेच परधार्जिण्या मानसिकतेला गोव्यात वाव नाही. गोव्याचे गोंयकारपण टिकवून ठेवण्यासाठी गोमंतकीयांनी एकात्मतेने राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात तिरंगा झेंडा फडकावून झाली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलीस, अग्निशामक दल, होमगार्ड आणि विद्यार्थ्यांच्या परेडचे परीक्षण केले.






