डिचोली,दि.१८: गोव्याच्या शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय ठरणाऱ्या एका सोहळ्यात लेखक आत्माराम गांवकर यांनी एका वर्षात लिहिलेल्या तब्बल १०३ शैक्षणिक पुस्तकांचे एकाच दिवशी प्रकाशन करण्यात आले. डिचोली येथील हिराबाई झांट्ये सभागृहात आयोजित या कार्यक्रमातून नवा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यात आल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.
‘शिक्षा व्हिजन डिचोली’ आणि ‘वा प्रकाशन डिचोली’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात आत्माराम गांवकर आणि ‘वा प्रकाशन’च्या निरजा गांवकर यांना प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी महाराज यांच्या हस्ते ‘विश्वविक्रम पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी महाराज यांनी भारताच्या प्राचीन आणि समृद्ध ज्ञानपरंपरेचा उल्लेख केला. रामायण, महाभारत, अठरा पुराणे तसेच महर्षी पाणिनी यांच्या व्याकरण ग्रंथासारखी विशाल ग्रंथसंपदा ही भारताची खरी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. नालंदा विद्यापीठाच्या इतिहासाचा दाखला देत ज्ञानपरंपरेवर अनेक संकटे आली, तरी भारताची ज्ञानसाधना कधीच संपली नाही, असे त्यांनी नमूद केले.
आजच्या संगणकीय आणि वेगवान युगात आत्माराम गांवकर यांनी विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ज्ञान पुस्तकांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. एकाच वर्षात १०३ पुस्तकांचे लेखन करणे आणि त्यांचे एकाच दिवशी प्रकाशन होणे ही असामान्य कामगिरी असून, त्यामागे प्रदीर्घ अनुभव आणि व्यापक वाचन असल्याचे स्वामी महाराज म्हणाले. गांवकर यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी उपयुक्त अशी शैक्षणिक ग्रंथसंपदा निर्माण केल्याचेही त्यांनी सांगितले.
डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी आत्माराम गांवकर यांच्या कार्याचे कौतुक करताना हा उपक्रम केवळ प्रसिद्धीसाठी नसून भावी पिढीतील उत्तम विद्यार्थी घडविण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचे सांगितले. शिक्षण हेच भविष्य असून अशा पुस्तकांमधून नव्या पिढीला समृद्ध शैक्षणिक वारसा मिळेल, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाला आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, प्रसिद्ध समीक्षक प्रा. स्नेहा म्हांबरे, संजय नार्वेकर यांच्यासह शिक्षण, साहित्य आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. डॉ. प्रवीण सावंत यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर डॉ. गोविंद भगत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
या सोहळ्याला नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. एकाच वेळी १०३ शैक्षणिक पुस्तकांचे प्रकाशन झाल्याने हा सोहळा गोव्याच्या शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रातील विशेष घटना ठरल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.





