विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा संघटन बळकटीवर भर
गांवकारी,दि. ४ (प्रतिनिधी)
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्यासमोर शनिवारी काँग्रेसच्या नेत्यांनी एकसंघतेचे दर्शन घडवत एकजुटीची परेड करत फुटीच्या वार्तांना पूर्णविराम दिला. आगामी २०२७ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्यावर आणि निवडणूक रणनीतीवर सविस्तर चर्चा करत भाजपच्या पराभवाचा निर्धार केला.
काँग्रेसमधील अंतर्गत भांडणांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे संघटन सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांचे शुक्रवारी रात्री गोव्यात आगमन झाले. आज पूर्ण दिवसभर बैठकांचा सपाटाच सुरू होता. या बैठकीला पक्षाचे सगळे नेते हजर होते. अंतर्गत मतभेद असणे याचा अर्थ पक्षात फुट पडणे असा होत नाही. सर्वांनी एकजुटीने भाजपच्या पराभवासाठी काम करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
बैठकीला गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, प्रभारी माणिकराव ठाकरे, सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, माजी खासदार फ्रान्सिस्को सार्दिन्हा, समन्वय समितीचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना जीपीसीसी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट नसल्याचे स्पष्ट केले. भाजप काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचा खोटा प्रचार करत असून पक्षातील सर्व नेते एकजुटीने आगामी निवडणुकांसाठी काम करत असल्याचा दावा त्यांनी केला.
सुनील कवठणकर यांनीही पक्षात नाराजी किंवा अंतर्गत संघर्ष असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या. आपण अशा प्रकारचे कोणतेही सार्वजनिक वक्तव्य केले नसून पक्षातील प्रश्न संघटनेच्या चौकटीतच सोडवले जातात, असे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी भाजप सरकारच्या कथित भ्रष्टाचार, कायदा-सुव्यवस्था, बेरोजगारी आणि अपूर्ण आश्वासनांविरोधात काँग्रेसची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगितले. राज्यातील सर्व ४० मतदारसंघांत “काँग्रेस मांड” बैठका आयोजित केल्या जात असून २०२७ च्या निवडणुकीत २७ जागा जिंकण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
माजी खासदार फ्रान्सिस्को सार्दिन्हा यांनी पक्षातील मतभेद चर्चेतून सोडवले जातील, असे सांगत काँग्रेस कार्यकर्ते एकजुटीने निवडणूक लढवतील, असा विश्वास व्यक्त केला.
माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी नव्याने नोंदणीकृत “गोवा काँग्रेस पार्टी”शी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी पूर्णपणे निष्ठावान असून प्रदेश काँग्रेसशी कोणतेही मतभेद नसल्याचे त्यांनी सांगितले.






