पीएचडी विद्यार्थ्याची आत्महत्या
गावंकारी, दि. १३ (प्रतिनिधी)
गोव्यातील नामांकित बिट्स पिलानी संस्था सध्या शैक्षणिक गुणवत्तेपेक्षा विद्यार्थ्यांच्या संशयास्पद मृत्यू आणि आत्महत्यांच्या मालिकेमुळे चर्चेत आली आहे. केरळमधील अर्जुन साबू (२६ वर्षे) या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्याने संस्थेजवळील भाड्याच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा संस्थेतील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वेर्णा पोलिसांनी घटनास्थळावरून एक सुसाईड नोट जप्त केली असून, आत्महत्येमागील कारणांचा तपास सुरू आहे. मात्र ही केवळ एक वेगळी घटना नसून, गेल्या दीड वर्षांत कॅम्पसमध्ये घडलेली ही सहावी गंभीर घटना असल्याने या मृत्यूमागचे खरे कारण काय, हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे.
याआधी २ फेब्रुवारी २०२६ रोजी बेंगळुरूतील वैष्णवी जितेश (२० वर्षे) हिने वसतिगृहातील खोलीत आत्महत्या केली होती. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या या विद्यार्थिनीचा मृतदेह रात्री उशिरा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. या घटनेनंतरही संस्थेकडून किंवा सरकारी यंत्रणांकडून ठोस मानसिक आरोग्य यंत्रणा उभारण्यात आली का, असा सवाल उपस्थित होत आहे.
या सर्व घटनांमध्ये एक समान धागा स्पष्टपणे दिसून येतो – प्रचंड शैक्षणिक स्पर्धा, मानसिक ताण, एकाकीपणा आणि विद्यार्थ्यांवर असलेला अपेक्षांचा असह्य दबाव. देशातील प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश मिळवणे हे यशाचे प्रतीक मानले जाते; मात्र त्या यशाच्या मागे विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन कोसळत असल्याचे चित्र समोर येत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, एकामागोमाग घटना घडूनही संस्थेने यामागची मूळ कारणे शोधण्यासाठी व्यापक मानसशास्त्रीय किंवा सामाजिक तपासणी केली का, याबाबत स्पष्टता नाही. केवळ पोलिस तपास किंवा सुसाईड नोटपुरते प्रकरण मर्यादित ठेवून चालणार नाही. विद्यार्थ्यांमध्ये वाढता नैराश्य, स्पर्धेचा अतिरेक, अपयशाची भीती, कौटुंबिक अपेक्षा आणि कॅम्पस संस्कृती यांचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे.
पालक आता भीतीच्या छायेत आहेत. प्रतिष्ठित शिक्षणसंस्था आपल्या मुलांचे भविष्य घडवतील या अपेक्षेने पालक त्यांना दूर पाठवतात; मात्र त्याच संस्थांमध्ये विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य ढासळत असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे.
बिट्स पिलानीसारख्या संस्थांनी आता केवळ शैक्षणिक निकाल आणि प्लेसमेंटपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी सक्षम समुपदेशन व्यवस्था, नियमित मानसोपचार सत्रे आणि तणाव व्यवस्थापन यंत्रणा उभारणे काळाची गरज बनली आहे. अन्यथा, या मृत्यूंची मालिका थांबणार कशी, हा प्रश्न अनुत्तरितच राहणार आहे.






