बुजुर्ग मंडळींनी खस्ता खाऊन ही रंगभूमी टिकवली. तिचा मान राखणं आणि स्वाभिमान जोपासणं हे आपलं कर्तव्य आहे. नटेश्वराकडे प्रार्थना आहे की या चिंतनातून संगीतासाठी काहीतरी चांगलं घडावं.
गोव्याची नाट्यपरंपरा ही आपल्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान आहे. या परंपरेला आकार देण्यासाठी आणि टिकवण्यासाठी अनेक पिढ्यांनी खस्ता खाल्ल्या आहेत. आजही त्या परंपरेचा सुवास आपल्याला जाणवतो. मात्र, मागील काही वर्षांत संगीत नाटकांच्या क्षेत्रात एक वेगळीच असुर लाट उसळताना दिसते आहे.
परंपरेचा ठेवा आणि आजची स्थिती
पं. जितेंद्रबुवा अभिषेकी, पं. वझे बुवा, पं. भास्करबुवा बखले, पं. गोविंदराव टेंबे, पं. राम मराठे, अशोक पत्की यांसारख्या महान कलाकारांनी आपल्या साठी अमूल्य ठेवा ठेवला आहे. त्यांच्या चालींवर आजही असंख्य कलाकार आपला उदरनिर्वाह करतात. पण दुर्दैवाने, या सोनेरी चालींचा दुरुपयोग करून काही नवीन संगीत दिग्दर्शक आणि गायक त्याचं विडंबन करत आहेत.
पर्याय आणि मार्गदर्शन
जर मूळ चालींची जाण नसेल, तर पर्याय उपलब्ध आहेत. पुणे-मुंबईतील बुजुर्ग शिष्य — पं. राजाभाऊ काळे, पं. विजय कोपरकर, पं. अजित कडकडे, पंडिता आशाताई खाडिलकर, पं. शौनक अभिषेकी, पं. हेमंत पेंडसे यांचं मार्गदर्शन घेता येईल. पं. विश्वनाथ कान्हेरे आणि पं. तुळशीदास बोरकर यांनीही मूळ चाली जपल्या आहेत. या ठेव्याचा योग्य उपयोग करूनच आपण परंपरेला पुढे नेऊ शकतो.
नाटकांची अमूल्य परंपरा
मानापमान, मत्स्यगंधा, ययाती देवयानी, धाडीला राम, कधीतरी कोठेतरी, कैकयी, गोरा कुंभार, महानंदा, हे बंध रेशमाचे, कट्यार काळजात घुसली… ही यादी न संपणारी आहे. या नाटकांनी संगीत रंगभूमीला अमरत्व दिलं आहे. मात्र, काही ठिकाणी मूळ संगीतकाराचं नावच सांगितलं जात नाही, ही खंत आहे.
तरुण पिढीची जबाबदारी
तरुण पिढी नक्कीच हुशार आहे. पण योग्य मार्गदर्शनाशिवाय परंपरेचा मान राखणं कठीण आहे. स्वतःच्या स्वतंत्र चाली तयार करून स्वतःला सिद्ध करणं स्वागतार्ह आहे, पण अमृत ठेवा हाताळताना सावधगिरी आवश्यक आहे.
बुजुर्ग मंडळींनी खस्ता खाऊन ही रंगभूमी टिकवली. तिचा मान राखणं आणि स्वाभिमान जोपासणं हे आपलं कर्तव्य आहे. नटेश्वराकडे प्रार्थना आहे की या चिंतनातून संगीतासाठी काहीतरी चांगलं घडावं.
– रोहिदास परब
(प्रसिद्ध तबला कलाकार)





