सत्तरी, दि. २ ऑगस्ट : गोव्यातील वाढत्या जमीन खरेदी-विक्रीच्या पार्श्वभूमीवर सत्तरी तालुक्यातील अडवई गावाने आपल्या अस्तित्व, संस्कृती आणि नैसर्गिक वारशाच्या संरक्षणासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. श्री शांतादुर्गा देवी मंदिरात गावातील पाचही पिळग्यांचे प्रतिनिधी एकत्र येऊन गावातील कोणतीही जमीन, घर किंवा प्लॉट बाहेरच्या व्यक्तींना विकला जाणार नाही, असा एकमताने ठराव मंजूर केला.
गावकऱ्यांच्या मते, बाहेरच्या लोकांकडून मोठ्या प्रमाणावर जमिनींची खरेदी होत असल्याने गावाची ओळख, सांस्कृतिक परंपरा आणि पर्यावरण धोक्यात येत आहे. भविष्यात गावातील जमीन गावकऱ्यांच्याच मालकीत राहावी आणि स्थानिकांचा जमिनीवरील हक्क अबाधित राहावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला.
मात्र, या निर्णयाला एक महत्त्वाचा अपवाद ठेवण्यात आला आहे. गावातीलच एखाद्या कुटुंबातील सदस्याला किंवा बहिणी-भावाच्या मुलांना घर बांधण्यासाठी जमीन आवश्यक असल्यास, गावातील व्यक्तींमध्ये परस्पर व्यवहार करण्यास परवानगी असेल.
श्री शांतादुर्गा देवी मंदिरात झालेल्या बैठकीत पाचही पिळग्यांच्या उपस्थितीत हा निर्णय सर्वानुमते मंजूर करण्यात आला. गावाच्या भवितव्यासाठी आणि पुढील पिढ्यांच्या हितासाठी सर्वांनी एकजुटीने हा ठराव स्वीकारल्याचे सांगण्यात आले.
गोव्यात वाढत्या जमीन व्यवहारांबाबत सातत्याने चिंता व्यक्त होत असताना अडवई गावाने घेतलेला हा निर्णय इतर गावांसाठीही एक नवा आदर्श ठरू शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे.







