नवी दिल्ली, २४ ऑगस्ट : सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून सरकारला प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तींना लक्ष्य करून त्यांची ‘दिमागी नक्षल’ अशी संभावना करण्याच्या प्रकाराचा एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया (ईजीआय) ने तीव्र निषेध केला आहे. विशेषतः ज्येष्ठ पत्रकार आणि गिल्डचे माजी अध्यक्ष राजदीप सरदेसाई यांना ‘दिमागी नक्षल’ म्हणून लक्ष्य करण्यात आल्याबद्दल गिल्डने तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
भाजप खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषदेत ‘दिमागी नक्षल’ नक्षलवाद्यांबद्दल सहानुभूती बाळगतात, त्यांना वैचारिक पाठिंबा देतात, सुरक्षा जवानांच्या मृत्यूचा आनंद साजरा करतात तसेच संसदीय प्रक्रियेतून तोडगा शोधण्याऐवजी रस्त्यावरील आंदोलनाचे समर्थन करतात, असा आरोप केला होता.
यानंतर भाजपच्या अधिकृत सोशल मीडिया माध्यमांतून राजदीप सरदेसाई यांना लक्ष्य करण्यात आल्याचा उल्लेख करत गिल्डने या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे.
इंडिया टुडे टीव्हीचे संपादक असलेले सरदेसाई यांनी आपल्या दीर्घ पत्रकारितेच्या कारकिर्दीत बातम्या आणि घडामोडींचे वस्तुनिष्ठ सादरीकरण व विश्लेषण केले आहे. त्यामुळे त्यांच्या कृती किंवा वक्तव्यांना कोणत्याही प्रकारे ‘दिमागी नक्षल’ असे संबोधता येणार नाही, असे गिल्डने स्पष्ट केले.
“हा प्रकार एखाद्या किरकोळ किंवा कट्टर गटाकडून झालेला नसून सत्ताधारी पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून झाला आहे, ही बाब अधिक चिंताजनक आहे,” असे गिल्डने म्हटले आहे. अशा प्रकारचे हल्ले देशाच्या लोकशाही मूल्यांना कमकुवत करतात आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या घटनात्मक अधिकारांतर्गत असलेल्या माध्यम स्वातंत्र्यालाही बाधा पोहोचवतात, असे गिल्डचे म्हणणे आहे.
स्वतंत्र माध्यमांसाठी उपलब्ध होत असलेली जागा सातत्याने संकुचित होत असल्याकडेही गिल्डने लक्ष वेधले. ‘रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स’च्या २०२६ च्या जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकात भारत १८० देशांपैकी १५७ व्या स्थानावर घसरल्याचा उल्लेख गिल्डने आपल्या निवेदनात केला आहे.
सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करणे आणि सत्ताधाऱ्यांच्या कामकाजाची चिकित्सा करणे हा लोकशाही प्रक्रियेचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे आपले व्यावसायिक कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकारांना ‘जनतेचे शत्रू’ म्हणून रंगवण्याचा प्रयत्न भाजपच्या सोशल मीडिया माध्यमांनी थांबवावा, असे आवाहन एडिटर्स गिल्डने केले आहे. गिल्डचे अध्यक्ष संजय कपूर आणि सरचिटणीस राघवन श्रीनिवासन यांच्या नावे हे निवेदन जारी करण्यात आले आहे.





