गोवा फॉरवर्ड व काँग्रेसचा जोरदार पलटवार
गांवकारी, दि. १५ (प्रतिनिधी)
कारापूर आंदोलक गोव्याची बदनामी करण्यासाठीच दिल्लीत आंदोलन करत असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केलेल्या वक्तव्याचा सर्व स्तरांतून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेसने दामू नाईक यांच्यावर जोरदार पलटवार करत, सत्तेची धुंदी वेळीच आटोक्यात आणली नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा दिला.
१३ जुलै रोजी कारापूरवासीयांनी दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन करून हाऊस ऑफ अभिनंदन लोढा प्रकल्पाविरोधात आवाज उठवला. स्थानिकांना डावलून बिल्डर लॉबीची पाठराखण करणारे भाजप सरकार कसे काम करत आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटत असताना, दामू नाईक यांनी आंदोलनकर्त्यांवर टीका करून ते गोव्याची बदनामी करत असल्याचे वक्तव्य केले.
सत्तेचा माज चांगला नव्हे – राजेश कळंगुटकर
गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रवक्ते राजेश कळंगुटकर यांनी टीका करताना म्हटले की, भाजपला सत्तेचा माज चढला आहे आणि हा माज चांगला नाही. दामू नाईक किंवा भाजपचा एकही नेता कारापूरवासीयांच्या वेदना जाणून घेण्यासाठी गावात पोहोचला नाही. आमदारही तिथे पाय ठेवत नाही. लोकांची गाऱ्हाणी ऐकण्याऐवजी आंदोलनकर्त्यांची बदनामी करणे ही सत्तेची झिंग आहे. ही नशा जनता लवकरच उतरवेल, असा टोला त्यांनी हाणला.
भाजपच्या अहंकाराचा अतिरेक – अमरनाथ पणजीकर
काँग्रेसचे मीडिया विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी दामू नाईक यांच्या वक्तव्याला भाजपच्या अहंकाराचे प्रतीक ठरवले. “दामू नाईक यांना बहुधा भाजप म्हणजेच गोवा असे वाटत असावे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की गोवा हा जनतेचा आहे, भाजपचा नाही. गोव्याची ओळख, संस्कृती आणि भविष्य हे येथील जनतेने घडवले आहे; कोणत्याही राजकीय पक्षाने नाही,” असे ते म्हणाले. आंदोलनकर्त्यांवर दोषारोप करून भाजप सरकारच्या अपयशाकडून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा निष्फळ प्रयत्न होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
आंदोलकांच्या बदनामीचा डाव – गौरीश घाडी
कारापूर आंदोलनाचे नेते गौरीश घाडी यांनी आरोप केला की, भाजपच्या आयटी सेलकडून कारापूर आंदोलकांची बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. फेक फेसबुक अकाउंट तयार करून सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांच्यावर अपमानास्पद पोस्ट टाकल्या जात आहेत. तसेच काही गोदी मीडियाला आंदोलनाच्या ठिकाणी पाठवून हे आंदोलन विरोधकांनी पुरस्कृत केल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. शंभर दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची तीव्रता समजून घेण्याऐवजी त्यालाच बदनाम करण्याचा हा डाव भाजपने स्वीकारलेला खालचा स्तर दर्शवतो, असे घाडी यांनी सांगितले.





