सरकार आणि पंचायतीविरोधात कारापूरवासीयांची वज्रमुठ
गांवकारी, दि. ६ (प्रतिनिधी)
राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी विकलेल्या कारापूर–सर्वण येथील जमिनीवर उभ्या राहणाऱ्या हाऊस ऑफ अभिनंदन लोढा प्रकल्पाविरोधात कारापूरचे स्थानिक दंड थोपटून उभे राहिले आहेत. या प्रकल्पामुळे स्थानिकांची शेती, बागायती नष्ट होणार असून कारापूरच्या गावकऱ्यांचे अस्तित्वच धोक्यात येईल, असा आरोप करण्यात आला आहे. गाव वाचवण्यासाठी प्राणांची आहुती देण्याचा निर्धार लोकांनी केला आहे.
कारापूरच्या स्थानिकांनी रविवारीपासून या प्रकल्पाविरोधात बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. राज्य सरकार, प्रशासन आणि ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी निवेदने व तक्रारी सादर करूनही न्याय न मिळाल्याने आता रस्त्यावर उतरूनच हक्क मागण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. सुमारे शंभर एकर जमिनीत दीड हजारांहून अधिक भूखंड तयार करण्यात आले असून, त्यावर बंगले उभारले जाणार आहेत. मानवनिर्मित समुद्र उभारण्याचीही योजना या बिल्डरने केली आहे. या पंचतारांकित प्रकल्पामुळे कारापूरात परप्रांतीय श्रीमंत लोकांची वेगळी वसाहत तयार होईल आणि स्थानिक हळूहळू आपल्या गावातच दुय्यम ठरतील, अशी टीका आंदोलकांनी केली.
शेती-बागायतीच्या वाटा बंद
येथील लोकांचा मुख्य उदरनिर्वाह शेती आणि बागायतीवर अवलंबून आहे. मात्र, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी जमीन विकल्यामुळे स्थानिक पंचायत त्यांच्या दबावाखाली वागत असल्याचा आरोप करण्यात आला. गावाचा सांभाळ करण्याऐवजी विध्वंसाला पाठिंबा देणाऱ्या पंचसदस्यांची नोंद इतिहासात संहारक म्हणून होईल, असेही आंदोलकांनी म्हटले. लोकांच्या शेती-बागायतीत जाणाऱ्या पारंपरिक पायवाटा बंद करण्यात आल्या आहेत. तिळारी धरणाचे पाणी बांधकामासाठी वापरले जात असल्याचा आरोपही करण्यात आला.
कुठे आहेत मुख्यमंत्री, आमदार?
राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघालगत हा प्रकल्प उभा राहत आहे. कारापूर–सर्वण पंचायत मये मतदारसंघात येते. मात्र मुख्यमंत्री आणि स्थानिक आमदार यांनी अद्याप गावकऱ्यांची साधी विचारपूसही केलेली नाही. विश्वजीत राणे यांच्या दबावामुळे मुख्यमंत्री स्वतःच्या लोकांना वाऱ्यावर सोडत असतील तर ते जनतेला न्याय कसा देणार, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांनी केला.





