आरोग्यमंत्री विश्वजित राणेंचा सूचक इशारा
गांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी)
“सरकारला माझी गरज असेल तर मला रोजगार हवा आहे. सत्तरीसाठी मला सरकारी नोकऱ्या हव्या आहेत. या नोकऱ्या मिळाल्या तरच मी तुमच्यासोबत राहीन,” असा सूचक इशारा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दिला.
होंडा- नारायणनगर येथे नगरविकास प्राधीकरणाअंतर्गत उभारण्यात आलेल्या क्रिकेट आणि फुटबॉल मैदान तसेच वॉकिंग ट्रॅकच्या उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. “आपला आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत साखळीत पोहोचला असेल. आम्ही दोघे बसून यावर तोडगा काढू,” असेही ते म्हणाले.
राज्य कर्मचारी भरती आयोगाच्या स्थापनेला राणे यांनी तीव्र हरकत घेतली आहे. या आयोगाबाबत त्यांनी थेट दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांना सूचना दिल्या की, आरोग्य खात्यातील भरती आयोगामार्फत भरती करू नये.
यापूर्वीही सरकारी नोकऱ्यांच्या विषयावरून राणे यांनी अनेक कार्यक्रमांतून आपल्या सरकारलाच थेट इशारे दिले आहेत. आता मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
आरोग्य खात्यात कंत्राटी भरती
गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील नोकरभरती प्रकरण सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आहे. राज्य कर्मचारी भरती आयोगाकडून आरोग्य खात्याच्या पदांची भरती केली जात नाही; ती कंत्राटी पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे आपल्या मर्जीतील लोकांना सहजपणे नोकरी देणे सोपे झाले आहे.
बांबोळी येथे कॅन्सर इस्पितळाचे काम सुरू असून तिथे सुमारे दीड हजार नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. या नोकऱ्यांवर विश्वजित राणे यांचे लक्ष आहे. “दरवेळी निवडणुकीच्या वेळी आम्ही सरकारी नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध करून दिल्या आणि यावेळीही या संधी लोकांना मिळतील,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
आरोग्य खात्यात अनेक पदे रिक्त असून त्यांची नियमीत भरती होणे आवश्यक आहे. मात्र आयोगाला टाळण्यासाठी कंत्राटी भरती केली जात आहे. कंत्राटावर सेवा बजावणारे अनेकजण नंतर नियमीत भरती झाल्यावर पुन्हा बेरोजगार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या या संघर्षात बेरोजगारांची थट्टा होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.








