केजरीवाल बरोबर की चूक?

काँग्रेस आणि ‘आप’ने तातडीने स्वतःत बदल घडवून आणून आपली प्रामाणिकता सिद्ध करावी, अन्यथा ते जनतेला वेठीस धरत आहेत, हेच अधोरेखित होईल.

देशात एकीकडे भाजपविरोधात सर्वच विरोधकांनी एकत्र येण्याची गरज असल्याची लोकभावना निर्माण झाली आहे. अशा वेळी आम आदमी पार्टीने ‘इंडिया’ आघाडीतून बाहेर पडून गोव्यात स्वबळावर निवडणुका लढविण्याची केलेली घोषणा अनेकांना रुचलेली नाही. ‘आप’चे हे पाऊल म्हणजे उघडपणे भाजपला मदत करणारे ठरणार, असा युक्तिवाद अनेक राजकीय विश्लेषक करत आहेत.
या परिस्थितीत अरविंद केजरीवाल यांच्याकडून काँग्रेसबाबत उपस्थित होणारे मुद्देही दुर्लक्षित करता येणार नाहीत. काँग्रेसने स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याची गरज आहे. काँग्रेसच्या विरोधात बोलणारा प्रत्येकजण भाजपचा भागीदार आहे, असे म्हणणे आता ग्राह्य धरले जाणार नाही.
दिल्लीत आम आदमी पार्टीने चमत्कार घडवून देशभरात एक सकारात्मक वातावरण निर्माण केले. हा चमत्कार खरोखरच नैसर्गिक होता की राजकीय डावपेच, यावर सध्या चर्चा सुरू आहे. मागील दोन निवडणुकांत दिल्लीत काँग्रेसला एकही आमदार निवडून आणता आला नाही. गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ‘आप’ला अधिक संधी दिली असती, तर भाजपला रोखता आले असते. मात्र तसे झाले नाही. अखेर काँग्रेसचा एकही आमदार निवडून आला नाही आणि ‘आप’ला सत्तेवर पाणी सोडावे लागले. हीच स्थिती नंतर हरियाणातील पोटनिवडणुकीतही दिसून आली.
लोकसभेत ‘इंडिया’ आघाडीचा घटक असलेल्या ‘आप’ने यानंतर काँग्रेससोबतची युती मोडली आणि आता स्वतंत्रपणे राजकारण करत आहे. गोव्यात लोकसभेची दक्षिण गोव्याची जागा केवळ युतीमुळेच काँग्रेसला मिळू शकली, हे कुणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे या अनुभवातून धडा घेण्याऐवजी हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे राहिले, तर मतविभाजन होऊन त्याचा फायदा भाजपलाच होणार, हे सर्वश्रुत आहे.
अरविंद केजरीवाल यांचे म्हणणे आहे की प्रमुख विरोधी पक्ष या नात्याने काँग्रेसने भाजपविरोधात जे रण उभारायला हवे, तसे दिसत नाही. दोन वेळा विरोधी पक्षनेत्यांसह दोन तृतीयांश आमदार भाजपात दाखल होतात, तरीही लोकांनी काँग्रेसवर विश्वास ठेवावा, असे काँग्रेसला का वाटते? विरोधात राहून यथार्थ भूमिका बजावणाऱ्या ‘आप’ला भाजपला मदत करत असल्याचा आरोप करण्यात काय अर्थ आहे?
भाजप आणि काँग्रेस हे दोघेही एकमेकांना मिळून जनतेची थट्टा करत आहेत, असा मुद्दा केजरीवाल यांनी मांडला आहे.
मूळात काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या या झगड्यात प्रादेशिक पक्षांनी न पडलेलेच बरे. प्रादेशिक पक्षांनी आपली एकजूट अधिक मजबूत करण्याची गरज आहे. गोवा फॉरवर्ड आणि आरजीपी यांनी एकत्र येण्याबाबत दिलेले संकेत स्वागतार्ह आहेत. या संदर्भात दोन्ही पक्षांच्या नेत्यांची संयुक्त बैठक होऊन पुढील दिशा ठरवण्याची गरज आहे. किमान समान कार्यक्रम आखून पुढे जाणे शक्य आहे.
काँग्रेस आणि ‘आप’च्या या झगड्यात वेळ दवडला किंवा अधिक लक्ष दिले, तर जनतेला बेसावध करण्याचा हा प्रयत्न ठरू शकतो. काँग्रेस आणि ‘आप’ने तातडीने स्वतःत बदल घडवून आणून आपली प्रामाणिकता सिद्ध करावी, अन्यथा ते जनतेला वेठीस धरत आहेत, हेच अधोरेखित होईल.

  • Related Posts

    गोंयकार जागा होईल ?

    त्यामुळे आर्थिक विकासाबरोबर शाश्वततेचाही विचार करणे आवश्यक आहे. अन्यथा काही दशकांनंतर गोवा नकाशावर राहील, पण त्याची ओळख आणि वैशिष्ट्ये कायमची नष्ट होतील कारापूरमधील आंदोलनाने ७७ दिवसांचा टप्पा पार केला आहे.…

    विकासाचे प्रमाणपत्र हवे

    विकासाचा गजर जितका मोठा आहे, तितकीच जमिनीवरील वास्तवाची तपासणीही आवश्यक आहे. अन्यथा हा सारा लेखाजोखा “विकासाचे प्रदर्शन” ठरेल; पण “विकासाचे प्रमाणपत्र” ठरणार नाही. गोव्यातील भाजप सरकारकडून “बारा वर्षे मोदी सरकार”…

    You Missed

    मडगांवच्या विकास प्रकल्पांत पारदर्शकता राखा मडगांवचो आवाजचे नेते प्रभव नायक यांची मागणी

    मडगांवच्या विकास प्रकल्पांत पारदर्शकता राखा मडगांवचो आवाजचे नेते प्रभव नायक यांची मागणी

    प्रवेश प्रक्रियेत गैरव्यवहाराचा ठपका; प्राचार्य साबा डीसिल्वा यांना सक्तीची निवृत्ती

    प्रवेश प्रक्रियेत गैरव्यवहाराचा ठपका; प्राचार्य साबा डीसिल्वा यांना सक्तीची निवृत्ती

    Goan Filmmaker Sainath S. Uskaikar’s ‘Waai’ Wins Top Honour at Mumbai International Film Festival

    Goan Filmmaker Sainath S. Uskaikar’s ‘Waai’ Wins Top Honour at Mumbai International Film Festival

    योग दिनानिमित्त भाजप सरकारवर काँग्रेसचा हल्लाबोल; भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणावरून टीका

    योग दिनानिमित्त भाजप सरकारवर काँग्रेसचा हल्लाबोल; भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणावरून टीका

    Chief Minister Leads International Yoga Day Celebrations at Bambolim Stadium

    Chief Minister Leads International Yoga Day Celebrations at Bambolim Stadium

    Congress Alleges NDZ Proposal is ‘Environmental Greenwashing’; Amit Patkar Questions Role of Section 39A

    Congress Alleges NDZ Proposal is ‘Environmental Greenwashing’; Amit Patkar Questions Role of Section 39A