फोंड्यावर कुणाचा झेंडा फडकणार?

आता खरी कसोटी जनतेची आहे. लोकशाहीत जनता हीच राजा असते. फोंड्यातील जनता आपले राजेपण टिकवून ठेवते की बंदिस्त झाल्याचे दर्शन घडवते, हे निकालातून स्पष्ट होईल.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फोंडा पोटनिवडणुकीचा निकाल फार महत्त्वाचा ठरणार आहे. भाजपला याची पूर्ण जाणीव असल्यामुळेच आजच्या घडीला फोंड्यात सरकार आणि पक्षाने पूर्णपणे ठाण मांडले आहे. फोंडा मतदारसंघाच्या संपूर्ण इतिहासात इतक्या प्रमाणात सरकारी मंत्री किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांचे पाय लागले नसतील. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तर फोंडा पिंजून काढण्याचा चंग बांधला आहे. आत्तापर्यंत माजी मंत्री स्व. रवी नाईक जीवंत असताना मुख्यमंत्री किंवा सरकारने लक्ष घातले असते, तर आज सरकार आणि पक्षाची अशी दमछाक झाली नसती.
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासाठीही ही लढत फार महत्त्वाची आहे. प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर ही पहिलीच पोटनिवडणूक असल्याने त्यांच्या संघटनात्मक कामाची पोचपावती या निकालातून दिसून येणार आहे. किमान पाच हजारांच्या फरकाने रितेश नाईक विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आता मंगळवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा फोंड्यात होणार आहे. त्यामुळे दामू नाईक यांच्या पाच हजारांच्या मताधिक्यात आणखी किती मते जोडली जातील, हे सांगता येत नाही. भाजप–मगो आघाडीची ताकद आणि सरकारच्या यंत्रणेचा पूर्ण वापर पाहिल्यानंतर विरोधी उमेदवारांची अनामत जप्त होणार की काय, असा दरारा भाजपने निर्माण केला आहे. एवढे सगळे करूनही जर लढत अटीतटीची झाली, तर २०२७ च्या निवडणुकीत भाजपचे काही खरे नाही, असेच म्हणावे लागेल.
भाजपचे संघटन कौशल्य याला तोड नाही, हे कुणीही मान्य करेल. संघटन आणि नियोजनात भाजप विरोधकांच्या कितीतरी पुढे आहे. परंतु सरकारची धोरणे चुकीची असतील, भ्रष्टाचाराने कळस गाठला असेल, कुशासनाचा अनुभव लोकांना रोजच्या व्यवहारांत दिसत असेल, तर केवळ संघटन कौशल्य आणि व्यवस्थापनाच्या बळावर निवडणुका जिंकता येतील काय, हा खरा प्रश्न आहे. फोंडा पोटनिवडणुकीचा निकाल या अर्थाने भाजपसाठी प्रयोग ठरेल. या प्रयोगात जर त्यांना यश मिळाले, तर गोव्याचे सुरू असलेले लचके तोडण्याचे प्रकार सुरूच राहतील, कारण मतदारांना त्या वेदना जाणवत नाहीत, असा अर्थ निघेल.
मतदारांची जातनिहाय, प्रदेशनिहाय, व्यावसायनिहाय विभागणी करून भाजपने वेगवेगळ्या बैठका व सभांचे आयोजन केले आहे. पैशांचा सर्रास वापर सुरू आहे. पक्षाचे काही प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची कर्जेही या निमित्ताने फिटली गेली, अशी चर्चा आहे. भाजपच्या तिकिटासाठी प्रमुख दावेदार असलेल्या अपूर्व दळवी यांच्याकडेच रितेश नाईक यांना निवडून आणण्याचे सेनापतीपद बहाल करून भाजपने आपल्या राजकीय धूर्तपणाचे दर्शन घडवले आहे. राज्यातील मंत्री व आमदार आपल्या मतदारसंघातील प्रश्न वाऱ्यावर सोडून फोंड्यात हिंडताना दिसतात, त्यामुळे त्यांच्या मतदारांकडून त्यांच्यावर लाखोली वाहिली जात आहे. हा सगळा अटापीटा पाहता गेली १४ वर्षे सत्तेत असलेल्या भाजपला स्वतःवरच विश्वास नाही की काय, असा प्रश्न पडतो.
भाजपने फोंड्यात दहशतीचे वातावरण तयार केल्याचेही काहीजण सांगतात. विरोधी उमेदवारांचा फोटो किंवा समर्थनार्थ कमेंट सोशल मीडियावर केली तरी थेट धमक्या दिल्या जातात, अशी माहिती मिळते. पोलिस स्थानकात तक्रार नोंदवायची नाही, असे फर्मान जारी झाल्याची चर्चा आहे. खाजगी क्षेत्रातील नोकरी करणाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत. परप्रांतीय मतदारांना तर विविध माध्यमांतून निर्वाणीचा इशारा दिला आहे. एखादे मत भाजपच्या विरोधात गेले तरी खैर नाही, असे वातावरण निर्माण झाले आहे. हे सगळे घडत असताना निवडणूक आयोग मात्र निपक्ष, निर्भय आणि पारदर्शक निवडणुकीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात व्यस्त आहे.
आता खरी कसोटी जनतेची आहे. लोकशाहीत जनता हीच राजा असते. फोंड्यातील जनता आपले राजेपण टिकवून ठेवते की बंदिस्त झाल्याचे दर्शन घडवते, हे निकालातून स्पष्ट होईल.

  • Related Posts

    तरुणाईचा हुंकार हरवतोय का?

    आज गरज आहे ती भीती झटकण्याची, स्वार्थ बाजूला ठेवण्याची, प्रश्न विचारण्याची आणि लोकशाही मार्गाने संघटित होण्याची. तरुणाई ही कोणत्याही समाजाची ऊर्जा असते. समाजाचे वर्तमान आणि भविष्य यांच्यामधील सर्वांत मजबूत पूल…

    चटका लावणारी एक्झिट

    डॉ. केतन भाटीकर यांच्या अकाली आणि दुर्दैवी निधनाने फोंडा तालुक्यासह संपूर्ण गोवा हळहळला आहे. एका तरुण, ऊर्जावान, समाजाभिमुख आणि राजकीय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करू पाहणाऱ्या नेतृत्वाचा असा अचानक अंत…

    You Missed

    BRIEF NOTE ON ARENDAMENTO, AFORAMENTO AND CONFERMENT TITLE OF EMPHYTEUSIS OVER COMMUNITY LAND BELONGING TO COMUNIDADES OF GOA.

    BRIEF NOTE ON ARENDAMENTO, AFORAMENTO AND CONFERMENT TITLE OF EMPHYTEUSIS OVER COMMUNITY LAND BELONGING TO COMUNIDADES OF GOA.

    सिंधुदुर्ग-गोवा नातेसंबंध बिघडवणाऱ्यांवर कारवाई करा; शिवसेना (UBT) ची मागणी

    सिंधुदुर्ग-गोवा नातेसंबंध बिघडवणाऱ्यांवर कारवाई करा; शिवसेना (UBT) ची मागणी

    Karapur Villagers Allege Illegal Compound Wall Construction; Demand Demolition and Immediate Action

    Karapur Villagers Allege Illegal Compound Wall Construction; Demand Demolition and Immediate Action

    Goan Talent Shines Nationally

    Goan Talent Shines Nationally

    Karapur Protest Marks 50 Days of Unity Against Proposed HOABL Project

    Karapur Protest Marks 50 Days of Unity Against Proposed HOABL Project

    Democracy Dies When Citizens Fear to Speak

    Democracy Dies When Citizens Fear to Speak