विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे राज्यपालांना पत्र
गांवकारी,दि.२१ (प्रतिनिधी)
गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्ध्यावरच स्थगित झाल्यानंतर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी राज्यपालांना पत्र लिहून किमान १५ दिवसांचे पावसाळी अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे. राज्यातील गंभीर व जनहिताच्या प्रश्नांवर सखोल चर्चा होण्यासाठी पुरेसा कालावधी आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
आलेमाव यांनी पत्रात सर्वण-कारापूर आंदोलन, गोवा नगर व नियोजन कायद्यातील कलम ३९-अ, वाढती बेरोजगारी, बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, महागाई तसेच विद्यार्थ्यांच्या समस्या यांसारख्या विषयांवर ठोस निर्णय घेणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले आहे.
६ मार्च ते २७ मार्च २०२६ या कालावधीत नियोजित अधिवेशन फोंडा पोटनिवडणूक व आचारसंहितेचे कारण देत केवळ सात बैठकीनंतर स्थगित करण्यात आले. हे कारण योग्य नसल्याचा दावा करत आलेमाव यांनी नमूद केले की, अशा परिस्थितीत इतर राज्यांतील अधिवेशने सुरळीत पार पडली होती.
राज्यपालांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन आगामी पावसाळी अधिवेशनात किमान १५ दिवसांच्या बैठका आयोजित कराव्यात, अशी विनंती त्यांनी केली आहे.





