पणजी, दि. ४ जुलै : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गोव्यातील आरोग्य व्यवस्थेवर टीका करत राज्यातील प्रत्येक कुटुंबाला कोणत्याही अटींशिवाय १० लाखांचे आरोग्य विमा संरक्षण देण्याची मागणी केली. पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या आरोग्य मॉडेलच्या धर्तीवर गोव्यातील दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना (डीडीएसएसवाय) व्यापक स्वरूपात पुनर्रचित करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
गोवा प्रभारी आतिशी, प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक, आमदार कॅप्टन वेन्झी व्हिएगस, इंजि. क्रूझ सिल्वा, गर्सन गोम्स आणि प्रशांत नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत केजरीवाल बोलत होते.
केजरीवाल म्हणाले की, डीडीएसएसवाय योजनेतील विद्यमान ४ ते ६ लाख रुपयांचे विमा संरक्षण गंभीर आजारांसाठी अपुरे आहे. तसेच या योजनेत केवळ ४४७ उपचार प्रक्रियांचा समावेश असून पीईटी स्कॅन, मोतीबिंदू शस्त्रक्रिया यांसारख्या अनेक आवश्यक उपचारांचा समावेश नाही. सरकारकडून रुग्णालयांना वेळेवर परतावा मिळत नसल्याने अनेक खासगी रुग्णालये डीडीएसएसवाय कार्ड स्वीकारत नसल्याचाही त्यांनी आरोप केला.
राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कोलमडल्याचा आरोप करत केजरीवाल म्हणाले की, गोवा मेडिकल कॉलेज हेच एकमेव सुपर स्पेशालिटी सरकारी रुग्णालय असल्याने दुर्गम भागातील रुग्णांना उपचारासाठी लांबचा प्रवास करावा लागतो. गोमेकॉमध्ये प्रचंड गर्दी, बेडची कमतरता आणि औषधांचा तुटवडा असल्याचेही त्यांनी नमूद केले. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात अनेक पदे रिक्त असून आयडी रुग्णालयाचे पूर्ण क्षमतेच्या जिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याचे आश्वासन अद्याप पूर्ण झाले नसल्याची टीकाही त्यांनी केली.
पंजाबमधील आम आदमी पक्ष सरकार प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचे आरोग्य विमा संरक्षण देत असून २,३५० हून अधिक उपचार पॅकेजचा त्यात समावेश आहे. गोव्यातही अशाच प्रकारे डीडीएसएसवायची पुनर्रचना करून विमा संरक्षण १० लाखांपर्यंत वाढवावे, सर्व पात्रता अटी रद्द कराव्यात, अधिकाधिक उपचारांचा समावेश करावा आणि रुग्णालयांना वेळेवर देयके अदा करावीत, अशी मागणी त्यांनी केली.
“गोव्यातील भ्रष्टाचार थांबवला तर प्रत्येक कुटुंबाला सहजपणे १० लाखांचे आरोग्य विमा संरक्षण देता येईल,” असा दावा केजरीवाल यांनी केला.
यावेळी आमदार कॅप्टन वेन्झी व्हिएगस यांनी आरोग्य सेवा ही प्रत्येक नागरिकाचा हक्क असून ती उत्पन्न किंवा राजकीय प्रभावावर अवलंबून नसावी, असे सांगत दर्जेदार आरोग्य सुविधा प्रत्येक गोमंतकीयापर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली.





