म्हणूनच आता वेळ आली आहे, आपल्या मताचा योग्य वापर करण्याची, आणि खऱ्या अर्थाने जनतेसाठी काम करणाऱ्या नेतृत्वाला पुढे आणण्याची.
नेतृत्व म्हणजे फक्त पैसे खर्च करण्याची ताकद नाही. खऱ्या नेतृत्वासाठी लोकांसाठी काम करण्याची प्रामाणिक इच्छा, प्रश्न सोडवण्याची क्षमता आणि सरकारला जाब विचारण्याची हिंमत असणे आवश्यक आहे.
दिखावा विरुद्ध खरे काम
श्यामराव, रामराव, निलेश ही नावे आपल्यासाठी नवीन नाहीत. अनेक वर्षांपासून आपण त्यांना पाहत आलो आहोत. त्यांनी किती दिवे लावले, किती खर्च केला, किती मोठमोठे कार्यक्रम केले, हे सगळं लोकांच्या नजरेसमोर आहे. पण प्रश्न असा आहे की, या सगळ्या दिखाव्याच्या पलीकडे त्यांनी खरंच सामान्य माणसासाठी काय केलं?
पैशाची चुकीची समजूत
आज राजकारणात एक चुकीची समजूत पसरली आहे. ज्याच्याकडे जास्त पैसा, तोच मोठा नेता. पण खरं नेतृत्व पैशाने विकत मिळत नाही. नेतृत्व म्हणजे लोकांच्या समस्या समजून घेणे, त्यांच्या प्रश्नांसाठी लढणे, गरज पडली तर रस्त्यावर उतरून आंदोलन करणे, आणि सत्ताधाऱ्यांना निर्भीडपणे जाब विचारणे.
नागरिकांचा दृष्टिकोन बदलायला हवा
दुर्दैवाने, आज अनेक लोक नेत्यांचे मूल्यमापन करताना त्यांच्या कामापेक्षा त्यांच्या खर्चाकडे जास्त बघतात. कोण किती पैसे उधळतो, किती मोठे पोस्टर्स लावतो, किती मोठे कार्यक्रम करतो यावरून त्यांची प्रतिमा तयार होते. पण हा दृष्टिकोन बदलायला हवा. पैसा कुठून येतो, कसा खर्च होतो, आणि त्यामागे कोणते स्वार्थ आहेत हा विचार आपण सहसा करत नाही.
नावं बदलतात, परिस्थिती तशीच
जर आपण फक्त पैशाच्या जोरावर नेते निवडत राहिलो, तर परिणामही तसाच मिळणार. काल निलेश मिळाला, त्याआधी श्याम, आणि त्याआधी रामराव. नावं बदलतात, पण परिस्थिती तशीच राहते. कारण निवड करताना आपण माणसाच्या गुणांकडे दुर्लक्ष करून फक्त त्याच्या आर्थिक ताकदीकडे बघतो.
खऱ्या परिवर्तनाची गरज
परिवर्तन तेव्हाच शक्य आहे, जेव्हा सुशिक्षित, जागरूक आणि विचार करणारे नागरिक पुढे येतील. जे लोक नेत्यांना प्रश्न विचारतील, त्यांच्याकडून कामाची अपेक्षा ठेवतील, आणि चुकीच्या गोष्टींना विरोध करतील. जर तुमच्यासारखे लोक पुढे येऊन योग्य उमेदवारांना पाठिंबा दिला, तर नक्कीच बदल घडू शकतो.
पण जर आपण गप्प बसलो, किंवा पैशाच्या प्रभावाखाली निर्णय घेत राहिलो, तर पुढची शंभर वर्षेही परिस्थिती बदलणार नाही. म्हणूनच आता वेळ आली आहे, आपल्या मताचा योग्य वापर करण्याची, आणि खऱ्या अर्थाने जनतेसाठी काम करणाऱ्या नेतृत्वाला पुढे आणण्याची.
– विनेश प्रभुदेसाई
कुडचडे- केपे, गोवा





